सांगली जिल्हाच नव्हे तर राज्यात मटक्याचे
अड्डे फोफावले आहेत. पोलिस त्यांची कारवाई
करत असली तरी (की दाखवत असली तरी) छापामारीनंतरही
हे अड्डे उघडपणे सुरू असतात. अलिकडच्या दहा महिन्यात सांगली जिल्ह्यात
205 अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले आणि सुमारे साडे चौदा लाख रुपयांचा
मुद्देमाल,रोख रक्कम जप्त करण्यात आली. पण या अड्ड्यांचे समूळ उच्चाटन काही होत नाही. आतापर्यंत
साडेतीनशेंवर एजंट लोकांना अटक झाली आहे आणि त्यांना सोडूनही देण्यात आले आहे.
का हा मटका किंवा जुगार कायमचा हद्दपार होत नाही? अर्थात याचे उत्तर सर्वांकडेच आहे. पण मग हा कारवाईचा
फार्स का? कायद्याची अंमलबजावणी काटेकोर झाली तर मटका बंद होऊ
शकत नाही का? दलाल आणि बुकी सापडले की आपोआप मटक्याला आळा बसतो.
तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मटका पूर्णपणे
बंद करून दाखवला होता. मात्र त्यांच्यापश्च्यात पुन्हा मटका कधी सुरू झाला, हे कळलेच नाही.
पोलिस अवैध धंद्यांना चाप लावू, असे नेहमीच म्हणत
असतात. तरीही मटका, जुगार अड्डे सुरूच असतात.
मटक्याच्या आहारी गेलेले किती तरी लोक घर-गाव सोडून
पळून गेले आहेत. या जुगारापायी अनेकांनी मोठमोठी खासगी क्षेत्रात
कर्जं करून ठेवली आहेत. त्यांच्या मागे वसुलीचा ससेमिरा लागल्याने
ही माणसे घरदार सोडून बाहेर गेली. अनेकांचे संसार बुडाले.
कुटुंबाचे तीन तेरा झाले. विशेष म्हणजे स्त्रियादेखील
मटका,जुगार मोठ्या प्रमाणात खेळत असल्याने चिंता करण्यासारखी
गोष्ट झाली आहे. जिने संसार नेटाने चालवावा, तिनेच मटक्याने घर फोडावे, असा हा प्रकार सध्याची पिढी
कोणत्या दिशेने चालली आहे, हे सांगण्याची गरज उरली नाही.
पोलिस आणि राज्यकर्त्यांनी मनात आणले तर चांगले चित्र दिसू शकते,मात्र त्यासाठी इच्छाशक्ती हवी. आणि तिचाच अभाव सर्वत्र
दिसत आहे.


No comments:
Post a Comment