Saturday, October 27, 2018

ऐन दिवाळीत बाजारात मंदीची लाट


जत,(प्रतिनिधी)-
     दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आलेली असून बाजारपेठेतून ग्राहकांची वर्दळ अजिबात नाही. दसरासुध्दा व्यापारी वर्गाला दिलासा देऊ शकला नाही. दीपावली सणासाठी ग्राहकांना आवश्यक त्या सर्व वस्तूंचा भरपूर स्टॉक बाजारपेठेतील दुकानात असून अजूनही मालाची आवक होत आहे; परंतु बाजारपेठत ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड सुरू न झाल्याने व्यापारी वर्ग धास्तावलेला आहे.
     गैरबँकिंग वित्तीय क्षेत्र हे सध्या रोखीच्या चणचणीच्या समस्येने ग्रासले असल्याने याचा परिणाम मुख्यतः दुचाकीसाठीचे कर्जवितरण आणि गृहकर्जाचे वितरण मंदावलेले आहे. बाजारपेठेतील गृहोपयोगी वस्तूंची खरेदी सुध्दा मंदावलेली आहे. अनेक कंपन्या उधारीने शून्य टक्के कर्जाच्या स्कीमच्या माध्यमातून अनेक प्रकारची सूट व सवलत देऊन सुध्दा बाजारातील व्यापारपेठा ग्राहकांअभावी सुन्या पडल्या आहेत.

     अनेक प्रमुख शहरांमध्ये घराच्या किमती उतरलेल्या असून काही ठिकाणी तरघरभाडे इतके हप्ते घ्या आणि घराचे मालक व्हाअशा सवलती देऊन सुध्दा घरे विकली जात नाहीत, असे अनेक बिल्डर लॉबीतून बोलले जात आहे. गेल्या 2010 ते 2015 मध्ये घराच्या किमती सरासरी 18 टक्के प्रतिवर्ष दराने वाढत होत्या. या सरलेल्या आर्थिक वर्षात 7.5 टक्क्याने किमती उतरल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मते आता किमतीतील वाढ सरासरी 5.3 टक्के अशी घसरली आहे. हीच बाब दुचाकी कर्ज वितरणाला, होम अप्लाएन्सेसना आणि इतर वस्तू खरेदीला मारक ठरत आहे. अनेक बाजारपेठेतील व्यापारी वर्ग गैरबँकिंग वित्तीय कंपन्याच्या पतपुरवठ्यावर अवलंबून आहे. रोख तरलतेअभावी या वित्तीय कंपन्या अडचणीत आल्याने व्यापारी वर्गातील उलाढाली मंदावल्या आहेत. त्यामुळे येत्या दीपावली सणात मंदीची लाट येईल, अशी भीती व चिंता व्यापारीवर्ग करीत आहे.
     भांडवली बाजारातील सेन्सेक्स कोसळला जात असल्याने प्रमुख निर्देशांकात मोठी घसरण होत आहे. रोखीचा प्रवाह घटल्याने गैरबँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृह वित्त कंपन्यांना दिलासा दिला जाईल आणि त्यांची रोकड तरलता वाढेल अशी व्यवस्था करुन त्याबाबत काही निर्णय रिझर्व्ह बँक घेईल अशी घोषणा केली आहे. त्यामुळे व्यापार उद्योग वाढेल अशी धारणा आहे.
     जागतिक अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती ही सर्व देशांसाठी चिंतेचा विषय आहे. जागतिक बाजारात होत असलेली घसरण सर्व देशांसाठी मारक असून या घडामोडीचा भारताला सर्वाधिक फटका बसत आहे, असे मत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले आहे. या परिस्थितीमुळे चिनी अर्थव्यवस्थेचा वेग नऊ वर्षाच्या नीचांकाला पोहोचला आहे. त्याचा विकासदर 6.5 टक्क्यांवर घसरला आहे. या उलट भारतीय अर्थव्यवस्था चांगली आहे.
भारतीय बाजारपेठा दोन मुद्द्यांवरच नफा-तोटाचे गणित करीत असल्याने व्यवहारात तेजी, मंदीची लाट आलीतरी देखील ग्राहक व व्यापारी वर्गाचे मेतकुट नेहमीच जमत असल्याने या अवघड परिस्थितीतून दोघेही निभावून जातील, असा नियतीचा संकेत आहे. तो अंदाज तरी खरा ठरावा.

No comments:

Post a Comment