Sunday, September 30, 2018

Time please:अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण!


लहानपणी शाळेमधे एकच ड्रेस असायचा...
 खाकी चड्डी पांढरा सदरा प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा...

 पायात चप्पल असणं ही लक्झरी असायची...
 गावात एखाद्या कडेचबाटाचीचप्पल दिसायची!
रेशनच्या दुकानावर लोकं चकरा मारायचे...
तेव्हा कुठं वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे !
वरच्या वर्गात जाताना पुस्तक जुनेच असायचे शुभंकरोती
आणि बे एक बे मात्र पोरं घरोघरी म्हणायचे !
 सडा, सारवण, धुणं, भांडी...
बायकांना तर आरामच नव्हता ज्याच्याकडे
 पाणी तापवायचा बंबतोच सगळ्यात श्रीमंत होता !
 दिवाळीच्या फराळाला सर्वांनी एकत्र बसायचं खोबर्याच्या तेलामधे वासाचं तेल असायचं !
कुठला मोती साबण अन कशाची काजू कतली माया, प्रेम एवढं होतं की गोड लागायची वातड चकली !
भात, पोळी, गोडधोड सणासुदिलाच व्हायचे पाहुण्याला गरम
 आणि घरच्याला गार पोळी वाढायचे!
पिझ्झा, बर्गर, न्यूडल्स आजकाल रूटीन असतं
गरिबीला लपवणं फारच कठिण असतं
 स्वयंपाक घरात आता भरपूर किराणा भरलेला असतो
 खाऊ घालायची वासनाच नाही म्हणून लोणच्याला भुरा येतो?
हल्ली आता प्रत्येकाचं पॅकेज फक्त मोठ्ठं असतं
दिवाळीच्या दिवशी सुद्धा पॉश घरभकासवाटतं ?
का बरे पहिल्यासारखे पाहुणे आता येत नाहीत?
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत?
काय तर म्हणे आम्ही आता हाय फाय झालो !

चार पैसे आल्यामुळे, खरंतर सगळेच पुरते वाया गेलो !
 कशामुळे घात झाला काहीच का कळंत नाही ?
एवढं मात्र खरं की पहिल्यासारखं सुख आता अजिबात मिळत नाही ?
प्रगती झाली की अधोगती ?
काहीच उमजेना ?
माणसाला माणसाकडून अजिबात प्रेम मिळेना ?
अहंकार कुरवाळल्याने प्रेमाचे झरे आटलेत अन्
आधार गमावल्यामुळेंसायकियाट्रिकजवळचे झालेत !
भ्रमामध्ये राहु नका जागं व्हा थोडं माणसा शिवाय माणसाचं सुटत नसतं कोडं!
 जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत...
अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण!
 *****
खूप गोंधळ झाला जेव्हा...
 बायोलॉजीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजेशरीरातील पेशी
फिजिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजेबॅटरी’,
 इकॉनॉमिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजेविक्री’,
हिस्ट्रीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजेजेल’,
 इंग्रजीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजेमोबाइल’,
आणि खरं म्हणजे जेव्हा पत्नीने सांगितले की सेल म्हणजेडिस्काउंट’!
*****
जो पर्यंत आयुष्य आहे ..... रोज डी पी बदला! नंतर तर एकाच फोटोमध्ये लटकून रहायचे आहे. तोही पोरांनी लावला तर!

(internet) 

रस्त्याच्या कारणावरून सोनलगीत हाणामारी


जत,(प्रतिनिधी)-
सोनलगी (ता.जत) येथे रस्त्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. या प्रकरणी उमदी पोलिसांत बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत उमदी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोनलगी ते हळ्ळी ही पूर्वीपासून बैलगाडी वाट आहे. मात्र या परिसरातील जगताप कुटुंबियांनी ही वाट बंद करून त्याठिकाणी द्राक्षबाग लावली आहे. या परिसरात राहणार्या लोकांना दुसर्याच्या शेतातून वाट काढून देण्यात आली. परंतु,त्यांनीही वाट अडवल्याने या वाटेवरून जा-ये करण्यार्या लोकांची पंचाईत झाली आहे. त्यांना सोनलगी गावाला जाण्यासाठी दुसरीकडून वाट नाही. या परिसरात पन्नासभर लोकांची वस्ती आहे.
फिर्यादी नामदेव हंडेबार, बसवराज नडसे, तुकाराम कांबळे आदींनी कायदेशीररित्या जत तहसीलदार यांच्याकडे दाद मागितली आहे. तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची समज जगताप कुटुंबियांना दिली होती. परंतु तरीही हा रस्ता मोकळा करण्यात आला नव्हता. शेवटी तहसीलदार यांच्या आदेशान्वये जेसीबी लावून रस्ता मोकळा करत असताना जगताप यांच्याकडील लोकांनी फिर्यादींवर हल्ला चढवला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अण्णाराया जगताप, पुंडलिक जगताप, केदारी जगताप, तुकाराम जगताप, संजू जगताप, मंजू जगताप, विलास जगताप, संतोष जगताप, मल्लाप्पा जगताप, अंबादास जगताप, मांतेश जगताप हे सर्व पसार झाले आहेत.




जत तालुका दुष्काळ जाहीर करा: सोमनिंग बोरामणी


जत,(प्रतिनिधी)-
सीमावर्ती जत पूर्व भागात खरिप पूर्ण वाया गेला आहे. आता रब्बीचीही शाश्वती राहिलेली नाही.त्यामुळे राज्य शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बेळोंडगी (ता.जत) येथील विकास सोसायटीचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
जत तालुक्यातल्या पूर्व भागातला शेतकरी पावसाअभावी देशोधडीला लागला आहे. सलग तीन वर्षे खरिप आणि रब्बी हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे सध्या या भागातला शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मॉन्सून पावसाचे चारही महिने संपले तरी एकही पाऊस झालेला नाही. पिके वाळून गेली.त्यामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्यायला पाणी नाही. अशा बिकट अवस्थेत या भागातील माणसे जगत असताना लोकप्रतिनिधी मात्र आवाज उठवायला तयार नाहीत. शासनही काही पावले उचलायला तयार नाही. अशा परिस्थितीत लोकांनी जगायचे कसे आणि कुणाकडे पाहयचे, असा सवाल श्री. बोरामणी यांनी केला आहे.
जत पूर्व भागातील संख,भिवर्गी,तिकोंडी,बोर्गी, जाडरबोबलाद,उटगी,सोन्याळ,माडग्याळ या भागात पाऊसच झाला नाही. पिके वाळून गेली. अजूनही पाऊस नसल्याने रब्बी पिकाचीही शाश्वती राहिलेली नाही. शेतकर्यांनी बहुचर्चित विमा भरला पण काहींना तटपुंज्या रकमा मिळाल्या. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. डाळिंबासारखी या भागातल्या लोकांना वरदायी ठरणारी पिकेदेखील हातची गेली आहेत. सध्या चार्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे.त्याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे. चार पैसे मिळायचे तेही बंद झाले आहे. खिशात दाम नाही,हाताला काम नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत करावी अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

आश्रमशाळांची चौकशी होणार असल्याने संस्थाचलाकांचे धाबे दणाणले


जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातल्या कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थीनींवर झालेल्या लैगिंक अत्याचराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच आश्रमशाळांची कसून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. हकनाक कर्मचार्यांना वेठीस धरून त्यांची पिळवणूक करणार्या आणि विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याची चर्चा होत आहे.
राज्यात अनेक ठिकाणच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना सातत्याने होत असून त्यामुळे गरीब घरच्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संस्थाचालक, शिक्षक त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन लैंगिक अत्याचार करत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. सांगली जिल्ह्यातल्या कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेतही अशा प्रकारची अत्याचारे झाल्याचे उघड झाल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संस्थेचा चालकच या मुलींचे लैंगिक शोषण करत होता. सध्या तरी फक्त सात मुलींवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. याची अजून चौकशी सुरू आहे. या घटनेने जिल्हा हादरला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण आश्रमशाळांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारी कार्यालयातील विविध खात्यांच्या महिला अधिकारी आणि कर्मचार्यांची पथके नियुक्त करून त्यांच्यामार्फत ही चौकशी होणार आहे. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सचिन कवले यांच्या माहितीनुसार जिल्ह्यात 39 आश्रमशाळा आहेत. सर्वच आश्रमशाळांचा कारभार संशयास्पद आहे. याबाबत सातत्याने समाजात चर्चा होत असते.पण त्याबाबत पुढील कार्यवाही कधीच झाली नाही. वास्तविक कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेतील मुलींवर संस्थाचालक अरविंद पवार हा नराधम अत्याचर करत असल्याचे एका निनावी पत्राद्वारे उघडकीस आले. त्याचा उद्रेक सर्वत्र झाला असून जिल्ह्यातील सर्वच आश्रमशाळांची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. त्यानुसारच आता सर्व आश्रमशाळांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.यामुळे साहजिकच संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यातल्या अनेक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण होत असल्याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर काही संस्थाचालक शिक्षक, कर्माचारी यांचीही अधिक काम लावून पिळवणूक होत असल्याची चर्चा होत आहे. मुलांसाठी बायोमेट्रिक हजेरी असली तरी त्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे. महिन्याच्या शेवटी सर्वच मुलांची उपस्थिती शंभर टक्के लावली जाते,मात्र कर्मचार्यांना याच्या नावाखाली आर्थिक आणि मानसिक त्रास दिला जातो. अनेक कर्मचार्यांना संस्थाचलाकाच्या घरी पाणी भरण्यासारखी कामे करावी लागत आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांना शाळांमध्ये थांबवून कामाला लावले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के लावली जाते,यात काही अधिकारीदेखील सामिल असल्याचे बोलले जात आहे.
प्रशासनानेही आश्रमशाळांच्या चौकशीचे उचललेले पाऊल कडक स्वरुपात घेण्याची आवश्यकता आहे. मुलींची त्यांना विश्वासात घेऊन चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कर्मचार्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. यातून सर्व काही आलबेल आहे, असे बाहेर पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



Saturday, September 29, 2018

आयुष्यमान भारतसाठी पात्र यादी ग्रामपंचायत, नगरपालिकांमध्ये लावावी


जत,(प्रतिनिधी)-
देशभरातील दहा कोटी गरिबांना आरोग्यसेवेची हमी देणारी आयुष्यमान भारत योजना नुकतीच सुरू झाली आहे. ही योजना गरिबांसाठी असून त्यांच्या आजारांवर पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहेत. देशभरातील 40 टक्के लोकांना याचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत असली तरी या योजनेचा लाभ कुणाला मिळाला, याची माहिती होण्यासाठी पात्र यादी सर्व ग्रामपंचायती, नगरपालिकांमध्ये लावण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

2011 मध्ये सामाजिक व आर्थिक सर्व्हेक्षणानुसार पात्र ठरलेल्या, कच्चे घर, कुटुंबप्रमुखपदी महिला, अपंग यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी सदस्य संख्या किती असावी, याची काही मर्यादा नाही. शिवाय यासाठी नव्याने नाव नोंदणी करण्याची गरज नसल्याने अनेकांना या यादीत आपले नाव आहे की नाही, याची कल्पना नाही. अनेक गरजू हे निरक्षर, अल्पशिक्षित आहेत. या लोकांपर्यंत ही माहिती पोहचणे आवश्यक आहे.
या योजनेचा खरोखर लाभ मिळण्यासाठी अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि ग्रामसेवक यांची मदत घेणे गरजेचे आहे. या योजनेची व्याप्ती मोठी आहे. यापूर्वीची महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून एक लाखापर्यंतची मदत मिळायची. आता या आयुष्यमान भारत योजनेसाठी पाच लाखापर्यंतचे आर्थसहाय्य मिळणार आहे. आता प्रधानमम्त्री जनआरोग्य योजनेंतर्गत गोल्डन ई-कार्ड दिले जाणार आहे. योजनेत समाविष्ट दवाखान्यात आयुष्यमान मित्र असतील. लाभासाठी पात्र असल्याची निश्चिती आधार कार्डाद्वारे होईल. कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित छायाचित्र आधार क्रमांकासह द्यावे लागणार आहे. ही माहिती एका डेटाबेसमध्ये भरली जाणार आहे. यासाठी गावपातळीवर शासनाकडून विशेष मोहिम राबवण्याची मागणी होत आहे.
या योजनेतून तब्बल एक हजार 300 विविध आजारांवर उपचार होण्यास मदत होणार आहे. कॅशलेस,पेपरलेस व पोर्टेबल अशी ही योजना आहे.देशातील सुमारे 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना याचा लाभ मिळणार असून देशातील 13 हजार पेक्षा जास्त सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार होणार आहेत.देशातील कोणत्याही राज्यातील दवाखान्यात उपचार मिळणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा, यासाठी शासनाकडून गावपातळीवर विशेष मोहिम राबवावी आणि पात्र यादी ग्रामपंचायत, नगरपालिकेत लावावी, अशी मागणी होत आहे.



थोडक्यात पण महत्त्वाचे


  जत शहरातील शिवनगर मित्रमंडळाच्यावतीने नागरिकांना डस्टबीनचे वाटप करण्यात आले. या मंडळाच्यावतीने गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. कायलीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा उपक्रम यंदा राबवण्यात आला. जवळपास 700 गणेशमूर्ती जमा करून नंतर अथणी (जि. बेळगाव) येथील हल्याळजवळील कृष्णा नदीत विसर्जित करण्यात आल्या. यंदा स्वच्छतेला महत्त्व देत मंडळाने परिसरातील 150 कुटुंबांना डस्टबीनचे वाटप करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पापा कुंभार, नगरसेवक उमेश सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
  जत शहरातील अंगणवाडी क्रमांक 181,182 आणि 164 मध्ये दहीहंडी, प्रभातफेरी आणि वजन,उंची मापन असे विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. शुभांगी बन्नेनवर, नगरसेविका सौ. दीप्ती सावंत आणि स्वाती हिरवे उपस्थित होत्या. राष्ट्रीय पोषण आहार अभियानांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका प्रतिभा जेऊरकर, शकुंतला संकपाळ, शकु शिंदे, कविता पाथरुट, कल्पना जेऊरकर आदी उपस्थित होते.
  गोंधळेवाडी (ता.जत) येथील सदगुरु बागडेबाबा मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी राळेगणसिद्धी येथे समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली व जत तालुक्यात येण्याचे निमंत्रण दिले. मम्गळवेढा तालुक्यातील चिकलगी (भुयार)येथे अध्यात्माबरोबरच उद्योग उभारणी करून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तुकाराम महाराज यांनी अण्णा हजारे यांना यावेळी सांगितले.



बारावीचे अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबरपासून सुरुवात


जत,(प्रतिनिधी)-
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीचे अर्ज 1 ऑक्टोबरपासून भरता येणार आहेत. यंदा पहिल्यांदाचसरलया पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरले जाणार आहेत. यासाठी नियमित तसेच पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.  
     राज्य मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी राज्यातून साधारण 15 लाख विद्यार्थी बसतात. या परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या तारखा मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी 1 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत नियमित शुल्कासह संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी यंदा प्रथमच सरल या डेटाबेसवरून अर्ज भरावयाचे आहेत तर, व्यावसायिक अभ्यासक्रमवाल्या विद्यार्थ्यांची यात नोंद नसल्याने त्यांनी प्रचलित पद्धतीनुसार अर्ज करायचे आहेत, असेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान जे विद्यार्थी 21 नंतर अर्ज भरतील त्यांना विलंब शुल्क द्यावे लागणार आहे. विलंब शुल्क देऊन अर्ज करण्याची तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. बारावीचे हे अर्ज स्वीकारत असताना सरल डेटामध्ये या विद्यार्थ्यांची आधीपासूनच नोंद असणे आवश्यक आहे.

Time please: स्वत:चेच प्रतिबंब


एके दिवशी एका कार्यालयात एक शवपेटी ठेवली गेली आणि त्या पेटीवर एक फलक लावला होता. येणारा प्रत्येक कर्मचारी समोरचा फलक वाचून आश्चर्यचकित होत होता. फलकावर लिहिले होते- ‘तुमची या कंपनीतील प्रगती रोखणार्या व्यक्तीचा काल मृत्यू झाला आहे, त्याच्या अंत्ययात्रेत नक्की सामिल व्हा!‘ प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊन पाहू लागला. शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फारले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना. कारण, शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. त्या आरशात प्रत्येकाला स्वत:चेच प्रतिबंब दिसत होते. शवपेटीच्या जवळच आणखी एक छोटा फलक ठेवला होता. त्यावर लिहिले होते, ’या जगात तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे कोणी असेल, तर ते आहात तुम्ही स्वत:!’ कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टींमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही करत असता तुमच्यासाठी! आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसर्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही. दुसर्याआड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल? तुम्ही तेव्हाच मोठे होऊ शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.

*****
ऑफिसमधील खुर्चीपेक्षा शाळेचा बाकच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. संगणकाचीस्क्रीन’, आज प्रिय असली, तरी माझ्य शाळेचाफळाचबरा होता. बॉसच्या सततच्या शिव्यांपेक्षा, बाईंच्या छडीचा मारच बरा होता. मोबाईल वरील रग्गड गेमपेक्षा, मैदानी खेळाचा थाटच बरा होता. आलो शहरात सुख मिळविण्यासाठी, पण गड्या आपला गावच बरा होता..!
 *****
मी काय म्हणतो, मी हजारो लिटर बियर रस्त्यावर ओतायला तयार आहे. मला कर्जमाफी मिळेल का? आपलाच, विजय मल्ल्या
****
एका बसमध्ये एक मुलगा भरपूर चॉकलेट खात होता. ते पाहून शेजारी बसलेले काका म्हणाले, ‘अरे, एवढी चॉकलेट खाऊ नकोस. दात किडतात. तुला माहीत नाही का ? मुलगा : माझे आजोबा 110 वर्ष जगले. काका : त्याचा काय संबंध. ते काय चॉकलेट खायचे का? मुलगा : नाही, पण ते दुसरे काय करतात, याकडे लक्ष देत नव्हते.

खलाटीच्या तरुणाच्या खूनाचा उलघडा

त्रास देत असल्याने केला खून
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील खलाटी येथील एका तीस वर्षीय तरूणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची  घटना 21 सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली होती. या खूनाचा उलघडा झाला असून आरोपी  रावसाहेब तुकाराम शिंदे (वय 45,रा. खलाटी) यास जत पोलिसांनी आरेवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथून अटक केली. मयत खंडू सिद्धू नाईक हा आपल्याला दारू व तंबाकूसाठी त्रास देत होता, अशी कबुली आरोपी रावसाहेब शिंदे याने दिली आहे.
21 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन झाल्यावर मध्यरात्री   खंडू सिध्दू नाईक (वय-30) हा जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात दारू पिऊन झोपला होता. त्यावेळी शिंदे याने त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. यात तो जागीच गतप्राण झाला. पोलीसांना सांगितलेल्या जबानीत त्याने नाईक आपल्याला गेल्या वर्षभरापासून दारू आणि तंबाकू दे, असे म्हणत वारंवार त्रास देत होता. दारू,तंबाकू दिली नाही तर तुला मारून टाकतो, अशी धमकी देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. गणपती विसर्जनानंतर तो एकटाच शाळेच्या आवारात झोपला होता. ही संधी साधून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला.
आरोपी रावसाहेब शिंदे हा खून झाल्यानंतर गावातून गायब झाला होता. पोलीस त्याच्या मागावरच होते. तपास अधिकारी गजानन कांबळे यांना तो आरेवाडी येथे असल्याचे समजल्याने आज सकाळी त्यांनी आरोपीला तिथून ताब्यात घेतले. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

इंधन दरवाढीवर कायमचा तोडगा काढण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
देशात पेट्रोल दरवाढीने १.३0 कोटी जनतेची होरपळ केल्याचे दिसून येत आहे. देश विकासाच्या मार्गाकडे जात असताना आज पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर सरकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. पेट्रोलने किमतीची हद्दपार केल्याचे दिसून येते. संपूर्ण जगाच्या पाठीवर पेट्रोल सर्वात जास्त महाग असेल तर भारतात. त्यामुळे भारतात हे चाललय तरी काय, असा सवाल उपस्थित होत असून महागाई वाढत चालली आहे. इंधन दरवाढीवर नियंत्रण न आणल्यास महागाईबरोबरच जनक्षोभ वाढल्याशिवाय राहणार नाही.
 एका माहितीनुसार भारतातून १५ देशामध्ये ३४ रुपये लिटरच्या दराने पेट्रोल निर्यात केले जाते. व रिफाईंड डिझेल २९ देशांमध्ये ३७ रुपये दराने निर्यात केले जाते. श्रीलंकेमध्ये ४६ रुपये दराने पेट्रोल विकते. श्रीलंकेला ४६ रुपये लिटर दराने विकणे परवडते मग भारतात ८७.0४ रुपये लिटर पेट्रोल का? हा मोठा जटील प्रश्न आहे. जगाच्या पाठीवर मागासलेल्या देशांमध्ये एवढे महाग पेट्रोल नाही. तेवढे पेट्रोल आज भारतात महाग आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानसारख्या देशात ३७ ते ४0 रुये लिटर पेट्रोल विकल्या जाते मग भारतात का नाही? जगात कच्चा तेलाच्या किंमती मोठय़ा प्रमाणात घसरल्यानंतरसुद्धा भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती आभाळाला टेकल्या आहे.
देशात महागाई मोठय़ा प्रमाणात वाढायला कारणीभूत पेट्रोल व डिझेलच्या किंमती आहेत. पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर जर सरकारने नियंत्रण आणले तर महागाई अपोआप कमी होऊ शकते, यात दुमत नाही. अनेक शहरात रस्त्यांचे, मेट्रोंचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांची हालत अत्यंत खराब झाल्याचे दिसून येते. पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर देशतील जिवनावश्यक वस्तुंची उलाढाल होत असते. बस प्रवास, रेल्वे प्रवास किंवा कोणताही प्रवास महागडा होत आहे. त्यामुळे मालभाडे वाढून महागाईवर परिणाम होत आहे. सरकारने ताबडतोब पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. याला जीएसटीमध्ये आणण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे देश सुरक्षेवर नियंत्रण ठेवून आहे त्याच प्रमाणे पेट्रोल व डिझेलवर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे.

शासकीय कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास १0 लाखांचे अर्थसहाय्य

जत,(प्रतिनिधी)-
सरकारी कर्मचारी सेवेत असताना अल्प सेवा होऊन त्याचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबीयास त्यांच्या खात्यात जमा असणार्‍या संचित निधी व्यतिरिक्त १0 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वित्त विभागाने आज त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे.
१ नोव्हेंबर २00५ किंवा त्यानंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचार्‍यांना महाराष्ट्र नागरी सेवाच्या तरतुदी लागू होत नसल्याने त्यांना निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, मृत्यू व सेवा उपदान व भविष्य निर्वाह निधीचे लाभ मिळत नाही. मृत्यू, सेवानवृत्ती, राजीनामा आदी कारणामुळे नवृत्तीवेतन निधी विनियामक प्राधिकरणाने ठरविल्या नियमानुसार वार्षिक योजनामध्ये गुंतवण्यात येऊन त्यावर कर्मचार्‍यास किंवा त्याच्या वारसास मासिक निवृत्तीवेतनाचे लाभ देण्याची तरतूद आहे. परंतु सेवेत असताना मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य करण्याची कोणतीही योजना नाही. अशा प्रसंगी संचित निधीसह आर्थिक सहाय्य संबंधित कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना करण्याचा विचार राज्य सरकारचा होता. त्यानुसार नोव्हेंबर २00५ व त्याच्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत असलेले अंशदान निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा कर्मचारी १0 वर्षे सेवा होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस, नामनिर्देशन नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास १0 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारने घेतला.या स्वागत होत आहे.

Friday, September 28, 2018

ब्राम्हण तरुणांनी उद्योगांकडे वळावे:शेखर चरेगावकर

जत,(प्रतिनिधी)-
ब्राम्हण तरुणांनी न्यूनगंड काढून टाकून तसेच नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्याकडे वळावे,असे आवाहन सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी जत येथे बोलताना केले.त्यांचा येथील ब्राम्हण सभेच्यावतीने येथे सत्कार करण्यात आला.
श्री. चरेगावकर म्हणाले,समाजापुढे कितीही समस्या असल्या तरी मेहनत ही करावीच लागते. यश,अपयश या गोष्टी निष्ठा आणि मेहनतीवर अवलंबून असते. आपल्याकडील कौशल्याची ताकद वाढवायची गरज आहे. चिकाटी व प्रामाणिकपणाच्या जोरावर चांगला व्यवसाय उभा करू शकतो. बदलाबरोबर जाण्याची तयारी ठेवावी. छोटे-मोठे उद्योगधंदे उभारून स्वबळावर उभे रहा.
कराड ब्राम्हण समाजाच्या अध्यक्षा स्नेहल भोसेकर म्हणाल्या,ब्राम्हण समाज संघटंनानी एकत्र आले पाहिजे. परिवर्तन महिलांपासून सुरुवात होत असल्याने समाजाच्या जडणघडणीत महिलांचा सहभाग असावा.पुण्यात होणाऱ्या ब्रम्हो उत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी यांनी केले. श्रीपाद अष्टेकर यांनी मनोगत व्यक्त केले. शंकर पाठक यांच्याहस्ते चरेगावकर यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदीप कुलकर्णी यांनी मानले.यावेळी प्रदीप जेऊरकर, अनिल देशपांडे,अमित कुलकर्णी,प्रफूल्ल पाठक,संजय कुलकर्णी,माधव पाठक,प्रवीण अलबाळ,रमेश वाळवेकर, बी.के. कुलकर्णी, सौ.मीरा कुलकर्णी, सौ.दया कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, आशा कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी आदी उपस्थित होते.

राज्यातील २० व्या पशुगणनेस ३० सप्टेंबरपासून सुरुवात

जत,( प्रतिनिधी)-
केंद्र सरकारने दिलेल्या सुचनेनुसार 20 व्या पशुगणनेस 30 सप्टेंबरपासून राज्यात सुरुवात करण्यात येत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते परळी येथे शुभारंभ होईल. संपूर्ण देशात एकाच वेळी ऑनलाईन पध्दतीने टॅबलेटद्वारे ही पशुगणना होत असून, राज्यात एकूण 7 हजार 126 टॅबलेटस्ची खरेदी करण्यात आलेली आहे. प्रत्येक गावात, वॉर्डात प्रत्यक्ष भेटी देऊन घरोघरी असणार्‍या पशुंची गणना डिसेंबर महिनाअखेर करण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन आयुक्त हे राज्याचे पशुगणनेचे मुख्य प्राधिकारी आहेत. राज्यात या कामासाठी 7 हजार 300 प्रगणक व 1720 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. 20 व्या पशुगणनेत गाई-बैल, म्हशी व रेडे, मेंढरे, शेळ्या, डुकरे, घोडे, शिंगरे, खेचरे, गाढवे, उंट, कुत्रे, हत्ती, ससे यांची प्रजातीनिहाय वर्गवारी व वयानुसार माहिती गोळा केली जाणार आहे.  याशिवाय कुक्कुट व कुक्कुटादि पक्षी आदींसह पशुधन क्षेत्रातील विविध उपकरणाचीही माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी येणार्‍या प्रगणकास शेतकर्‍यांनी पशुधनाची माहिती देण्याचे आवाहन डॉ. उमाप यांनी केले आहे.
अकोला येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून पशुधन विमा योजना राबविण्यात येते. याकामी केंद्र व राज्य शासनाने विमा हप्त्यांकरिता दिलेल्या एकूण 3 कोटी 3 लाख 55 हजार रुपये निधीतून राज्यातील एकूण 50 हजार पशुधन घटकांचा विमा उतरविण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे÷. फेब्रुवारी 2016 ते मार्च 2017 पर्यंत एकूण 2 लाख 97 हजार 860 जनावरांचा विमा उतरविण्यात आला. जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण 8 हजार 707 दाखल दाव्यांपैकी 8 हजार 327 मयत जनावरांचे दावे कंपनीमार्फत निकाली काढण्यात आले. त्यापोटी कंपनीने 23 कोटी 86 लाख 90 हजार रुपये जनावरांच्या मालकांना दिलेले आहेत.

जागतिक अंडी दिन 12 ऑक्टोंबरला साजरा करणार..
अंड्यांतील पोषणमूल्याचे मानवी आहारातील महत्व या विषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंडी परिषदेने घोषित केल्यानुसार जागतिक अंडी दिन दरवर्षी ऑक्टोंबर महिन्यातील दुसर्‍या शुक्रवारी साजरा करण्यात येतो. त्यानुसार पशुसंवर्धन विभागामार्फत 12 ऑक्टोंबर रोजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी उकडलेल्या अंड्यांचे वाटप व त्याचे महत्व सांगितले जाणार आहे.

शिक्षकांनो, जुनी पेन्शनच्या ठाणे ते मुंबई पायी दिंडीत सहभागी व्हा- दिगंबर सावंत

जत,(प्रतिनिधी)-
जुनी पेन्शनसाठी शिक्षक बांधवांसह अन्य विभागातील कर्मचारी 1 आणि 2 ओक्टोबर रोजी आंदोलन करीत आहे. या लोकांना जुनी पेन्शन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांसह  अन्य शासकीय कर्मचारी वर्गांनी या प्रकरणी 2 ऑक्टोबर रोजी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन  'शिक्षक भारती'  दिगंबर सावंत यांनी केले आहे.1 नोव्हेंबर 2005 नंतर  शासकीय सेवेत आलेल्या  सर्व कर्मचारी यांना शासनाने परीभाषिक अंशदान पेन्शन योजना / राष्ट्रीय पेन्शन योजना लागु केली आहे.मात्र ही योजना सरकारी कर्मचारी यांच्या आर्थिक हिताची नसून यातून कर्मचारी वर्गाचे भविष्य अंधःकार मय आहे त्यासाठी शासनाने शिक्षक व कर्मचारी यांना
1982 पेन्शन योजना आणि 1984 भविष्य निर्वाह निधी योजना सुरू  करून  कर्मचारी वर्गाचे हित जोपासवे अशी मागणी वारंवार करून ही शासन याकडे दुर्लक्ष करीत केलेलं आहे, ही अतिशय खेदाची बाब आहे  महाराष्ट्र शासनाने तात्काळ अंशदान पेन्शन बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी महाराष्ट्र शासनाने जर जुनी पेन्शन योजना लागू नाही केली तर येणाऱ्या काळात शिक्षक व इतर कर्मचारी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत यासाठी सरकारने लवकर निर्णय घ्यावा.
 जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणी साठी   शासनाचे लक्ष वेधण्यासासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोबर रोजी तिनहात नाका जिल्हा ठाणे येथून मंत्रालय मुंबई पर्यंत पायी दिंडी आंदोलन जाहीर करण्यात आले आहे या पायी दिंडीत जत तालुक्यातील शिक्षक व इतर सर्व कर्मचारी यांनी   होऊन ही दिंडी यशस्वी करावी असे आवाहन  शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी केले आहे यावेळी अविनाश  सुतार बाळासाहेब सोलनकर दशरथ पुजारी शौकत नदाफ मल्लय्या नांदगाव,दयानंद रजपूत इ शिक्षक उपस्थित होते

२९ सप्टेंबर शौर्य दिन साजरा करणार

जत,(प्रतिनिधी)-
२९ सप्टेंबर २0१६ रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे २९ सप्टेंबर हा दिवस भारतवासियांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत जावी तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत २९ सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.
देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी, परकीय शक्तीपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी, आपत्ती काळात देशबांधवांच्या मदतीसाठी सज्ज असणारे, कोणत्याही अडचणीत आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारे भारतीय सैनिक हे आपल्या सर्वांसाठी आदर आणि अभिमान आहेत. भारतीय सैनिकांचे काम हे निश्‍चितच गौरवाचे, कर्तृत्वाचे आणि अभिमानाचे असून यांचे फार मोठे ऋण आपल्यावर आहेत. भारतीय सैनिकांचा सन्मान आणि सत्कार या भावनेतून शौर्य दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. आपल्याला सैनिकांप्रती असलेली भावना अधिक वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे.
शौर्य दिनाच्या निमित्ताने सैनिकांप्रती आपल्याला असलेली आदराची भावना अधिक वृध्दीगंत व्हावी यासाठी सर्व जिल्हाधिकारी /जिल्हा सैनिक अधिकारी यांनी त्यांच्या जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिकांच्या विधवा/शहीद जवानांचे कुटुंबिय यांना शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास सन्मानपूर्वक निमंत्रित करुन त्यांचा यशोचित सत्कार करावा. शौर्य दिनानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रम माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करावा. तसेच या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सदस्यापासून ते सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना आमंत्रित करावे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हय़ातील सामाजिक संस्था,संघटनांशी समन्वय करावा. आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये माजी सैनिकांसोबत शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी यांनी सेल्फी काढून फोटोज अपलोड करावे. तसेच फोटो/व्हिडीओ क्लीप्स त्याच दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत माजी सैनिक कल्याण विभागाचे संचालक यांना पाठवावे.

दीड हजार अभियंत्यांना रोजगार मिळणार


 घरकूल योजनांची प्रभावी अंमलबजावणी
जत,(प्रतिनिधी)-
प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने 1 हजार 600 अभियंते नेमण्याचा निर्णय घेतला असून या अभियंत्यांवर घरकूल योजनांचे तांत्रिक पर्यवेक्षण, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी टाकली जाणार आहे. मार्च 2020 पर्यंत या अभियंत्यांना काम मिळणार आहे.
या अभियंत्यांची ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ओळख राहणार आहे. या माध्यमातून आवास योजनेचे उदिष्ट साधले जाणार आहे. सर्वांसाठी घरे 2022 हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून राज्य सरकारने सर्वांसाठी घरे 2020 हा कार्यक्रम हाती घेतला असून याद्वारा कमी कालावधीत ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारकडून ग्रामीण भागामध्ये आर्धिक दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, राजीव गांधी निवारा योजना आदी योजना या जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येतात. राज्य सरकारने घोषित केलेल्या डोंगराळ, दुर्गम व एकात्मिक कृती आराखड्यातील जिल्हे या भागातील नवीन 200 घरकुलांसाठी अथवा प्रगतीपथावरील 800 घरकूल टप्प्यासाठी एक अभियंता तर सलग भूप्रदेश आणि इतर भागातील नवीन 250 घरकुलांसाठी अथवा प्रगतिपथावरील 1000 घरकुलांसाठी एक अभियंता या प्रमाणे राज्यामध्ये 1 हजार 600 अभियंते बाह्य यंत्रणेद्वारे नेमले जाणार आहेत.
बाह्य यंत्रणेची निवड करण्यासाठी जिल्ह अपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणाम्ची समिती स्थापन केली आहे. बाह्य यंत्रणेची निवड करण्यासाठी गुणांकन पद्धत असून जिल्हा पातळीवर याचा निर्णय घेतला जाणार आहे.  यासाठी पात्रता ही स्थापत्य अभियांत्रिकीमधील किमान पदविकाधारक अशी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. एका घरकूलसाठी 750 ते 1200 रुपयांपर्यंत मानधन दिले जाणार आहे. मार्च 2020 पर्यंत त्यांचा कालावधी असणार आहे. अभियंते नेमण्यास राज्य सरकारने 31 ऑक्टोबर 2018 ही अंतिम तारीख दिली आहे.




उपविभागीय वादविवाद स्पर्धेत के.एम.हायस्कूल द्वितीय


जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा पोलिस दल आणि उपविभागीय निर्भया पथक यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जत,उमदी व कवठेमहांकाळ या उपविभागीय वादविवाद स्पर्धेत के.एम. हायस्कूल आणि जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
महिलांवरील अत्याचार कायद्याने की समाजप्रबोधनाने थांबतील या विषयावर जत, उमदी आणि कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याअंतर्गत या वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या विभागातून तीन-तीन विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या नऊ संघांमध्ये जत येथे जत व कवठेमहांकाळ उपविभागीय स्तरावर  पुन्हा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत जत येथील के.एम. हायस्कूलच्या कु. प्रतीक्षा भोसले आणि ऋतिक रवींद्र कांबळे या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना निलेश तुराई,मुख्याध्यापक रियाज सय्यद आणि अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पोलिस निरीक्षक राजू तासिलदार,डॉ. रवींद्र आरळी, प्रभाकर जाधव,बी. एन. जगधने यांच्या उपस्थित बक्षीस देऊन गौरवण्यात आले.



अभियंता आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाशिवाय विकासकामे अशक्य:आमदार विलासराव जगताप

जत, (प्रतिनिधी)-
 अभियंता आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असल्याशिवाय विकासकामे होत नाहीत, जत तालुक्यात अभियंत्यांनी चांगली कामे केली,असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी जत केले.
जत येथील बचत भवनमध्ये तालुका कॉन्ट्रक्टर्स असोसिएशन व बांधकाम कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने  सर विश्वेशरय्या यांच्या जयंतीनिमित्त कै. महादेव अण्णा अवताडे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट अभियंता, उत्कृष्ट अधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जगताप बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोग तज्ञ डॉ. रविंद्र आरळी होते. यावेळी  दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे, अॅड. प्रभाकर जाधव, सौ. ममता तेली, शिवाजीराव ताड उपस्थित होते. यावेळी अभियंता ते आमदार म्हणून काम केल्याबद्दल आमदार जगताप यांचा सत्कार करण्यात आला. जलसंधारणाची कामे उत्कृष्ट केल्याबद्दल कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी खोत यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, म्हैसाळ योजना पाटबंधारे कार्यालय व पंचायत समिती बांधकाम विभागातील अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत सलीम गवंडी यांनी केले. यावेळी संतोष देवकर, समिर नदाफ, शारन्नाप्पा आक्की, सुनिल जाधव, आर.व्ही.मठ, महादेव साळुंखे, ए.डी.पवार, जी.आर.पखाली, अर्षद गवंडी आदी उपस्थित होते.

Thursday, September 27, 2018

पशुधनकडील 76 पदे रिक्त: खासगी डॉक्टरांची चलती

सांगली जिल्ह्यातील चित्र;ग्रामीण अर्थकारणावर परिणाम
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात कोंबड्यांची संख्या सोडल्यास जनावरांची संख्या सुमारे 14 लाख इतकी आहे. पोल्ट्रीफार्म आणि अन्य देशी,हायब्रीड कोंबडयांची संख्या जवळपास 21 लाख आहे. जिल्ह्यातील ग्रामीण विशेषता दुष्काळी भागातील अर्थकारण या पुरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र विविध आजार, दुष्काळ आदींमुळे बळी जाणार्या जनावरांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शेतकर्यांना सातत्याने आर्थिक फटाक्याला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात पशुधन विभागाकडील सुमारे पन्नास टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहे. याचा फटका शेतकर्यांना बसत आहे.

     2012 मध्ये झालेल्या पशुधन गणनेनुसार सांगली जिल्हयात तब्बल 13 लाख 82 हजार 723 पशुधन आहे. यामध्ये गाय, म्हैस, शेळया, मेंढया, डुकरे, घोडे, गाढवे, खेचर आणि कुत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय परसदारातील आठ लाख 86 हजार 23 आणि पोल्ट्री फार्ममधील 21 लाख 39 हजार 572 कोंबडयांची संख्या आहे. यातील सर्वाधिक पशुधनांची संख्या  जत तालुक्यात आहे. दुष्काळी भागातील शेतकर्यांचे अर्थकारण शेती व्यवसायाबरोबरच पशुधनाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतीपेक्षा शेतकर्यांना जनावरांच्या संगोपनामुळे मोठा हातभार मिळाला आहे. मात्र एकीकडे दुधाचे प्रचंड उतलेले दर आणि दुसरीकडे जनावरांना वैद्यकीय उपचाराअभावी होणारे नुकसान यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ना शेतीची, ना पशुधनाची साथ यामुळे शेतकर्याची अवस्था फार वाईट झाली आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात जनावरे दगावत आहेत. पशुधन वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची वानवा असल्याचा फटका बसत आहे. याचा लाभ खासगी डॉक्टर घेत असून त्यांच्याकडून अक्षरश: लोबाडणूक सुरू आहे.
जिल्हयात जिल्हा परिषद आणि राज्य शासन अख्यत्यारितील 154 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यापैकी तब्बल 76 पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंधर्वन विभागाचे 102 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये 85 दवाखाने हे पशुधन विकास अधिकारी या पदाची आहेत यापैकी 37 दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी पदे कार्यरत आहेत. तर 48 पदे रिक्त आहेत. शिवाय राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे 52 दवाखाने कार्यरत असून यापैकी 28 दवाखान्यातील पशुधन विकास अधिकाऱयाची पदे रिक्त आहेत. साहजिकच शेतकर्यांना त्यांच्या जनावरांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरावरच अवलंबून राहावे लागत आहे. ही मंडळी याचा पुरेपूर लाभ उठवत शेतकर्यांची अक्षरश: आर्थिक पिळवणूक करीत असून राज्य शासनाने पशुधनकडील रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
    पशुधन जनगणनेनुसार जिल्हयात 14 लाख पशुधन आहे. यामध्ये जत तालुक्यात तीन लाख दोन हजार 515 पशुधन आहे. वाळवा तालुक्यात एक लाख 65 हजार 567, आटपाडी तालुक्यात एक लाख 54 हजार 797, कवठेमहांकाळ तालुक्यात एक लाख 32 हजार 137, मिरज तालुक्यात एक लाख 16 हजार 361 पशुधनाची संख्या आहे. सर्वाधिक पशुधन हे दुष्काळीपट्टयात अधिक असले तरी या तालुक्यातून पशुधन विकास अधिकाऱयांची पदे मात्र मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. साहजिकच याचा आर्थिक फटका शेतकर्यांना बसत आहे.

Time please:चिंतन


 आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावे. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणे चालू ठेवावे; पण रुसवाफुगवा, अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत मिटवावी. देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडला तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळभ राहत नाही; पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असे नाही. शरीराला आराम मिळाला तरी मन अप्रसन्नच राहते. यात महत्त्वाचा प्रश्न हाच राहतो की यात माघार कुणी घ्यायची? तर ज्याला सुखी व्हायचे आह त्याने पहिली माघार घ्यावी. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. यातील मजा ज्याला समजली तो खर्या अर्थाने आत्मिक शांततेकडे जाणारी आणखी एक पायरी चढला.
********************
 प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही किंवा असेही नाही की तो कमजोर आहे. फरक इतकाच असतो की, त्याला स्वत:च्याइगोपेक्षा नाती जपत असताना एक पाऊल मागे का होईना येण्यात कमीपणा अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही. माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही...
****************
 वाळूमध्ये पडलेली साखर मुंगी खाऊ शकते परंतु हत्ती नाही. म्हणून छोट्या माणसांना कधी छोटे समजू नका. कधी कधी छोटी माणसे सुद्धा मोठी मोठी काम करून जातात.
 ***********************
 मुंबईकर : काय हो, तुमच्याकडे आमच्यासारख्या ईस्ट वेस्ट अशा पाट्या का नसतात?
पुणेकर : एकतर आमचे दिशाज्ञान चांगले आहे आणि दुसरे म्हणाल तर आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा असते.

शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचे तक्ते दोन दिवसांत: गाडेकर


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचे तक्ते दोनच दिवसांमध्ये सर्व पंचायत समित्यांकडे पाठवण्यात येतील, असे आश्वासन मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र गाडेकर यांनी शिक्षक संघाला दिले आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव यांनी दिली.
सन 2017- 18 या आर्थिक वर्षा मधील भविष्य निर्वाह निधीचे तक्ते शिक्षकांना एप्रिलमध्ये मिळणे आवश्यक असताना काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप शिक्षकांना भविष्यनिर्वाह निधीचे तक्ते मिळाले नव्हते. त्यामुळे अनेक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतून कर्ज काढण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यासंबंधी सातत्याने शिक्षक संघाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी पोपटराव सूर्यवंशी, अरुण पाटील, श्रीकांत पवार, शशिकांत माणगावे, सुधाकर पाटील, शामगोंडा पाटील, सुरेश खारकांडे उपस्थित होते. फंडाचे तक्ते मिळाल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी असल्यास शिक्षकांनी 30 दिवसांच्या आत त्यासंबंधी तक्रार नोंदवावी, त्याबाबतची खात्री करून या तक्त्यांमध्ये दुरुस्ती केली जाईल, अशीही माहिती श्री गाडेकर यांनी शिक्षक संघाला दिली.

व्हसपेठमध्ये लांडग्यांनी केल्या 10 मेंढ्या फस्त


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील व्हसपेठ येथील तांबे वस्तीवर लांडग्याने रात्री अकरा वाजता धुमाकूळ घालून मेंढ्याच्या कळपावर हल्ला करुन दहा मेंढ्या फस्त केल्या. त्यामुळे तांबे वस्तीवर मोठा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
तांबेवस्तीवरील बिराप्पा पांडुरंग तांबे यांचे घरावर बुधवारी रात्री 11 वाजता चार ते पाच लांडग्याच्या कळपाने अचानक हल्ला केला. कुटुंबातील सर्व लोक घरात झोपले होते त्यामुळे रात्री आलेल्या लांडग्याची चाहूल लागली नाही. मेंढ्यांच्या ओरडण्याने घरातील सर्व लोक बाहेर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर दंगा केल्यानंतर शेजारील वस्तीवरील ग्रामस्थ येईपर्यंत लांडग्याने पळ काढला. तलाठी व वनरक्षक हुग्गे, डॉ. . एस. राठोड यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यामध्ये एक लाख वीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.

गुगवाड येथे मटका अड्ड्यावर छापा; सव्वालाखाचा ऐवज जप्त

 जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील गुगवाड येथे मटका अड्ड्यावर सांगली येथील विशेष पोलीस पथकाने छापा टाकून सुमारे एक लाख 25 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
यात रोख एक लाख रुपये   व तीन मोबाईल यांची  किंमत पंचवीस हजार रुपये असा एकूण एक लाख पंचवीस हजाराचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी तीन संशयीत आरोपीना पोलिसांनी  अटक केली आहे. संजय ऐवळे ,पुंडलिक मांग , मल्लिकार्जुन अंदानी अशी  अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून  दोघे संशयीत  सिंकदर पठाण (रा. कुपवाड,सांगली) व अमित केरीपाळे (रा. जत) हे  फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
सांगलीच्या विशेष पोलीस पथकास गुगवाड येथे  मटका अड्डा सुरू आसल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी ही कारवाई केली, या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार डी.एस कोळी हे करत आहेत.

जतच्या राजे रामराव महाविद्यालयात तिसऱ्या दिवशीही प्राध्यापकांचा संप सुरूच

जत,(प्रतिनिधी)-
प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी मंगळवार दि.25 सप्टेंबर पासून बेमुदत संप सुरु आहे. राजे रामराव  महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाकडील सर्वच प्राध्यापकांनी संपामध्ये सहभाग घेतल्यामुळे संपाला शंभर टक्के पाठिंबा मिळाला आहे. आज तिसऱ्या दिवशीही संप सुरूच असून या संपाचा परिणाम विद्यार्थी वर्गावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. प्राध्यापक वर्गात नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.                                    महाविद्यालयातील या संपाला राष्ट्रीय  काॅग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष व विद्यार्थी संघटनांनी जाहिर पाठिंबा दिला आहे. संपाला पाठिंबा देतांना राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल माने म्हणाले की, शिक्षक हा राष्ट्राचा कणा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शासनाचे या संपाकडे वेळीच लक्ष देऊन संप मिटवावा, अशी मागणी केली.    
      राजे रामराव महाविद्यालयात वरिष्ठ विभागामध्ये 3500 विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. प्राध्यापकांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. प्रथम सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या असून अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार व् प्राध्यापक संघटनानी एकत्र बसून यांवर तोडगा काढावा अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडून होत आहे. सूटा संघटनेचे स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा.अशोक हेरवाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे.

Wednesday, September 26, 2018

खैराव येथे प्रपंच मसाले या उद्योग समूहाचे उदघाटन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील खैराव येथे घोंगडे बंधू यांचे 'प्रपंच मसाले' या नव्या उद्योग समूहाचे उदघाटन बँक इंडियाचे व्यवस्थापक (महा प्रबंधक) सी.बी.गुडसकर यांच्या हस्ते झाले.
 या  कार्यक्रमाप्रसंगी गुडसकर यांनी सामाजिक बांधिलकी, उद्योजकता व सध्याच्या परिस्थितीत उद्योग कशा पद्धतीने करावा व चालवावा, या व्यवसायासंबंधीचे  मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच खैराव सारख्या ग्रामीण भागात मसाले उद्योग व फूड्स सारखे मोठे व्यवसाय सुरु केले बद्दल घोंगडे बंधूचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी बँक ऑफ इंडिया शाखा जाडरबोबलादचे व्यवस्थापक अविनाश श्रीवास्तव,कॅशियर गणेश, खैराव ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्री.गुडसकर यांना खैराव ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.या वेळी सरपंच राजाराम घुटुकडे,सखाराम घुटुकडे,कुमार काळे, नवनाथ चौगुले,दऱ्याप्पा क्षीरसागर,शहाजी भोसले ,भारत क्षीरसागर आदी  उपस्थित होते

भाजीमंडई आता थोरल्या वेशीत भरणार


जत,(प्रतिनिधी)-
अनेक वर्षे रेंगाळलेल्या भाजीमंडईचा प्रश्न आता सुटला असून हा भाजीपाला विक्रीचा बाजार जत वाचनालयाजवळील थोरल्या वेशीत भरणार आहे. या बाजारासाठी सत्ताधारी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. यामुळे स्टेट बँक, तेली गल्ली या परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
थोरल्या वेशीतील भाजीमंडईच्या कामाचा शुभारंभ नुकताच नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांच्याहस्ते करण्यात आला. येत्या तीन महिन्यात काम पूर्ण करून भाजीमंडई याठिकाणी हलवण्यात येईल, असेही सौ. बन्नेनवर म्हणाल्या. यावेळी इकबाल गवंडी,श्रीकांत शिंदे, भूपेंद्र कांबळे, टीमू एडके, सुजय शिंदे,स्वप्निल शिंदे, प्रवीण जाधव, अरुण साळे, निलेश बामणे, नामदेव काळे, अनिल कोळी या नगरसेवकांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या भाजीमंडई स्टेट बँक,जयहिंद चौक, तेली गल्ली, निलसागर लॉज, मारुती मंदिर, लोखंडी पूल, अशा संपूर्ण बाजारपेठेत भरत आहे.त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. भाजीमंडईसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती.पण यासाठी पर्यायी जागांवर सहमती होत नव्हती.मात्र सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाने या जागेसाठी मंजुरी देऊन कामालाही सुरुवात केली आहे. यामुळे मंगळवार पेठ, जयहिंद चौक मोकळा श्वास घेण्यास सज्ज झाला आहे.