Thursday, January 26, 2023

उमदी काल आणि आज

 नारायणपूर ते उमदी प्रवास

     

 जत तालुक्यात उमदी शहराला अनन्यसाधारण महत्त्व असुन,२५००० लोकसंख्या व तालुक्यात सगळ्यात जास्त महसुल क्षेत्र असलेल्या उमदीला अतिमहत्तवाचे व्यापारी शहर मानले जाते...उमदी (नारायणपुर) व उमदी परिसराचा आध्यात्मिक, सामाजिक , शैक्षणिक, आर्थिक,कृषी ,राजकीय अशा विविध क्षेत्रांचा अष्टांग विकास साधला जात आहे.उमदीचा ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व सुद्धा खुप मोठा आहे.कालिका मातेच्या प्रत्यक्ष पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी (मर्चंडी) उमदी होय. उमदीत पुर्वी ९ नारायण मंदीरे होते.त्यामुळे उमदीचे नांव  नारायणपुर असे होते. आदिलशहांची स्वारी उमदीतुन जाताना त्यांनी याठिकाणी थांबुन पाणी पिलेे.पाणी पिल्यानंतर त्यांनी एक वाक्य उच्चारला ' क्या उमदा पानी है' (उमदा म्हणजे गोड)यावरुन तेंव्हापासुन नारायणपुर हे नांव बदलुन उमदी असे ठेवण्यात आले असा इतिहास आहे.अन्यायी व अत्याच्या-यांचे कर्दनकाळ व भक्तांच्या हाकेला धाऊन येणा-या श्री वीरमलकारसिद्धांची पुण्य भूमी ही उमदीची ओळख आहे.इंचगिरी सांप्रदायाचे जनक सद्गुरू श्री.भाऊसाहेब महाराजांचे जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून उमदीला ओळखले जाते.जीवंत देव श्री श्री श्री सिद्धेश्वर आप्पाजींचे १९९८मध्ये एक महिने वास्तव्य उमदीतच होते.उमदीच्या सीमेत आणि सीमेलागून असलेले बीजगुंती हे महालिंगरायांचे कर्मभूमी आणि सिद्धीभूमी.आणि उमदीचे बेदाणे म्हणजे सातासमुद्रापार असलेल्यांअस्सल खवय्यांसाठी अस्सल मेजवानी.अशा या पुण्यपावन भुमीबद्दलचा हा छोटासा लेखाजोखा

जत तालुक्यात दोन गावांना शहरी दर्जा देण्यात आला आहे (URBAN /Cities)१.जत२.उमदी

धार्मिक क्षेत्रे- (काही प्रमुख मंदिरे) 

१.श्री वीरमलकारसिद्ध मंदिर (अन्याय व अत्याचाराचा बिमोड करणारा,सामान्यांचा रक्षण करणारा जागृत देवस्थान..१२ महीने भक्तांची मांदीयीळी,६०वर्षातुन एकदा देवास सुवर्ण लेप.२००८ साली ३ महिने सुवर्णलेप समारंभ संपन्न )

२.सद्गुरु समर्थ भाऊसाहेब महाराज पीस फाऊंडेशन मठ (भाऊरायांचा जन्मस्थळ उमदी व इंचगिरी सांप्रदायाचे जनक म्हणुन त्यांना ओळखले जाते.येथे  RSS प्रमुख मोहनजी भागवत वर्षातुन किमान एकदा तरी दर्शनास येतात,बरेच साधू, संत,साधक, मंत्री ,खासदार,आमदार ध्यान व दर्शनास येतात)

३.श्री वीरभद्रेश्वर मंदिर -एक सुंदर मंदिर(याच मंदिरातील साधकांच्या सांगण्यावरुन जत येथे यल्लम्मा देवीचे मंदिर जतच्या राजेंनी बांधला)

४.श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर (समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले मंदिर)

५.माता मर्चंडी देवी (मर म्हणजे झाड आणि चंडी म्हणजे कालिका माता.स्वयं कालिका माता राक्षसांचा संहार करुन जाताना विश्रांतीसाठी  एका झाडाखाली बसले. हे शक्तीपीठ उमदी शहरापासून पश्चिमेला पाच किमीवर असलेले  मर्चंडी तांडा होय.) 

६.माता परमेश्वरी आंबा भवानी मंदिर

७.श्री महादेव मंदिरे २ 

८.जगद्ज्योती श्री बसवेश्वर मंदिर

९.अमोघसिद्ध मंदिर(निसर्गरम्य)

१०.चिनगी बाशा दर्गा(आदिल शहाचे गुरु)

११.पीर हैद्री ख्वाजा दर्गा

१२.श्री सिद्धरामेश्वर मंदिर(जन्म ठिकाण ३ कि.मी.)

१३.श्री नारायण मंदिर(उमदीत ९ नारायण मंदिरे होते याचा शिलालेख उपलब्ध आहे.याच मंदिरांमुळे पुर्वी उमदीचे नांव नारायणपुर होते असा

 उल्लेख आहे.)

१४.जगद्गुरु श्री मौनेश्वर महास्वमीजी मंदिर उमदी

१५.श्री महादेव मंदिर लहान उमदी

१६.श्री मल्लिकार्जुन देवालय

१७.श्री.महलिंगराया मंदिर,बीजगुंती(महालिंगरायांचे प्रथम स्थान)

१८.श्री मरगुबाई मंदिर

१९.श्री विठ्ठल रखुमाई मंदिर (पंढरपूर रोड) 

२०.श्री लक्काताई मंदिर 

२१.श्री दत्त मंदिर (पोलिस स्टेशन) 

अजुन बरेच मठ, मंदिरे सांगता येतील.

श्री श्री श्री  सिद्धेश्वरमहास्वामीजी- या  पावन पवित्र भुमीत श्री.श्री.श्री.सिद्धेश्वरआप्पाजींचे १९९९ मध्ये एक महिना अखंड प्रवचन कार्यक्रम चालला होता..या प्रवचन कार्यक्रमात परदेशी लोकांचा सुद्धा समावेश होता.)

उमदीजवळील तिर्थक्षेत्रे- १.श्रीक्षेत्र दानम्मा देवी देवस्थान(गुड्डापूर ३०किमी)  २.श्रीक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी देवस्थान (पंढरपूर ५५किमी)  ३.श्रीक्षेत्र महात्मा बसवेश्वर (मंगळवेढा बसवेश्वरांचे मंगळवेढेत १४ वर्षे वास्तव्य,३० किमी)  ४.श्रीक्षेत्र संत दामाजीपंत देवस्थान (मंगळवेढा)  ५.श्रीक्षेत्र सिद्धरामेश्वर देवस्थान (सोनलगी, सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांचे जन्मस्थान, ३किमी) ६.श्रीक्षेत्र गुरूलिंगजंगम महाराज देवस्थान (देवरनिंबरगी, ८किमी)  ७.श्रीक्षेत्र बलभीम देवस्थान (देवरनिंबरगी )  ८.श्रीक्षेत्र भाऊसाहेब महाराजांचे समाधी स्थळ(  इंचगिरी, किमी २०) ९.श्रीक्षेत्र अल्लमप्रभू देवस्थान (बालगांव, ७किमी) 

श्रीक्षेत्र अमोघसिद्ध देवस्थान ( आरकेरी ४० किमी) 

उमदीतील शाळा व महाविद्यालये- १.पदव्युत्तर महाविद्यालय (MA) २.महाविद्यालय (BA ,BSc,BCom) ३.ज्युनिअर कॉलेजेस-3

४.Agricultural कॉलेज ५.मेडिकल व प्यारा मेडिकल कॉलेज ६.DEd कॉलेज ७.हायस्कुल-3 ८. English medium school-2 ९.प्राथमिक शाळा- 23

१०.शासकीय वसतीगृहे -5 

उमदीतील प्रमुख शासकीय प्रकल्प

१.अहमदनगर -टेंभुर्णी- पंढरपुर-मंगळवेढा- उमदी- विजयपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561A काम प्रगतीपथावर (1600करोड)

२.पंढरपुर ते उमदी वारक-यांसाठी पालखी मार्ग ..काम प्रगती पथावर ..मंजुर निधी 256 करोड.

३.पंढरपुर उमदी विजयपुर रेल्वेमार्ग सर्व्हे होऊन 1268 कोटी रूपयेमंजुर.

४.उमदी मार्केट यार्डला मंजुरी

५.उमदी नगर परीषदेचा प्रसताव लवकरच दाखल 

६.उमदी स्वतंत्र एस.टी.डेपोच्या प्रतीक्षेत.

७.वास्को टु हैद्राबाद Reliance गॅस पाईपलाईन ...उमदी येथे पंपहाऊस

शासकीय कार्यालय- १.अप्पर तहसिल कार्यालय

२.पोलिस स्टेशन( ३पोलिस अधिकारी सहीत ५०भर पोलिस कर्मचारी) ३.महिला व बालकल्याण कार्यालय (जत पूर्व भाग मुख्य कार्यलय. )  ४.टपाल कार्यालय( जत पुर्व भाग मुख्य कार्यालय) ५.सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय (जत पूर्व भाग कार्यालय)  ६.सरीता मापन केंद्र ७.एस टी महामंडळ निरीक्षक कक्ष ८.मंडल अधिकारी कार्यालय

९.तलाठी कार्यालय १०.ग्रामविकास अधिकारी कार्यालय ११.MSEB १२.टेलिफोन एक्स्चेंज ऑफिस

१३.प्राथमिक आरोग्य केंद्र  १४.सेतु कार्यालय

१५.ग्रामपंचायत कार्यालय

महामार्ग व रस्ते वाहतुक-

१.विजयपुर-उमदी-पंढरपुर-टेंभुर्णी-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१अ

२.तासगाव-कवठेमहांकाळ-जत-उमदी-चडचण राज्यमहामार्ग क्रमांक-१५५

३.जिल्हामार्ग -३   

दळवळण- उमदी येथुन ST च्या माध्यमातुन पुणे,हैद्राबाद,हिंगोली,नांदेड,लातुर,उमरगा,अक्कलकोट,परभणी,तुळजापुर,गाणगापुर,वाशिम,बीड,उस्मानाबाद,सोलापुर ,गुलबर्गा, बीदर, भालकी, विजयपुर,बेळगांव, पंढरपुर,सांगली ,जत,मंगळवेढा,इंडी विनाथांबा डायरेक्ट प्रवास करता येतो.दिवसभरातुन ७० ते ८० एस टी बसच्या फे-या उमदीतुन होतात.जत आगाराला मिळणा-या उत्पन्नापैकी उमदी मार्गावरुन मिळणारा उत्पन्न सगळ्यात जास्त आहे.त्यामुळे उमदीला लवकरच मिनी आगार मिळणार आहे.

उमदी जवळील शहरे व उमदीचे भौगोलिक महत्त्व-

१.जत ५२ किमी (पश्चिमेस)  २.पंढरपूर ५५ किमी (उत्तरेस)  ३.मंगळवेढा ३०किमी(उत्तरेस) 

४.सोलापूर ७० किमी (ईशान्येस)  ५.चडचण ११ किमी (ईशान्येस)  ६.इंडी ५० किमी (पूर्वेस)  ७.विजयपूर ५५ किमी (दक्षिणेस)

BANK व पतपेढ्या- १.Bank of India(तालुक्यात सगळ्यात जास्त व्यवहार चालणारा Bank) २.DCC Bank ३.मल्टीस्टेट Bank ४.पतसंस्था -5 ५.दोन स्वतंत्र सोसायट्या  ६.शिक्शक Bank -2

राष्ट्रीय आदर्श सरपंच इंदुमती लक्ष्मण माने-

स्वर्गीय पंतप्रधान श्री अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या हस्ते उमदी ग्रामपंचायतचे सरपंच इंदुमती लक्ष्मण माने यांना राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती लक्ष्मण माने,जत तालुका शिवसेनेचे उपाध्यक्ष शिवाजीराव पडोळकर व जत तालुका शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर हुपरीकर यांच्या  उपस्थितीत हे राष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय- व्यक्तिमत्त्व- साहित्य अकादमी चे मानकरी- श्री. नवनाथ गोरे सर- श्री गोरे सरांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या कामाची दखल घेत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सदस्यत्व खालील प्रमाणे-सदस्य - साहित्य व शांतिदूत संयुक्त राष्ट्र संघ (UNO) (दोन वर्षासाठी) सदस्य - महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ सदस्य - महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ

त्यांची फेसाटी हे लोकप्रिय कादंबरी खालील विद्यापीठानी अभ्यासक्रमासाठी निवडलेले आहे १.औरंगाबाद विद्यापीठ २.नांदेड विद्यापीठ ३.जळगांव विद्यापीठ ४.मुंबई विद्यापीठ ५.हैद्राबाद विद्यापीठ

 सरांनी लिहिलेला सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. सरांच्या गौरवप्रित्यर्थ मध्यप्रदेश सरकारनी सरांचे नांव व फोटोसह ५ रुपयाचे स्टॅंप तिकीट काढलेला आहे. 

राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक क्रांतीत यशस्वीझालेले उमदीचे सुपुत्र

१.मा.कॉम्रेड कल्लापाण्णा होर्तीकर(सांगली जिल्हयातील अग्रेसर स्वातंत्र्य सेनानी )

२.मा.स्व.सिद्रामय्या हिरेमठ (वसंतदादांचे स्वीय सल्लागार)

३.मा.नामदेवराव माने(लेफ्टनंट कर्नल ,इंडियन आर्मी)

४.मा.सुनिल पोतदार (अध्यक्ष तालुका पाणी संघर्ष समिती)

५.मा.नवनाथ गोरे ( 'साहित्य आकादमी'या अतिउच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित)

६.मा.संजय नांदणीकर सर(राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित)

७.मा.मल्लिकार्जुन माने (उपजिल्हाधिकारी)

८.मा.अमृत नाटीकार  (उपजिल्हाधिकारी)

९.मा.महादेव लोहार (डेप्युटी

      जनरल मॅनेजर,टाटा मोटर्स पुणे)

१०.मा.आप्पासाहेब लोहार (अथर्व एंटरप्रायजेस,गौरी एंटरप्रयजेस व विशाखा एंटरप्रायजेस ,बारामती)

११.मा.महांतेश बगली (एस.पी.फॉरेस्ट डिपार्टमेंट)

१२.श्रीमती रेशमाक्का होर्तीकर (माजी अध्यक्षा ,जिल्हा परिषद ,सांगली)

१३.इंदुमती माने(राज्यातील पहिले राष्ट्रीय आदर्श ग्रामपंचायतीचे सरपंच) 

१४.मा.एस.के. होर्तीकर सर(शैक्षणिक क्रांती

१५.मा.मानसिद्ध पुजारी(महाराष्ट्र कर्नाटक केसरी  ढोल गायन)

१६.मा.स्व.दाजीकाका शेवाळे(लोकमान्य नेता)

१७.मा रोहन चव्हाण (उद्योजक)

१८.मा.मधुकर पोतदार(शास्त्रद्न्य  'Geologist')

१९.मा.स्व.आण्णाप्पा कंचगार (नामवंत मुर्तिकार)


                                                                                                   उमदीची राजकीय ताकद   

१.श्रीमती रेशमाक्का होर्तीकर( माजी अध्यक्षा जिल्हापरिषद सांगली)

२.मा.विक्रमसिंहदादा सावंत  ( आमदार) 

३.मा.चन्नापण्णा होर्तीकर(मा.जि. प.सदस्य) 

४.मा.उमेशदादा सावंत( जत तालुक्याचा बुलंद आवाज व भावी आमदार) 

५.मा.संजयकुमार(आण्णा) तेली

६.मा.निवृत्ती शिंदे सरकार

७.मा.शिवाजीराव पडोळकर(उपाध्यक्ष,शिवसेना जत तालुका) 

८.सिद्धगोंडा लोणी

९.मा.सचिन होर्तीकर

१०.मा.निसारभाई मुल्ला

११.मा.सुरेश कुल्लोळ्ळी

१२मा.फिरोज मुल्ला

१३.शिवानंद कुल्लोळ्ळी

१४.मा.रेवाप्पाण्णा लोणी(माजी सभापती पंचायत समिती,जत)

१५.मा रमेश हळके(युवा नेता)

१६.मा.संतोष आरकेरी

१७.रविंद्र शिवपुरे

विश्वकर्मा पांचाळ समाज-एक कलेचे माहेरघर-उमदी

विश्वकर्मा पांचाळ समाज म्हणजे कलेची देवता वास करत असलेले स्थान असे  म्हणतायेईल.यासमाजातील ,तरुण,प्रौढ,वृद्ध कलेचे भुकेले आहेत.उमदीत सोने,चांदी ,पितळ,तांबा,दगडी,लाकडी,माती,फायबर, प्लास्टरपासुन मुर्ती घडवणे,पालख्या तयारकरण्याचे कलाकुसरीचे काम  कंचगार ,सुतार,पोतदार, तांबट,लोहार कुटुंबीय अहोरात्र करतात.येथे तयार केलेले मुर्ती चेन्नई,हैद्राबाद ,बेंगलुर,मुंबई,पुणेतसेच परदेशातसुदधा पहावयास मिळतात. 

मुर्ती भांडार- १.विश्वकर्मा मुर्ती भांडार २.काळिका मुर्ती भांडार ३.मौनेश्वर मुर्ती भांडार ४.लक्श्मण मुर्ती भांडार

५.प्रकाश फर्निचर वर्क्स(पालखी तयार)  देवभूमी

     विश्वकर्म-पांचाळ समाजामुळे उमदीला देवभूमी म्हणून ओळखले जाते कारण  हजारो गावातील वेगवेगळ्या प्रकारच्या देवीदेवतांचे मुर्ती व हजारो गावातील मोहरमचे पंजे उमदीतच तयार होत असल्याने  उमदीला देवभूमी, देवीदेवतांचे माहेरघर तथा देवांचीजन्मभूमी म्हणून ही ओळखले जाते. विश्वकर्म-पांचाळ समाज हे उमदीच्या विकासातील व प्रसिद्धीतील महत्त्वाचे केंद्रबिंदू आणि मुकूटमणि म्हणून ओळखले जाते. 

उमदीत वैद्यकीय सेवा पुरविणारे डॉक्टर्स १डॉ.दस्तगीर मिरजकर(MBBS) २.डॉ.मल्लाप्पा माळी(MBBS) ३.डॉ.योगेश बार्शिकर (MD) ४.डॉ.मल्लिकार्जुन म्हेत्रे(MD) ५.डॉ.सौ.अश्विनी म्हेत्रे (MS)  ६.डॉ.गजानंद गुरव(MS)  ७.डॉ.राजेंद्र झारी (MS)  ८.डॉ रविंद्र हत्तळ्ळी(BHMS) ९.डॉ.राहुल पाटील(BAMS) १०.डॉ.सौ.स्नेहा पाटील(BAMS)  ११.डॉ शिरीष हिरेमठ(BAMS) १२.डॉ.सौ.हिरेमठ(BAMS) १३.डॉ राजकुमार भद्रगोंड(BHMS) १४.डॉ.साधीक मिरजकर(BDS)  १५.डॉ लक्काप्पा लोणी(BAMS

१६.डॉ.सौ.लोणी(BAMS) १७.डॉ.अक्षय चव्हाण (BDS)  १८.डॉ.क्रांतीवीर बिराजदार(BAMS)

१९.डॉ.सौ बिराजदार(BAMS) २०.डॉ.केदारनाथ पावटे मेडीकल्स१४ 

कृषी विषयक-जत पुर्वभाग आवर्षण ग्रस्त असुन  सुद्धा उमदीचा शेतीमधला विकास वाखाणण्याजोगा आहे.येथे पिकवला जाणारा द्राक्श व बेदाण्याला आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत सर्वात जास्त मागणी आहे.प्रत्येक वर्षी इथला बेदाणा सगळ्यात जास्त भावाने विकला जातो.आजपर्यंतच्या सौद्यात ३८१रुपये (शेतकरी-श्री रमेश कराळे) इतके सर्वोत्तम भाव सुद्धा उमदी करांच्या बेदाण्यालाच   मिळाला आहे.म्हणुन उमदी ब्र्यांड बेदाण्याला व्यापा-याकडुन खुप मोठी मागणी असते.उमदी परीसरात जवळजवळ ३०००(3 हजार) एकरावर द्राक्श शेती केली जाते.शेतक-याच्या दिमतीला व मदतीला २०भर कृषी केंद्रे आहेत.

खेळ-राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू-

उमदी सारख्या ग्रामीण भागातुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश खेचुन उमदीचे नाव.   सातासमुद्रापलीकडे आंतरराष्ट्रीय खेळात अव्वल स्थानी नोंदवले गेले आहे.त्यासाठी खेळाडुंचे कठोर परीश्रम व जिद्द आणि चिकाटी यामुळे अनेक खेळाडू घडले आणि घडविले गेले.स्वत:च्या अपंगत्वावर मात करत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारे संजय नांदणीकरसरांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले(कोच वेटलिफटिंग)व नितीन तोरणे सर(राष्ट्रीय पंच व कोच बेसबॉल व सॉफ्टबॉल)यांच्या कठोर प्रशिक्षणातुन अनेक खेळाडुंनी देशाला व राज्याला सुवर्ण,रौप्य,कांश्य पदक मिळवुन दिले.

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा

१.कु.मोहीनी चव्हाण-Gold एशियन गेम्स

२.कु रुपा हनगंडी- Silver 2 व Bronz

राष्ट्रीय खेळाडु वेटलिफ्टिंग- १.चंद्रकांत सुतार-Gold 3

२.यशवंत पडवळे-Gold  ३.बंटी गायकवाड-Gold

४.सविता कसबे-   Gold ५.मालन तांबोळी- Gold

६.निलम कांबळे-  Gold ७.आशाराणी इम्मनवरु-Gold सॉफ्टबॉल व बेसबॉल राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्य

व्यापारी केंद्रे व इतर- १.3पेट्रोल पंप + दोन प्रस्तावित

२.तीन टु व्हीलर शोरुम(1Hero, 2 Honda, 3Bajaj)

३.दोन ट्रॅक्टर शोरूम ४.पाच हार्डवेअर दुकान

५.फर्निचर शोरुम्स ६.२० कृषी केंद्रे ७.तीसएक किराणा दुकान ८.होलसेल किराणा व भुसार ९.MRF tyre showroom १०.ज्वेलरी शोरुम्स ११.१४ मेडिकल्स

१२.सि-यामिक सेंटर १३.संगणक केंद्रे

१४.पुस्तकालय-3 १५.स्टेशनरी व कटलरी-8

१६.गिफ्ट सेंटर्स १७.सुसज्ज फोटो ग्राफी सेंटर्स

१८.मोबाईल शोरुम्स१९.होलसेल भांडी दुकाने

२०.इलेक्ट्रीक दुकाने  २१.इलेक्ट्रॉनिक दुकाने

२२.टी व्ही व इलेक्ट्रॉनिक शोरुम२३.HP Gas Agencies

मा.खा.संजयकाका पाटील यांचा- उमदीच्या विकासात सिंहाचा वाटा  १.विजयपुर-उमदी-मंगळवेढा-पंढरपुर-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग ५६१ अ मंजुरी मिळवून देत  काम प्रगतीपथावर आहे. 

२.उमदी अप्पर तहसिल मंजुरीत सिंहाचा वाटा.

३.विजापुर-उमदी-पंढरपुर रेल्वेचा सर्व्हे करवुन घेवुन मंजुरी मिळवुन देण्याच्या अंतिम टप्प्यात.

४.४२गावांचा पाणी संघर्षसमितीच्या माध्यमातुन पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश.

५.लवकरच दोड्डनाला मध्यम प्रकल्प म्हैसाळ योजनेने भरण्याच्या तयारीत.

मान्यवरांचे उमदीला भेट-मा.मोहनजी भागवत(RSS प्रमुख)

मा.महेंद्रसिंग टिकाईत (केंद्रीय मंत्री)

मा. स्वातंत्र्य सेनानी      मा.नागनाथअण्णा नायकवडी

मा. लोकनेते राजारामबापू पाटील मा.वसंतदादा पाटील(मुख्यमंत्री) मा.रामकृष्ण हेगडे(मुख्यमंत्री कर्नाटक) मा.प्रकाश जावडेकर (केंद्रीय मंत्री) 

मा.नारायण राणे(मुख्यमंत्री) मा.B.S यडीयुराप्पा(मुख्यमंत्री कर्नाटक) मा.गोपीनाथजी मुंडे (उप मुख्यमंत्री) मा.सुप्रियाताई सुळे मा.अजित दादा पवार(उप मुख्यमंत्री) मा. रामदास आठवले (केंद्रीय मंत्री)  मा.आर आर पाटील (उप मुख्यमंत्री) मा.जयंतराव पाटील (अर्थमंत्री) मा.पृथ्वीराज चव्हाण(मुख्यमंत्री) मा.चंद्रकांतदादा पाटील(महसुल मंत्री) मा. प्रतिक पाटील (केंद्रीय कोळसा मंत्री) 

विश्वजीत कदम(राज्य मंत्री)  मा.सुभाष देशमुख(पालक मंत्री) मा.पतंगराव कदम(शिक्शणमंत्री)

मा. विलासराव जगताप  मा सदाभाऊ खोत (कृषी)

मा. चित्रा वाघ (प्रवक्त्या भाजप)  मा. प्रविण दरेकर(प्रवक्ता भाजप)  मा लक्ष्मण सवदी (मा.उपमुख्यमंत्री कर्नाटक)  मा. गोविंद कार्जोळ( मंत्री कर्नाटक)  मा. शोभा कार्जोळ (मंत्री कर्नाटक) मा. एम. बी. पाटील (मा.जलसंपदा, गृह मंत्री) 

मा. आण्णा डांगे मा राजु शेट्टी मा. सुनिल तटकरे मा पैलवान गामा मा.पैलवान दाराशिंग आणि अजुन बरेच...

संविधानाचे चौथे स्तंभ

उमदीतील आजी-माजी पत्रकारबंधू मा. सुनील पोतदार (दै.तरूण भारत) ,मा. मनोहर कोकळे-पवार(TV1 मराठीचे संपादक, दै. केसरी)  मा.सुभाष कोकळे (TV6 मराठीचे संपादक, दै. पुण्यनगरी) ,मा. प्रशांत कोळी (उपसंपादक दै लोकमत सातारा जिल्हा) ,मा. मलकारी वायचळ(दै.पुढारी)  मा. महेश चव्हाण (लोकमत) ,मा. राहुल संकपाळ (दै.लोकमत) ,मा. महादेव कांबळे (दै.तरूण भारत)  मा. सचिन होर्तीकर(दै. लोकमत) ,मा. प्रमोद पैठणकरसर( दै. विजयवाणी कन्नड) ,मा. नारायण भोसले(दै.जन प्रवास) ,मा. यलप्पा कावडे(दै.सकाळ) मा. सतीश माने(दै.सकाळ) 

लेखन- रमेश महादेव सुतार

   

Thursday, January 19, 2023

निसर्गाच्या शाळेतून विज्ञानाचे धडे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी उमेश नेवसे हे शिक्षक निसर्ग निरीक्षणावर भर देतात. ते पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नसरापूर येथे राहतात आणि वेल्हे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकवतात. ते म्हणाले, “पृथ्वीभोवती चंद्र फिरतो. कधी तो पूर्ण दिसतो, कधी अर्धा तर कधी अजिबातच दिसत नाही. हे सारे कुणाच्या शापामुळे होत नाही. यामागची कारणे वैज्ञानिक आहेत. मुलांना स्वत: निरीक्षण व त्या आधारे दर दोन दिवसांनी चंद्राची आकृती काढायला सांगून, शेवटी यामागचे वास्तव लक्षात आणून देतो. चंद्र आकाशात कोठे व त्याचा आकार कसा आहे वगैरे मुलं बघतात. पौर्णिमेनंतर चंद्राचा आकार कमी आणि अमावस्येनंतर वाढत जातो. सूर्य, चंद्र यांचे आकाशातील अंतर याला कारणीभूत असते. हा कार्यकारणभाव मुलांना या प्रयोगातून रंजक पद्धतीने कळतो. दर वर्षी सलग पन्नास दिवस हा प्रयोग चालतो. यंदाही शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊन फेब्रुवारी-मार्चपर्यंत चालेल.” 

नेवसे यांनी असेही सांगितले की, आमच्या शाळेत 'नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र' स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून दररोज परिपाठाच्या वेळी निरनिराळे प्रयोग केले जातात. सध्या लोहचुंबकाच्या गुणधर्मावर आधारित प्रयोग चालले आहेत. मुलांना ते वाटून दिले आहेत. प्रत्येक विद्यार्थी त्याच्यावर सोपविलेल्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी प्रश्‍न विचारून, चर्चा करून त्याबद्दलचे तत्त्व समजून घेतो. दुसऱ्या दिवशी परिपाठात प्रत्यक्ष प्रयोग करून पाहुन, आपले निष्कर्ष सर्वांसमोर सादर करतो. आणखी एक रंजक अभ्यास म्हणजे लॅपटॉपवर गूगल मॅपवरून आमची शाळा आम्ही बघतो. नंतर जवळचा तोरणा किल्ला, गुंजवणी धरण याचबरोबर सभोवतालची महत्त्वाची ठिकाणं आम्ही बघतो. केव्हा तरी या मॅपवरून जगातील वेगवेगळे खंड, त्यांत असलेले विविध देश, मग आपल्याकडील इतर राज्ये आदींची दृश्य सफर करतो. याचा शेवट लोणारच्या सरोवरापाशी होतो. उल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार सरोवरात अनेक विवरे आहेत. त्यांचा संबंध चंद्राशी जोडून त्यावरील विवरेही दाखवतो. तीच आपल्याला पृथ्वीवरून डागांसारखी दिसतात. 

Wednesday, January 18, 2023

रोल मॉडेल ग्रामपंचायतींना हवा निधीचा बूस्टर

सांगली,(जत न्यूज नेटवर्क)-

लोकशाहीत जनतेशी थेट जोडलेली शासकीय यंत्रणा म्हणून तसेच केंद्र, राज्य सरकार व जनता यातील दुवा म्हणजे ग्रामपंचायत. प्रशासनाची ध्येयधोरणे, लोककल्याणकारी योजना, विविध अभियाने तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणारी यंत्रणा म्हणून ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जनतेशी नाळ जोडल्यामुळे पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. महात्मा गांधींचा 'खेड्यांकडे चला' हा मंत्र जपण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. उठावदार काम करणाऱ्या ग्रामपंचायतीना निधीची कमतरता भासते. त्यामुळे भरीव निधीसाठी या ग्रामपंचायती सरकार व लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसल्या आहेत. 

जनतेसाठी अत्यंत जवळच्या असणाऱ्या ग्रामपंचायती खडतर अवस्थेत आहेत. काही अपवादही आहेत. अनेक ग्रामपंचायतीनी उत्कृष्ट व लोकाभिमुख कामे करून जनतेला उत्तम कारभार काय असतो, ते दाखवले आहे. अशांची दखल घेऊन शासनाने त्यांचा यथोचित मानसन्मान करीत कौतुकाची थाप देखील टाकली आहे. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी विविध पुरस्कारांच्या योजना राबवत अशा गावांना प्रोत्साहन देण्याबरोबरच बक्षीसरूपी अधिकची रक्‍कम देऊन लोकाभिमुख विकासासाठी मदत करत आहेत. उठावदार काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना जसे केंद्र व राज्य मदत करीत असते. त्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी देखील आपापल्या मतदार संघात चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कामाची दखल घेऊन तिथे आणखी  काम होण्यासाठी गटातटाच्या किंवा पक्षीय चौकटीच्या बाहेर जाऊन मदत करण्याची गरज आहे. ही वाजवी अपेक्षा विविध गाव कारभाऱ्यांकडून होत आहे. 

ग्रामविकासाचे अभ्यास केंद्र म्हणून सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावे पुढे येत आहेत. अलीकडे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायत नावारूपास येत आहे. ही बाब मान्याचीवाडीसह पाटण तालुका आणि लोकप्रतिनिधोंसाठी अभिमानाची आहे. तालुक्यासह राज्यातील इतर ग्रामपंचायतोंसाठी देखील प्रेरणादायी आहे. ग्रामपंचायती बळकटीसाठी तालुक्‍यात शिवशाही सरपंच संघाची स्थापना झाली. संघाच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. मात्र, विशेष कार्य दिसून आले नाही. 

ग्रामपंचायत कोणाच्या विचारांच्या असा दावा करण्यापेक्षा, आपल्या ताब्यातील किती ग्रामपंचायती पुढील पाच वर्षात मान्याचीवाडी होणार? यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, आडवाजिरवीच्या राजकारणात विधायक गोष्टी मागे पडत आहेत. गटातटाच्या पलीकडे नेत्यांनी शाश्‍वत विकासासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. भौतिक विकास हो वर्तमानाची गरज असली, तरी शाश्‍वत विकास पुढच्या अनेक पिढ्यांची गरज आहे. त्यामुळे शाश्‍वत विकासाची कामे करणाऱ्या ग्रामपंचायतोंना लोकप्रतिनिधींनी अधिकचा निधी देणे अपेक्षित आहे. जेणेकरून भौतिक विकासाबरोबरच शाश्‍वत विकासाला देखील गती मिळणार आहे. 


जात्यावरील ओव्या होताहेत कालबाह्य


ग्रामीण भागातील आधुनिक साहित्याचा वापर 

 सांगली,(जत न्यूज नेटवर्क)-

 पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात पहाटेची सुरुवात जात्याच्या घरघरीने व्हायची. घरातील कर्ती महिला जात्यावर दळण दळत दळत ओव्या गायची. जात्याचा आवाज हाच त्या गाण्यांसाठी पार्श्वसंगीत असायचा. त्या काळात महिलांना अभिव्यक्त होण्याचे जात्यावरील ओव्या हे एक प्रमुख माध्यम होते. काळाचे चक्र जसे फिरले तसे जात्याचे चक्र नामशेष होताना दिसत आहे. विज्ञानाने मोठी प्रगती साधल्यामुळे आज खेड्यापाड्यांतही पिठाची गिरणी आली आहे. यामुळे आधुनिक काळात जाते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यावरील ओव्या इतिहासजमा होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

एक काळ असा होता, की जाते हे सासुरवाशिणीला अभिव्यक्त होण्यासाठीचे हक्काचे ठिकाण होते. आजच्या काळात फेसबुक, इन्स्टाग्राम ही माध्यमे चांगल्या अर्थाने लोकांच्या अभिव्यक्तीची माध्यमे झाली आहेत. यांचा वापर करत विविध पद्धतीने महिला-पुरुष अभिव्यक्त होत आहेत, पण जुन्या काळात कुठलीही माध्यमे नव्हती. 

विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याने जुनी साधणे अडगळीत पडल्याचे, कालबाह्य झाल्याचे जाणवत आहे. जाते हाही यातीलच एक भाग आहे. लग्नकार्यात, समारंभाप्रसंगी जात्यावरील हळद दळणे व त्या वेळी गाणे म्हणण्याची पद्धत प्रचलित होती. एखादा सण उत्सव असल्यास घरामध्ये त्या त्या प्रकारचे गोडधोड करण्यासाठी तांदूळ, मूग, तुरडाळ आदी धान्येही जात्यावर दळली जात होती. आता घरोघरी घरघंटी उपलब्ध झाल्या आहेत. पिठांच्या गिरण्यांमध्येही स्पर्धा वाढू लागली आहे, परंतु या सर्व गोष्टीत पारंपरिक जाते मात्र काळानुरूप इतिहासजमा झाले आहे.  आज जरी आधुनिक युगामध्ये नवनवीन बदल झालेले असले, तरी 

 आणि अनेक घरात परंपरेने जुनी जाती हस्तांतरित झाली असली तरी त्याचा वापर क्वचितच कधी तरी होतो. कुणाच्या तरी लग्न समारंभाच्या प्रसंगाने त्याचा उपयोग होतो. मात्र बदलत्या काळानुसार दगडी जाते व ओव्या कालबाह्य होऊ लागल्या आहेत. 

Sunday, January 8, 2023

जिल्हा परिषद शाळेच्यावतीने एकुंडी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

सांगली,(मच्छिंद्र ऐनापुरे)-

जत तालुक्यातील एकुंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच बसगोंडा रामगोंडा नाईक अध्यक्षस्थानी होते. 

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी सावंत यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच निकिता सुरेश कांबळे, उपसरपंच रमेश बाबासाहेब कोरे, सोनाबाई बाळकृष्ण पाटील, चंद्रव्वा बाळासाहेब नाईक, संगीता रमेश कोरे, शिवानंद रामू लठ्ठी, सुवर्णा बिरू कांबळे यांचा शाल, फेटा आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य अनिल रावसो गुडोडगी, पिरंगोंडा शिवगोंडा कोट्टलगी, कुसुमावती शंकर गुडोडगी यांच्यावतीने त्यांच्या प्रतिनिधींनी सत्कार स्वीकारला. 

यावेळी माजी सरपंच बसगोंडा नाईक, बाबाण्णा नाईक, राजू पाटील, विजय नाईक, महादेव हुलगबाळी, महादेव पाटील, शिवपुत्र नाईक, ईश्वर हेळकर, तुकाराम कांबळे, सचिन माने, बंडू गुडोडगी, सुरेश कांबळे , संगीता शिवानंद वळसंग, शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे, निलेश वानखेडे, अंगणवाडी मदतनीस सौ. पाटील, सौ. लठ्ठी आदी उपस्थित होते.

'एकुंडी'च्या उपसरपंचपदी रमेश कोरे यांची निवड


सांगली, (मच्छिंद्र ऐनापुरे)-

जत तालुक्यातील एकुंडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रमेश बाबासो कोरे यांची सात आणि तीन अशा फरकाने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टी. एच. तळपे यांनी काम पाहिले. 

18 डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर घडवून आणत काँग्रेसने सरपंच उमेदवारासह सात जागा मिळवल्या. विरोधी पॅनेलला तीन जागा मिळाल्या. सरपंच निकिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड झाली. उपसरपंचपदासाठी रमेश कोरे यांच्या विरोधात एकाने अर्ज दाखल केला होता. सात आणि तीन अशा फरकाने श्री. कोरे निवडून आले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. 

यावेळी पॅनेल प्रमुख माजी सरपंच बसगोंडा रामगोंडा नाईक, राजू पाटील, बाबाण्णा नाईक, विजय नाईक, महादेव हुलगबाळी, महादेव पाटील, शिवपुत्र नाईक, ईश्वर हेळकर, तुकाराम कांबळे, सचिन माने, बंडू गुडोडगी, सुरेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सोनाबाई पाटील, चंद्रव्वा नाईक, संगीता कोरे, शिवानंद लठ्ठी, सुवर्णा कांबळे आदी उपस्थित होते.

Saturday, January 7, 2023

शाळा तपासणी अधिकाऱ्यांना ओळखपत्राची सक्ती करा

सांगली,(मच्छिंद्र ऐनापुरे)-

सोलापूर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये शिक्षण अधिकारी असल्याचे सांगून शाळांची तपासणी करताना काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असा प्रकार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला ओळखपत्र बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. याशिवाय मुख्याध्यापकांनीही शाळेत येणाऱ्या व्यक्तीला ओळखपत्र पाहिल्याशिवाय  शाळेत तथा वर्गात प्रवेश देऊ नये. ऊठसूट शाळेत येणाऱ्या  व्यक्तींना पायबंद घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. 

सहायक शिक्षणाधिकारी असल्याचे खोटे सांगून तोतया व्यक्‍तींनी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर व टेंभुर्णोतील जिल्हा परिषद शाळांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळांची तपासणी करताना एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. फिरदोस गफ्फार शेख व शाहिद ठल्लू खान हे दोघे दक्षिण सोलापुरातील शाळांची तपासणी करीत होते. आपण सहायक शिक्षणाधिकारी असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखवून हा प्रकार सुरू होता. वळसंग पोलिसांना त्यासंबंधीची माहिती मिळताच, त्यांनी दोन्ही संशयितांकडे चौकशी केली. नांदेड व सोलापूर जिल्हा परिषदेत ती महिला कार्यरत नसल्याचे उघड झाले. आता साक्षीदारांची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचेही जबाब घेतले जात आहेत. त्यानंतर पोलिस पुढील कारवाई करतील.  मात्र  काळात या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दरम्यानच्या काळात टेंभुर्णी येथेही तसाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये याविषयी चर्चा सुरू झाली आहे. काही वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पाठ्यपुस्तकातील कवी असल्याचे सांगून शिक्षकांना गंडा घालण्याचा प्रकार झाला होता. याशिवाय गावातील तसेच परिसरातील काही लोक शिक्षकांना दमदाटी करत शाळांमध्ये घुसतात. मद्यपान करून काही लोक शाळेत शिरतात. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी अचानकपणे शाळा तपासणी करतात. विद्यार्थ्यांचे अध्यायन कसे सुरू आहे, शिक्षक शाळेच्या वेळेत काय करतात, कोण परस्पर रजेवर किंवा दुपारूनच घरी जात आहेत का, पोषण आहार चांगला आहे का, वेळेत दिला जातो का, अशा मुद्यांची पडताळणी अधिकारी वेळोवेळी करत असतात.  शिक्षक, मुख्याध्यापकांना आपल्या विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी ओळखीचेच असतातच असे नाही. याशिवाय काही कारणांमुळे  महसूल विभागाचे, आरोग्य विभागाचे अधिकारी शाळांमध्ये जातात. त्यामुळे याचा फायदा घेत काही शाळांमध्ये तोतया अधिकारी जाऊन शाळा तपासणीचे धाडस करत आहेत. त्यामुळे शाळा तपासणी करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांना ओळखपत्राची सक्ती करण्यात यावी व ते पाहिल्याशिवाय मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी कुणाही बाहेरच्या व्यक्तीला शाळेत प्रवेश देऊ नये, यासाठीचे प्रशासनाने आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.


Thursday, January 5, 2023

डॉ. रवींद्र आरळी: एक चतुरस्र व्यक्तिमत्व


फारच थोडी माणसं असतात, ज्यांना सगळ्या कला अवगत असतात. डॉ. रवींद्र आरळी त्यापैकी एक. रुग्णांना वैद्यकीय सेवा देता देता राजकारण, समाजकारणात लीलया वावरत असताना शैक्षणिक संस्था उभा करणं, आजार, रोग यांबाबतीत लोकांमधले समज- गैरसमज दूर करण्यासाठी गावोगावी जाऊन व्याख्यानं देणं किंवा त्याबाबत पुस्तक लिहिणं अशी कितीतरी कामं ते सहज पार पाडतात. आता तर त्यांनी जतला आयुर्वेदिक महाविद्यालयच आणलं आहे. जतच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा शिरपेच खोवला आहे. सतत हसतमुख हसणाऱ्या डॉ .आरळी यांच्या चेहऱ्यावर कधीच कंटाळा, आळस दिसून आला नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा त्यांचा वावर थक्क करणारा आहे. डॉ. आरळी म्हणजे इतरांना प्रेरणादायी असे व्यक्तिमत्त्व आहे. नेहमी नवनव्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारून ते पूर्ण करत असल्याने भाजपने त्यांना सातत्याने कोणती ना कोणती नवी जबाबदारी टाकली आहे.  सध्या ते केंद्र सरकारच्या सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या महामंडळाचे केंद्रीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. सतत प्रवास असतो, पण कधीही आपल्या कामाकडे दुर्लक्ष नसते.  जत येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ म्हणून ओळख असलेले आणि  राज्य शासनाचा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार विजेते  असलेले डॉ. रवींद्र शिवशंकर आरळी म्हणजे एक चतुरस्र, अष्टपैलू  व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कामाचा आवाका केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित नाही. यशाची अनेक शिखरे त्यांनी पादाक्रांत केली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्यनगरी म्हणून लौकिक असलेल्या मिरज येथेही त्यांनी सिनर्जी हे अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारले आहे. ते जसे निष्णात डॉक्टर व उत्तम प्रशासक आहेत, तसेच ते निस्पृह राजकारणी आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात भारतीय जनता पार्टीमधून झाली. अनेक वर्षे ते एकाच पक्षात निष्ठेने काम करीत राहिले आहेत. अक्कलकोटचे दिवंगत आमदार व त्यांचे सासरे बाबासाहेब तानवडे हे डॉक्टरांचे राजकीय गुरु व सामाजिक जीवनातील आदर्श आहेत. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना थेट केंद्रीय संचालकपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी त्यांनी पक्षात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

डॉ. रवींद्र आरळी यांचे मूळ गाव जत तालुक्‍यातील अंकलगी हे आहे. मात्र त्यांचा जन्म जत येथे झाला आहे. त्यांचे वडील शिवशंकर आरळी हे बँकेत अधिकारी होते. आई शांताबाई या अत्यंत धार्मिक व कुटुंबवत्सल होत्या. डॉक्टरांचे प्राथमिक शिक्षण जत येथे, तर माध्यमिक शिक्षण मिरज हायस्कूल, मिरज येथे झाले आहे. विलिंग्डन कॉलेज सांगली येथून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे एमबीबीएसची पदवी संपादन केली. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र या विषयातील त्यांनी उच्चपदवी घेतल्यानंतर मोठ्या शहरामध्ये न जाता त्यांनी जतसारख्या ग्रामीण व दुष्काळी भागामध्ये वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय त्यांनी सार्थ ठरवला आहे. 

गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले जतमधले किंबहुना जिल्ह्यातील सर्वात मोठे स्त्रीरोग व बाळंतपणाचे रुग्णालय आहे. त्यांनंतर त्यांनी उमा हॉस्पिटल, शांताबाई शिवशंकर आरळी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, मिरज येथील सिनर्जी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, शांताबाई  शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल अशी रुग्णालयांची मालिका त्यांनी उभी केली आहे. ग्रामीण भागामध्ये त्यांनी गायनकॉलाजी विषयातील पदव्युत्तर शिक्षणाचे केंद्र सुरू केले आहे. उमा नर्सिंग कॉलेज, बीएससी नर्सिंग, डीएमएलटी, लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल अशा अनेक संस्था सुरू केल्या आहेत. सर्वात आनंदाची बाब म्हणजे जत येथे त्यांनी शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची स्थापना केली आहे. नुकतीच या आयुर्वेदिक महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर वैद्यकीय शिक्षणाची सोय झाली आहे. सीइटी सेलच्या माध्यमातून याठिकाणी ऑनलाईन प्रवेश मिळवता येणार आहे. शंभर विद्यार्थी क्षमतेचे  कॉलेज असून यासाठी योग्य ती व्यवस्था , विद्यार्थ्यांच्या राहण्याची उत्तम सोय, तज्ज्ञ कर्माचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे जतच्या वैद्यकीय क्षेत्राला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे. डॉ. रवींद्र आरळी हे चतुरस्र व्यक्तिमत्व आहे. ते एक उत्कृष्ट वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध आहेत. एक उत्कृष्ट वक्ता एक उत्कृष्ट नेता होऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे. अत्यंत मार्मिक भाषा, विनोदाची झालर, अभ्यासपूर्वक मांडणी, अनुभवातून साकार झालेली मधुरवाणी यामुळे त्यांची गणना सध्याच्या आघाडीच्या वक्त॒यांमध्ये होते. अनेक व्याख्यानमालांमध्ये त्यांनी मानाचे स्थान प्राप्त केले आहे. काही वर्षांपूर्वी जतमध्ये एड्सचे सर्वाधिक रुग्ण होते. त्यावेळी डॉक्टरांनी अगदी गावोगावी जाऊन या विषयावर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन लायन्स क्लबने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

डॉ. आरळी यांना समाजकारणाची आवड पहिल्यापासूनच होती. जत शहरात लायन्स क्लबची स्थापना प्रथम त्यांनीच केली. या लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यात वृक्षारोपण, एडस्‌ विषयावर व्याख्याने, आरोग्यावर व्याख्याने तसेच दुष्काळात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप, ब्लँकेट वाटप आदी उपक्रम राबविले. लायन्स क्लबच्या माध्यमातून जत तालुक्यात दुष्काळ काळात बरीच कामे झाली आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यात त्यांचाही हातभार लागला आहे. 

डॉ. रवींद्र अरळी यांनी आहारशास्त्र, आरोग्य, स्त्रियांचे आजार, अंधश्रद्धा, आजाराबाबत व आरोग्याबाबतचे अज्ञान, कॅन्सर अशा अनेक विषयांवर हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. महिलांच्या आरोग्यविषयक शंका व गैरसमज या विषयावर त्यांनी समज-गैरसमज हे अतिशय माहितीपूर्ण व संग्रही ठेवावे असे पुस्तक लिहिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्त्रीरोग, वंध्यत्व, नेत्ररोग, दंतरोग, मधुमेह, ज्येष्ठांची तपासणी अशी अनेक मोफत शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोफत औषध वाटप असे सामाजिक उपक्रम राबविले आहेत, ग्रामीण भागात आरोग्य विषयक व्याख्यानमाला अखंडपणे चालवून राज्यातील अनेक तज्ञांचे मार्गदर्शन जतकरांसाठी उपलब्ध करून दिले आहे. लायन्स क्लब, लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, जीवनरेखा ब्लड बँक, बसवेश्वर शिक्षण संस्था, उमा इन्स्टिट्यूट आफ नर्सिंग एज्युकेशन, उमा इंग्लिश मीडियम स्कूल, धनलक्ष्मी पतसंस्था, उमा चॅरिटेबल ट्रस्ट, शांताबाई शिवशंकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,जत, सिनर्जी सुपर स्पेशलिटी हास्पिटल, मिरज, शांताबाई अरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल व कालेज, जत अशा अनेक संस्थांचे ते संस्थापक आहेत. वैद्यकीय व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळून त्यांनी यशाची अनेक शिखरे सर केली आहेत. एक राजकारणी म्हणून ही त्यांचे काम अतिशय आदर्शवत असे आहे. भाजपचे ते सुरुवातीपासून एकनिष्ठ सभासद आहेत .भाजपचे तालुकाध्यक्ष ,जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष, सांगली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. अतिशय व्यस्त असतानाही त्यांनी केलेली समाजसेवा, विविध उपक्रम हे खरेच न उलगडणारे कोडे आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे .म्हणून डॉ. रवींद्र आरळी म्हणजे एक किमयागार आहेत. असे अभिमानाने नमूद करावे लागते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली