Tuesday, November 16, 2021

प्रदुषणाच्या भस्मासुराने एका वर्षात तीन लाख मृत्यू


भारतासह जगभरातले बरेच देश सध्या प्रदुषणाशी लढताना दिसत आहेत. याच दरम्यान युरोपीय पर्यावरणीय यंत्रणेने हे जाहीर केले आहे की, वायू प्रदुषणामुळे तीन लाख सात हजार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, वायू प्रदुषणामुळे जगात दरवर्षी ७० लाख जणांचा अकाली मृत्यू होतो.

युरोपीय पर्यावरण यंत्रणेच्या एका अहवालानुसार, जर युरोपीय संघातली राष्ट्रे जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या वायू गुणवत्ता निर्देशांचे पालन केले, तर ही संख्या अर्ध्याहूनही कमी होऊ शकते. या अहवालानुसार, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला हवेतल्या सूक्ष्म कणांनी फुफ्फुसात खोलवर प्रवेश केल्याने युरोपीय संघातल्या २७ देशामधल्या एक लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला होता. तर २००५ पर्यंत हा आकडा दुप्पट होऊन ४ लाख ५० हजारांवर पोहोचला.

२०१९ मध्ये हवेत मिसळलेल्या या सूक्ष्म कणांमुळे जर्मनीमध्ये ५३, ८००, इटलीमध्ये ४९,९००, फ्रान्समध्ये २९,८०० तर स्पेनमध्ये २३,३०० जणांचा अकाली मृत्यू झाला. तर पोलंडमध्ये ३९,३०० जणांचा मृत्यू झाला. अहवालानुसार, कार, ट्रक आणि थर्मल पॉवर स्टेशन्समधील नायट्रोजन ऑक्साईडमुळे २०१८ आणि २०१९ मध्ये होणाऱ्या मृत्यूंमध्ये एक चतुर्थांथ प्रमाणात घट झाली, त्यामुळे हा आकडा ४० हजारांवर आला होता.

एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, वायूप्रदुषणामुळे हृदयविकार, कॅन्सर तसेच फुफ्फुसांच्या आजारांच्या प्रमाणात वाढ होते. तर लहान मुलांच्या फुफ्फुसांच्या विकासामध्ये वायू प्रदुषणामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. परिस्थितीमध्ये सुधारणा होत असली तरी अजूनही हे चिंताजनकच आहे. दिल्लीमधल्या वायूप्रदुषणाने अतिगंभीर पातळी गाठली आहे. त्यामुळे आता राजधानी अक्षरशः गॅस चेम्बर होताना दिसत आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोच असून लॉकडाउनसारख्या उपायांवर विचार केला जात आहे.