Wednesday, October 31, 2018

शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांवर खरे संस्कार रुजतात: दिनराज वाघमारे


जत,(प्रतिनिधी)-
विद्यार्थी जागृत अवस्थेत सर्वाधिक काळ हा शिक्षकांजवळ असतो. शाळेतील संस्कारच त्याला पुढच्या आयुष्यात उपयोगाला येतात. त्यामुळे संस्कारशील पिढी बनवण्याची खरी जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन पत्रकार व लेखक दिनराज वाघमारे यांनी जत येथील जि.. शाळा क्रमांक येथे बोलताना केले.
पत्रकार दिनराज यांच्या वैभवशाली जत या पुस्तकाचे प्रकाशन आणि मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या धड्याचे आठवी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात समावेश झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हाबाहेर जाणार्या जत कन्या केंद्रातील शिक्षकांना निरोप आणि सत्कार असा कार्यक्रम शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना श्री. वाघमारे म्हणाले,मुलगा घरी असला तरी तो एक तर टीव्ही पाहण्यात, खेळण्यात किंवा झोपण्यात आपला वेळ घालवतो. त्यामुळे पालकांच्या संपर्कात कमी येतो. शाळेत मात्र तो सर्वाधिक वेळ शिक्षकांसोबत असतो. त्यामुळे शिक्षक जे संस्कार त्याच्यावर करतील, तेच त्याच्या आयुष्यात उपयोगाचे ठरतील. त्यामुळे संस्कारशील, अभ्यासशील पिढी घडवण्याची जबाबदारी खर्या अर्थाने शिक्षकांची आहे. जत शहरातील शाळा क्र.1 ही शाळा मुख्याध्यापक संभाजी कोडग यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील टॉप वन बनली आहे. त्याला साथ अन्य शिक्षकांची मिळाली आहे. टीम वर्क उत्तम असेल तर ती शाळा कधीच मागे पडत नाही.
यावेळी बोलताना लेखक मच्छिंद्र ऐनापुरे म्हणाले,शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांचे छंद जोपासण्याचे काम करायला हवे. कला जोपासल्याने विद्यार्थी अपसूक उत्तम नागरिक घडतो.
भालशंकर म्हणाल्या की, आम्हाला ही शाळा सोडून जाताना खूप वाईट वाटते. मात्र या शाळेने भरभरून दिले. खूप शिकता आले. त्यामुळे आमच्या जिल्ह्यात गेल्यावर आम्ही कुठेच कमी पडणार नाही. यावेळी जिल्ह्याबाहेर बदली झालेले कंठीचे मुख्याध्यापक कामडे, गावीत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक केंद्रप्रमुख संभाजी कोडग यांनी केले. यावेळी शिक्षक समितीचे बलभीम घाटे, सावळा माने, वर्षा जगताप,सौ.हावळे, सौ.माने,विशाखा सावंत,सौ. आंबी आदी उपस्थित होते. आभार विद्याधर गायकवाड यांनी मानले.

No comments:

Post a Comment