Monday, October 29, 2018

कोळशाच्या तुटवड्यामुळे भारनियमनाचा फटका


जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्राची विजेची मागणी रोज वाढत असून उन्हाळ्यात स्थिती आणखी गंभीर होणार आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे औष्णिक ऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे कठीण झाले आहे. राज्याला दररोज 32 रेक कोळसाची गरज असून तेवढा कोळसा दिला जावा, अशी मागणी राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत कोळसा मंत्रालयाच्या अधिकार्यांची भेट घेऊन केली आहे.
 चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत कोळसा मंत्रालयाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील स्थिती त्यांच्यासमोर मांडली असल्याचे प्रसिद्धी माध्यमातून समोर आले आहे. राज्याची वीजेची मागणी 24 हजार मेगावॅटच्याही पुढे गेली असून मागणी व पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी वीजनिर्मिती वाढविण्याची गरज आहे. राज्याला सिंगरौनी कोळसा खाण, वेकोलिच्या महानदी, वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड या कंपन्यांमधून कोळसा उपलब्ध होतो. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोळसा मिळण्या संदर्भातील झालेल्या करारानुसार कोळसा नियमित मिळावा म्हणून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रयत्न केले. महानिर्मिती आणि केंद्रीय कोळसा विभागाची बैठक घेण्याची सूचना गोयल यांनी केली होती. त्याप्रमाणे आज शास्त्री भवन येथे व्हिडिओ कॉन्सफरसिंगद्वारे ही बैठक घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 
राज्यात ऑक्टोबर हिटमुळे विजेची मागणी प्रचंड वाढली असून 24 हजार 119 मेगावॉटपर्यंत ही मागणी केली आहे. ऑक्टोबर महिन्यात 19 हजार मेगावॉटपेक्षा अधिक वीज निर्माण झाली नाही. सध्या राज्याला 1 लाख 40 हजार टन कोळश्याची आवश्यकता असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील साडेसात लाख शेतकर्यांना नवी वीज जोडणी दिली आहे. घरगुती ग्राहकांच्या वीज जोडणीतही वाढ झाली आहे. त्यामुळे विजेची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. राज्याला दररोज लागणारा 32 रेक कोळसा लवकर मिळावा, यासाठी वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक झाली. या संदर्भात कोळसा विभागाच्या अधिकार्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment