Wednesday, October 31, 2018

मराठा आरक्षण न दिल्यास 18 नोव्हेंबरनंतर ठोक मोर्चा: विजयसिंह राजे महाडिक


सांगली,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र सरकारने 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर केले नाही तर 18 नंतर महाराष्ट्रात मराठ्यांसोबत धनगर, रामोशी, लिंगायत, जैन व मुस्लिम समाज बांधवांना एकत्र करून ठोक मोर्चाला सुरवात करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह राजे महाडिक यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष बाबा पाटील व राज्य समन्वयक विनायकगायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. विजयसिंह राजे महाडिक म्हणाले, राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत प्राप्त झाल्यानंतर सरकारने तत्काळ मराठा आरक्षण जाहीर केले नाही तर मात्र आम्ही मराठे इतर समाज बांधवांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा म्हणून स्वतंत्र 25 टक्के आरक्षण द्यावे. आरक्षणासाठी हा शेवटचा आणि निकराचा निर्णायक लढा असणार आहे. ठोक मोर्चाच्या लढ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल. जे समाज बांधव सरकारकडे आरक्षण मागत आहेत, त्यांना देखील यापुढे आरक्षणाच्या लढ्यात सोबत घेऊन ठोक मोर्चात सहभागी करून घेणार आहे, असेही महाडीक म्हणाले.
 राज्य सरकारने मराठा आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. महाराष्ट्रातील 391 गड किल्यांचे संवर्धन करून त्यांचे स्वतंत्र सातबारा व खाते उतारे निघतील, अशी व्यवस्था करावी. विनायक मेटेंनी शिवस्मारक बांधकाम विलंबप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तसेच स्मारकाच्या उंचीबाबत लवकर प्रतिक्रिया द्यावी. भूमिपूजन कार्यक्रमात पुढे पुढे करणार्या पुरषोत्तम खेडेकर शिवस्मारकाची जागा बदला म्हणताहेत, याचा अर्थ ते मराठा विरोधक आहेत. त्यांना हे स्मारक होऊ द्यायचे नाही का, असा सवाल उपस्थित करत सरकारने अखिल भारतीय मराठा सेवा संघ व समन्वय समितीच्या सर्व मागण्या त्यावरती सुचवलेल्या उपायानुसार लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी आग्रही भूमिका मांडली. त्याचबरोबर ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व मराठा आमदार, खासदार व महत्त्वाच्या पदावर असणार्या लोकांनी राजीनामे द्यावेत. ज्या मराठा बांधवांनी आरक्षणाचा लाभ घेतला आहे त्यांनी देखील या लढ्याला पाठिंबा द्यावा. अन्यथा 18 नोव्हेंबर नंतर निघणारे बोलके ठोक मोर्चे कोणालाही परवडणारे नसतील, असेही ते शेवटी म्हणाले.

No comments:

Post a Comment