नवरात्रातील नवमीला ‘खंडेनवमी’ म्हणतात. या दिवशी शक्ती
आणि विजयाची देवता ‘दुर्गा’ हिची विशेष
स्वरूपात पूजा केली जाते. कारण आदिशक्ती दुर्गा देवीने महिषासुरादी
असुरांशी नऊ दिवस घनघोर युद्ध करून, त्या असुरांचा नवमीच्या दिवशी
वध केला, अशी मार्कंडेय पुराणात कथा आहे. त्या वेळी महिषासुराने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. देव-देवता, ॠषी-मुनी, साधु, संत-सज्जनांना त्रास दिला
होता. अनेक देवतांचे अधिकार महिषासुराने आपल्याकडे घेतले होते.
या क्रोधकारक परिस्थितीत ब्रह्मा, विष्णू,
महेश यांच्या मुखापासून, तसेच इंद्रादी देवतांच्या
शरीरातून प्रचंड तेज बाहेर पडले आणि त्या अतुल तेजाने स्त्रीरूप धारण केले.
तीच ही आदिशक्ती ‘दुर्गा देवी’ होय. खंडेनवमीला शस्त्रास्त्र पूजन करण्याची परंपरा गेली
कित्येक शतके चालू आहे. ग्रामीण भागांतील बलुतेदारांपासून ते
लष्करातील सैनिकांपर्यंत सर्वत्र नवमीचा दिवस प्रचंड उत्साहाचा आणि जल्लोषाचा क्षण
असतो. त्याचबरोबर शेतकरी नांगर, कोयता,
कुदळ, फावडे इत्यादींची पूजा करतात. आपणही आपल्या व्यवसायानुसार लागणार्या गोष्टींची पूजा
करतो. उदा. लॅपटॉप, कॉम्प्यूटर. या दिवशी नवरात्र उठवतात. संध्याकाळी उपवास सोडतात. सरस्वतीची पूजाही करतात.
विद्यार्थी पाटीवर सरस्वतीचे चित्र काढतात व त्याची पूजा झेंडू व पांढर्या सुवासिक फुलाने करतात. शिल्पकार, सुतार, कारागीर आपापल्या उपकरणांना, शस्त्रांना देव मानून पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात आणि राजस्थानात प्रामुख्याने
आढळते. या दोन्ही प्रांतांत खड्ग पूजेचे विशेष महत्त्व आहे.
अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत शस्त्रास्त्र पूजेचा थाट असायचा.
गंध-अक्षता समर्पणाबरोबरच नऊ दिवस पाणी शिंपलेले
रुजवाण्याच्या डहाळ्या शस्त्रास्त्रांवर वाहायच्या. घटस्थापनेदिवशी
पूजेसाठी ठेवलेला घट हलविला जायचा. एकजात सर्व शस्त्रास्त्रे,
पुस्तके पूजली जायची. कपडे, बांगड्या, टिकली, पैंजण,
दागिने इत्यादी साजशृंगाराच्या वस्तू कुमारिकांना दिल्या जातात.
त्यांना गोड खीर, ओल्या नारळाच्या करंजा किंवा
संपूर्ण भोजन दिले जाते. नवमीच्या दिवशी अशा तर्हेने नऊ कुमारिकांचे मनोभावे पूजन.
देवीचा गोंधळ
महाराष्ट्रात गोंधळी लोक ‘गोंधळ’ ही विधिनाट्य सादर करतात. गोंधळी हे देवीचे उपासक असून, ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे
मंगल कार्याची सांगता करतात. या जातीचे लोक महाराष्ट्र,
कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या प्रांतांत
विशेषकरून आढळतात. रेणुराई व कदमराई अशा त्यांच्या पोटजाती असल्याचे
सांगितले जाते. रेणुआई हे माहूरच्या रेणुकेचे भक्त असून,
ते रेणुकेचीच उपासना करतात. कदमराई हे तुळजापूरच्या
भवानीचे भक्त असून, तिचीच पूजा मांडतात. या विधिनाट्यात महिलांचा सहभाग कधीही नसतो. चार किंवा
आठ गोंधळ्यांची संख्या गोंधळात असते; परंतु आजकाल दोन गोंधळीसुद्धा
गोंधळ सादर करतात. गोंधळ कधी करावा याचे उत्तर म्हणजे वास्तुशांती
निमित्ताने, घरात मंगलकार्य - उदा.
लग्न, मुंज किंवा एखादा नवस फेडण्यासाठी,
नाहीतर ऐच्छिक गोंधळसुद्धा करता येतो. यामुळे मनातील,
संसारातील गोंधळ कमी करण्यासाठी देवीकडे साकडे घातले जाते. त्यालाच ‘गोंधळ’ म्हणतात.
संबळ व तुणतुणे वाजवून देवीमातेची गाणी गायली जातात. यामध्ये देवीची स्तुती तर असतेच, शिवाय समाजप्रबोधनासाठीसुद्धा
या गाण्यांचा उपयोग केला जातो. उदा. समाजात
कसे वागावे व कसे वागू नये, देवीचा जोगवा व आरतीसुद्धा गायली
जाते. पूर्वीच्या काळी गोंधळातील कथा रात्रभर चालायच्या.
त्यात प्रथम कथा गद्यातून सांगितली जायची व नंतर तीच पद्यातून सांगितली
जायची. या कथा रामायण, महाभारतामधील असायच्या.
त्या काळी रेडिओ, टीव्ही नव्हते. त्यामुळे सर्वजण पेठेतून, वाड्यांतून एकत्र बसून देवीचा
गोंधळ ऐकला जायचा. या पद्यातून वेगवेगळे विनोद केले जायचे.
जसे सासू-सासरे, सून-जावई यांना एकत्र आणायचे काम हे गोंधळमार्फत केले जात होते. मजेचे, खेळीमेळीच्या वातावरणात गोंधळ चालत असे.

No comments:
Post a Comment