रावणाचे पारिपत्य करण्यासाठी निघालेल्या रामाला हिने
विजयाचा वर दिला, म्हणून हिला ‘रामवरदायिनी’ असेही नाव पडले. अशी
कथा एकनाथांनी भावार्थ रामायणात दिलेली आहे. पुण्याजवळ सिंहगडाच्या
पायथ्याशी कोंढणपूर येथेही तुकाईचे एक मंदिर आहे तर रामवरदायिनी देवीची स्थापना शिवाजी
महाराजांनी प्रतापगडावर केली. अफझलखानाच्या वधानंतर त्यांनी तिथे
देवीचे मंदिर बांधले. तुळजाभवानी समर्थ रामदास स्वामींची कुलदेवता
होती. रामदासांनी तिच्यावर अनेक स्तोत्र रचलेली ओहत. ह्या देवीचे वैशिष्ट्य म्हणून असे सांगता येईल की, वर्षातून
तीन वेळा या देवतेचे सार्वजनिक शयन घडते. भाद्रपद व.
8 पासून अमावस्या, अश्विन
शु. 11 पासून पौर्णिमा आणि पौष शु. 1 पासून
अष्टमीपर्यंतचा काळ हा तिचा शयनकाळ असतो. या शयन काळात भक्तांना
तिची षोडपोचारे पूजाअर्चाही करता येत नाही. हे शयनगृह गाभार्याच्या बाजूला आहे. तेथे पलंगावर देवी पहुडलेली असते.
देवीचे दर्शन पुजारी या अशा पहुडलेल्या अवस्थेतच भक्तांना करवतात.
देवीचा हा पलंग कोल्हापूरच्या महाराजांनी दिलेला असून, तो संपूर्णतः हस्तदंती आहे. या देवीचे हिंदूंप्रमाणे
मुसलमान भक्तही आहेत. अफजलखानाच्या स्वारीच्यावेळी तेथील पुजार्याने देवीची मूर्ती लपवून ठेवली व त्या जागी दुसरी मूर्ती ठेवली. अफजलखानाने तीच देवीची मूर्ती समजून फोडून टाकली व ती फोडलेली ओबडधोबड मूर्ती
आजही देवीच्या पायमुखाजवळ पाहण्यास मिळते. येथील देवीची पूजा
दिवसातून चार वेळा होते. पहिला नैवेद्य भाजी- भाकरीचा दाखवला जातो.
अनेक
क्षत्रिय राजांची ही कुलदेवता असल्याने देवीचा जामदारखाना मौल्यवान दागदागिन्यांनी
व रत्नांनी समृद्ध आहे. तुळजाभवानीला रोज दह्या-दुधाने स्नान घालण्यात येते. तसेच विधिपूर्वक पूजा,
आरती सकाळ-संध्याकाळ असते. देवीची पूजा सुरू होण्यापूर्वी येथे एक अर्थपूर्ण रूढी आचरली जाते.
मंदिर व्यवस्थेसाठी असलेला जमादार पश्चिम दरवाजाजवळ
ललकारतो, ‘पुजारी आले हो, लवकर या.’
काय बरे याचे कोडे आहे? पूर्वी रणछोड भारती नावाचे
सत्पुरुष पश्चिम बाजूकडील मठात राहात असत आणि देवी त्यांच्या
बरोबर सारीपाट खेळण्यासाठी जात असे. एके वेळी पूजेची वेळ टळून
गेली तरी देवी जागेवर आली नाही. भक्तांबरोबर सारीपाट खेळण्यात
देवता दंग होऊन गेली. हे ज्यावेळी देवीच्या लक्षात आले,
तेव्हा तिने आज्ञा दिली की पूजेची तयारी झाली की मला बोलवण्यात यावे.
त्या सत्पुरुषाने आपला देह ठेवला तरी रूढी मात्र अद्यापही चालूच आहे.
मठही अद्याप त्या ठिकाणी पहावयास मिळतो. दर मंगळवारी
रात्री सिंह, गरुड, हंस, मोर इत्यादी लाकडी वाहनांवरून मंगलवाद्यांच्या निनादात देवीचा छबीना निघतो.
भक्त या पालखीपुढे बेहोश होऊन नाचत असतात.
आजच्या तुळजापूर गावाचा भाग हा अतिप्राचीन
आहे. यात काही शंका नाही कारण पुरणांमधून दंडकारण्याच्या सीमेवर
दिंडीरवनाचा उल्लेख मिळतो. तो हाच भागकृतयुगामध्ये या वनात कर्दम
नावाचे ॠषी आपली पत्नी ‘अनुभूति’ हिच्याबरोबर
राहात असे. दुर्दैवाने या मुनींचा अंतःकाल समीप येऊन ठेपला.
त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर असल्यामुळे त्यांच्याबरोबर सहगमन करू शकली
नाही. ती प्रसूत झाल्यानंतर मंदाकिनी नदीच्या किनार्यावर तपश्चर्या करू लागली. याचवेळेस
कुक्कुट दैत्य शिकारीसाठी भटकताना त्याला ‘अनुभूती’ नजरेस पडली. तो मोहित झाला व त्याने तिला स्पर्श केला
व तिची तपश्चर्या भंग पावली. डोळे उघडताच
दैत्याची भेसूर आकृती समोर दिसली. तिने मनात आदिशक्ती पार्वतीचा
धावा केला. संकटातून मुक्त करण्यासाठी पार्वती भवानी स्वरूपात
प्रकट झाली. तिने दैत्याचा नाश केला. भक्ताच्या
हाकेला त्वरित धावून आली म्हणून देवीचे नाव ‘तुरजा’ असे ठेवण्यात आले. तुरजा शब्दाची व्युत्पत्ती अशी की
तुर म्हणजे वेग आणि जा म्हणजे जाणे. तेव्हा ‘वेगाने जाणारी’ ती तुरजा. कालांतराने
तुरजा शब्दाचा अपभ्रंश ‘तुळजा’ असा झाला.
मरता मरता कुक्कुट राक्षसाने महिषासुराचे रूप घेतले. देवीने त्यालाही ठार मारले.
तुळजादेवीच्या पायाखाली राक्षसाचे
शव आणि हातात शीर आहे. देवीच्या मंदिराचे आवार विशाल आहे.
प्रथम देवीचे पादुकास्थान लागते. तेथे लहान दीपमाला
आहे नंतर भवानीमातेचे मुख्य मंदिर लागते. देवीच्या देवळावर विविध
देव तसेच छोटी छोटी मंदिरे यांची गर्दी दिसते. मंदिराची नक्षी
कलाकृती प्रेक्षणीय आहे. तर मंदिराचे शिखर सोनेरी रंगाचे आहे.
मंदिर संगमरवरी आहे. भवानीमातेसमोर संगमरवरी पाषाणाचा
सिंह आहे. देवी चांदीच्या व्यासपीठावर उभी आहे. ती पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे दरवाजे चांदीच्या पत्र्याने
आच्छादित आहेत. देवीचा मुकुट चांदीचा आहे. विविध अलंकारांनी सजलेली, हरितवस्त्र परिधान केलेली भवानीमाता
अत्यंत आकर्षक आहे. पौर्णिमेस व दर मंगळवारी रात्री भवानीमातेची
चांदीची प्रतिमा ठेवून छबिना निघतो. त्यावेळी छत्री, चार अब्दागिर्यांसह वाजत-गाजत
मंदिराला दोन प्रदक्षिणा घालतात. या वेळी देवीचे भक्त छबिन्यासमोर
पोत पाजळून ‘देशासाठी आईचा मी वाजवितो संबळ, पाजळिला मी पोत जीवाचा’ असे गाणे म्हणतात.

No comments:
Post a Comment