चार लाखाचे नुकसान;रॉकेलच्या दिव्यामुळे आग
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उमराणी येथील मुर्याप्पा मल्लाप्पा भंगारी व त्यांचे मामा साबू कुंडलाप्पा
खांडेकर यांच्या राहत्या घराला आणि जनावरांच्या गोठ्याला आग लावून सुमारे चार लाखाचे
नुकसान झाले. या आगीत सांसारिक साहित्य जळून खाक झाले तर तीन शेळ्या व त्यांच्या दोन पिल्ल्यांचा
होरपळून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेचारच्यादरम्यान
घडली.
उमराणी-कोट्टलगी रस्त्यावर उमराणीपासून सुमारे अडीच किलोमीटर
अंतरावर डोण भागात मुर्याप्पा भंगारी व साबू खांडेकर यांचे शेत
आहे. मळ्यात या दोघांची घरे एकमेकाला लागून आहेत. शेजारी भंगारी यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा आहे. सायंकाळी
साडेचार वाजण्याच्यादरम्यान मुर्याप्पा यांच्या पत्नीने चहा
केला. यावेळी पेटवलेला रॉकेलचा दिवा तसाच चुलीजवळ ठेवला आणि मळ्यातल्या
कामगारांना चहा द्यायला निघून गेल्या. अचानक, इकडे रॉकेलचा दिवा खाली पडून पेट घेतला. कुडाच्या भिंती
असल्याने घराने लगेच पेट घेतला. घर पेटत असतानाच वारेही जोरात
वाहत होते. त्यामुळे शेजारच्या साबू आणि जनावरांच्या गोठ्यालाही
आग लागली. बघता बघता सर्व काही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.
यात ज्वारी,गहू प्रत्येकी पाच पोती, तांदूळ दोन पोती, 20 ग्रॅम सोने, रोख 40 हजारांची रक्कम आणि संसारोपयोगी साहित्य व कपडेलत्ते
जळून खाक झाले.
गोठ्यातील तीन शेळ्या आणि दोन पिल्लेही
या आगीत होरपळून मेली. आग लागताच परिसरातील
वस्तीवरील लोक जमा झाले. भारनियमन असल्याने वीज नसल्याने विहिरीतून
पाण्याचा उपसा करता आला नाही. जवळपास पाणी नसल्याने लोकांना काहीच
करता आले नाही.

No comments:
Post a Comment