Friday, September 21, 2018

जो विद्यार्थी अपयश पचवतो तोच जीवनात यशस्वी होतो:प्राचार्य डॉ. युवराज भोसले

जत,(प्रतिनिधी)-
मैदानावर खेळ खेळत असताना खेळाडूमध्ये सांघिक भावना असणे गरजेचे आहे. मैदानावर खेळ खेळत असताना हार व जीत असणारच पण जो खेळाडू पराजय देखील आनंदाने पचवितो तोच जीवनात यशस्वी होतो,असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. युवराज भोसले यांनी केले.
जत येथील राजे रामराव महाविद्यालयात भरविण्यात आलेल्या तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी डॉ. भोसले बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे, श्रीमंत शार्दुलराजे डफळे, डॉ. श्रीपाद जोशी, शारीरक शिक्षण संचालक श्रीमंत ठोंबरे, प्रा. सिद्राम चव्हाण उपस्थित होते.
शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेमध्ये  भाग घेतला पाहिजे. मैदानावर खेळ खेळत असताना आपल्यामध्ये सांघिक भावनेचा विकास होत असतो. असे सांगून प्राचार्य डॉ. भोसले पुढे म्हणाले की, सांघिक भावनेमुळे आपल्यामध्ये समायोजन हा गुण वाढीस लागतो. जीवनामध्ये आपणास पुढे जायचे असेल तर, समायोजन असणे महत्वाचे आहे असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. व्ही एस. ढेकळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी खेळाकडे पाहताना करियर म्हणून पाहावे. खेळाचा मनापासून अभ्यास केला तर आपणास त्यामध्ये करियर करता येते. शासनाचा क्रीडा विभाग देखील विद्यार्थांना खेळासाठी अनेक सोयीसुविधा देत असते. म्हणून विद्यार्थ्यांनी खेळामध्ये आपले करियर म्हणून पाहावे, असेही ते शेवटी म्हणाले.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. सिद्राम चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. श्रीकांत कोकरे यांनी केले. या शालेय तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेचे नियोजन  प्रा. दीपक कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment