Friday, September 28, 2018

दीड हजार अभियंत्यांना रोजगार मिळणार


 घरकूल योजनांची प्रभावी अंमलबजावणी
जत,(प्रतिनिधी)-
प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने 1 हजार 600 अभियंते नेमण्याचा निर्णय घेतला असून या अभियंत्यांवर घरकूल योजनांचे तांत्रिक पर्यवेक्षण, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी टाकली जाणार आहे. मार्च 2020 पर्यंत या अभियंत्यांना काम मिळणार आहे.
या अभियंत्यांची ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ओळख राहणार आहे. या माध्यमातून आवास योजनेचे उदिष्ट साधले जाणार आहे. सर्वांसाठी घरे 2022 हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून राज्य सरकारने सर्वांसाठी घरे 2020 हा कार्यक्रम हाती घेतला असून याद्वारा कमी कालावधीत ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारकडून ग्रामीण भागामध्ये आर्धिक दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, राजीव गांधी निवारा योजना आदी योजना या जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येतात. राज्य सरकारने घोषित केलेल्या डोंगराळ, दुर्गम व एकात्मिक कृती आराखड्यातील जिल्हे या भागातील नवीन 200 घरकुलांसाठी अथवा प्रगतीपथावरील 800 घरकूल टप्प्यासाठी एक अभियंता तर सलग भूप्रदेश आणि इतर भागातील नवीन 250 घरकुलांसाठी अथवा प्रगतिपथावरील 1000 घरकुलांसाठी एक अभियंता या प्रमाणे राज्यामध्ये 1 हजार 600 अभियंते बाह्य यंत्रणेद्वारे नेमले जाणार आहेत.
बाह्य यंत्रणेची निवड करण्यासाठी जिल्ह अपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणाम्ची समिती स्थापन केली आहे. बाह्य यंत्रणेची निवड करण्यासाठी गुणांकन पद्धत असून जिल्हा पातळीवर याचा निर्णय घेतला जाणार आहे.  यासाठी पात्रता ही स्थापत्य अभियांत्रिकीमधील किमान पदविकाधारक अशी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. एका घरकूलसाठी 750 ते 1200 रुपयांपर्यंत मानधन दिले जाणार आहे. मार्च 2020 पर्यंत त्यांचा कालावधी असणार आहे. अभियंते नेमण्यास राज्य सरकारने 31 ऑक्टोबर 2018 ही अंतिम तारीख दिली आहे.




No comments:

Post a Comment