Sunday, September 23, 2018

उमदी-संख परिसरातील गावांना भीमा नदीचे पाणी देण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उमदी- संख परिसरातील गावांना सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीतून पाणी देण्याची मागणी जत तालुका विकास मंचने राज्याच्या जलसंधारण विभागाकडे केली आहे.
जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांना बाहेरून पाणी आणण्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. काँग्रेसचे नेते विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटक शासनाच्या तुरची-बबलेश्वर या उपसा सिंचन योजनेतून जत तालुक्यातील 67 गावांना पाणी मिळावे,यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी कर्नाटकचे तत्कालिन पाटबंधारे व अन्य मंत्र्यांची भेट घेतली आहे. शिवाय महाराष्ट्राच्या संबंधित मंत्र्यांचीदेखील भेट घेतली आहे. सध्या याबाबत अधिकारी पातळीवर चर्चा झाली आहे. आमदार विलासराव जगतापदेखील कर्नाटकातून जतला पाणी मिळावे,यासाठीच प्रयत्नशील आहेत. मात्र यासाठी दिरंगाई होत असल्याने अन्य मार्ग शोधले जात आहेत. आता जत तालुका विकास मंचने सोलापूर जिल्ह्यातून जतला पाणी देण्याची मागणी रेटली आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी भौगोलिक कारण देत वाळेखिंडी ते माडग्याळ असा कालवा फिरवत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात नेला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील पूर्व भागातील 67 गावे या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. याचा परिणाम या भागातील विकासावर होणार आहे. त्यामुळे भीमा नदीचे पाणी उमदीजवळ अगदी 10 किलोमीटर अंतरावर आले आहे. तेच पाणी पुढे जत तालुक्याला द्यावे, अशी मागणी विकास मंचची आहे.
सध्या भीमा नदीचे पाणी मरवडे-हुलजंतीपर्यंत कॅनॉलद्वारा आलेले आहे.हेच कॅनॉल जत तालुक्यात फिरवल्यास जत तालुक्यातल्या वंचित गावांना पाणी मिळणार आहे. शिवाय फारसा खर्चही अपेक्षित नाही. त्यामुळे कर्नाटकच्या नादाला न लागता जत तालुक्याला उजनी-भीमा नदीमधून पाणी देण्याची मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment