Sunday, February 3, 2019

सर्वोत्कृष्ट संसद पटू :राजू शेट्टी

फे म इंडिया या दिल्लीस्थित नावाजलेल्या मॅगझिनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळ येथे १ जून १९६७ रोजी जन्मलेले राजू शेट्टी हे स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आणि १५ व्या लोकसभेचे खासदार आहेत. शेतकर्‍यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे.
ते सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. २00९ च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना पराभूत करून धक्का दिला.
शेट्टी यांचा शेतकर्‍यांसाठी व कष्टकर्‍यासाठी संसदेमध्ये लढणारा सर्वोत्कृष्ट चर्चित संसदपटू म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. शेट्टी गेली पंचवीस वर्षे शेतकरी चळवळीमध्ये काम करत असून गेली दोन टर्म ते हातकणंगले या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. संपूर्ण देशभरातील शेतकरी संघटनांना एकत्रित करून त्यांना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीद्वारे शेतकरी चळवळ संपूर्ण देशभर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी िसंसदेमध्ये वेळोवेळी शेतकर्‍यांचे तसेच कष्टकर्‍यांचे प्रश्न मांडून या प्रश्नासाठी त्यांनी अविरत संघर्ष चालू ठेवला आहे. दोन दशकापूर्वी पश्‍चिम महारष्ट्रात काँग्रेसचा डंका वाजत असताना शेतकरी चळवळीची वाकडी वाट चालण्याचे धाडस या अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणाने दाखवले. ज्येष्ठ नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याच्या लढय़ात उडी घेतली. जोशी यांचा शिवसेना-भाजपकडे कल वाढल्याने धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा छेडत शेट्टी यांनी आपली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वेगळी छावणी उभारली. ऊस उत्पादक शेतकरयांच्या प्रश्नावर सुरू केलेल्या स्वाभिमानी संघटनेची मुळे रुजू लागली असताना शेट्टी यांना सदाभाऊ खोत हा आणखी एक तगडा तोफखाना मिळाला. जिल्हा परिषद ते खासदार व्हाया विधानसभा असा राजकीय आलेख उंचावणारे शेट्टी हे दूध, ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या गळ्यातील ताईत बनले. कर्जमाफी, हमी भाव, स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेती मालाची आयात - निर्यात आदी मुद्दांवर देशभरातील शेतकर्‍यांत तीव्र नाराजी आहे . त्याला केवळ वाचा फोडून चालणार नाही तर ते सुटले पाहिजेत या दिशेने त्यांचा लढा सुरू आहे.

No comments:

Post a Comment