Friday, February 22, 2019

अंधश्रद्धेवर प्रहार करणारे संत गाडगेबाबा

महाराष्ट्रात बरेच संत होऊन गेलेत, त्याच मालिकेत विदर्भातील अमरावती जिल्हय़ातील शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ साली श्री संत गाडगे बाबा जन्माला आले. त्यांना लहानपणी डेबू या नावाने ओळखत असे. बाबा अवती भोवतीच्या वातावरणामुळे खूप काही शिकून गेले. संत गाडगे बाबांनी स्वच्छतेला फार महत्त्व दिले. त्यांनी पाहिले की गावातील कचरा अस्त व्यस्त कुठे ही टाकला जातो. त्यामुळे लहान मोठे आजारी होऊन मृत्यूला बळी पडतात. हे पाहून बाबांची स्वच्छतेचे व्रत घेऊन स्वत:च्या हातामध्ये झाडू घेऊन गावोगावी जाऊन स्वत: साफसफाई करू लागले. बाबा साफसफाई बरोबरच गावातीललोकांना एकत्रित करून किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करू लागले. बाबाच्या या किर्तनामध्ये हजारो लोक शामील होत गेले.

संत गाडगे बाबा आपल्या किर्तनातून सांगायचे की, कोणी ही काम केल्याशिवाय खाऊ नये, हे त्यांचे ब्रिद वाक्य होते. म्हणून बाबा आधी ज्या गावात गेले ते गाव स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छ करायचे आणि नंतर किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून मग गावात भिक्षा मागून जेवन करीत असे. बाबा सांगत असत की, आपण आपले घरस्वच्छ ठेवने म्हणजे स्वच्छता नव्हे तर आपल्या घरा बरोबर संपूर्ण गाव परिसर स्वच्छ ठेवणे म्हणजे खरी स्वच्छता होय. डोक्यावर खापर व हातात खराटा घेऊन बाबा आयुष्यभर गावोगावी फीरले. कोणत्याही गावात गेले की स्वत: हातात खराटा घेऊन ते सकाळी गावातील घाण साफ करीत असे. त्या नंतर रात्री त्या ठिखाणी मुक्काम करून गावातील लोकांना आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनपर किर्तन करून त्या गावातून निघून जात होते.
एकदा बाबा नदीवरती कुष्ठ रोग्याची आंघोळ करून देत असताना बाजूला एक ब्राम्हण पिंडदान करीत होता. ते पाहून बाबांनी त्या ब्राम्हणाला विचारले की, तुम्ही हे काय करीत आहात? त्यावर तो ब्राम्हण म्हणाला की, मी मेलेल्याचे पिंडदान करीत असून त्यांना नैवैद्य देत आहे. हे ऐकून बाबा नदीचे पाणी जोर जोराने बाहेर फेकू लागले. ते पाणी ब्राम्हणाचा अंगावर उडत होते. ते पाहून ब्राम्हण म्हणाला, 'ऐ म्हातार्‍या, तू हे काय करीत आहे?' त्यावर बाबा म्हणाले की, 'मी आपल्या शेतीला पाणी देत आहे.' त्यावर तो ब्राम्हण म्हणाला, 'तुझी शेती कुठे आहे?' त्यावर बाबा म्हणाले, 'माझी शेती अमरावतीला आहे.' हे ऐकूण ब्राम्हण म्हणाला,'तु मुर्ख आहे का, एवढय़ा दुरून तुझ्या अमरावतीच्या शेतीला पाणी कसे जाईल?' हे ऐकूण गाडगेबाबा म्हणाले, तुझ्या मेलेल्या पूर्वजांना जर स्वर्गात येथून नैवैद्य जात असेल तर माझे शेत अमरावतीत स्वर्गापेक्षा फार जवळ आहे, असे म्हणून त्या ब्राम्हणाला बाबांनी निरोत्तर केले.
संत गाडगेबाबांनी कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. तरी सुद्धा ते आपल्या किर्तनातून शिक्षणाचे महत्व पटवून देत होते. कारण बाबांनी बहुजन समाजाची अधोगती होताना पाहिली. दारिद्य्रामुळे होत असलेली त्यांचे हाल पाहिले. हे सगळे नुकसान शिक्षण न घेतल्यामुळे होत आहे. हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून ते आपल्या किर्तनातून शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊ लागले. ते लोकाना सांगत असे की, बायकोला नवीन लुगडे घेऊन देऊ नका, एका वेळेला उपाशी राहा पण मुलांना शिकवा, त्यांना शाळेत पाठवा असे तळमळीने सांगत असे. गावामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे लोकांचा देवी देवीतांवर खूप विश्‍वास होता ते देवाला खूश करण्याकरिता कोंबड्या, बकरीचा बळी देत असे, हे पाहून गाडगे बाबांना खूप दु:ख होत असे.
गाडगेबाबा आपल्या किर्तनातून दारूच्या व्यसनावरसुद्धा लोकांमध्ये जन जागृत करीत होते. दारूच्या नशेत असलेले बरेच लोक रस्त्याच्या कडेला किंवा घाणेरड्या जागी पडलेले आढळतात. गरीब लोक दिवसा मोलमजुरी करून रात्री दारू पितात. घरी त्यांची मुलबाळ वाट पाहतात. त्यांना अपल्या घरची चूल पेटली की नाही हे ही माहीत नसते. पत्नीला शिविगाळ करणे, मारझोड करणे अशा स्त्रियांना या छळातून मुक्त करण्याकरिता बाबा नेहमी आपल्या किर्तनातून व्यसन मुक्तीचा प्रसार प्रचार करीत असे.
संत गाडगे बाबांनी 'मानव सेवा हीच खरी सेवा आहे' असे मानत असे. बाबांनी कुष्ठरोग्याची सेवा केली, प्राणीमात्रांची सेवा केली, गुराढोरांची सेवा करताना ते म्हणत असे, आपण उपाशी ठेवू नये. संत गाडगेबाबा बैलांना पूज्य मानत होते. बैल आणि गाय निरपरायोगी झाल्यानंतर त्यांना कसायाकडे न विकता त्यांना आपल्या आई वडिलांप्रमाणे सांभाळ करा, असे ते सांगत असे. मानवी जीवनामध्ये संत गाडगे बाबांनी सार्वजनिक कार्याला फार महत्त्व दिले आहे. त्यांच्यामते आपण सामाजिक कार्य किती करतो? याला महत्त्व नसून ते समाजाच्या दृष्टीने कीती महत्त्वाचे आहे? याला महत्त्व आहे. गाडगेबाबा आपल्या किर्तनातून नेहमी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत असे, तसेच लोकांना दारू, गांजा, बिडी, सिगारेट अशा कोणत्याही नशेच्या व्यसनापासून दूर रहायला सांगत असे. त्याचप्रमाणे लोकांमधील अंधर्शद्धा, जादुटोना, बुवाबाजी, चमत्कार यावर विश्‍वास ठेवू नका, असे ते सांगत असे. 'देव दगडाच्या मूर्तीत नाही, तो तुमच्या दरिद्य्र नारायणाच्या रुपात उभा आहे, त्याची सेवा करा' तीच खरी इश्‍वर सेवा आहे, असे गाडगे बाबा सांगत असे, अशा महामानवाचे निधन २0 डिसेंबर १0५६ रोजी झाले.
आज निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्ताने नव्या पिढीने व्यसनापासून दूर जाण्याची शपथ घेऊन संपूर्ण समाज व्यसनमुक्त कसा होईल? याकडे लक्ष देऊन बाबांनी दिलेल्या १0 कलमी संदेशानुसान भुकेलेल्याना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नांगड्यांना कपडे, बेघरांना घर, बेकारांना रोजगार, अंध, पंगू रोग्यांना औषधोपचार, पशू- पक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब मुलामुलींचे लग्न, दु:खी व निराश्रांना हिम्मत, अशिक्षितांना शिक्षण हा समाज जागरणाचा संदेश प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनात रुजविला पाहिजे.

No comments:

Post a Comment