Sunday, December 23, 2018

टीईटी परीक्षा मार्चमध्ये


शिक्षकांना नोकरीसाठी बंधनकारक
जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबत प्राथमिकस्तरावर आढावा घेतला असून, शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्य शासनाने शिक्षकांच्या नोकरीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधनकारक केले आहे.

सदर परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याची घोषणा शासनाकडून अनेकदा करण्यात आली होती. प्रत्यक्षात ती एकदाच घेण्यात येते. चालू वर्षात 15 जुलैला परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर परीक्षाच झालेली नाही. 2012 च्या दरम्यान सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना 31 मार्च 2019 पूर्वी उत्तीर्ण होण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे परीक्षाचे नियोजन कधी होणार,अशी विचारणा होत आहे. परीक्षा परिषदेने येत्या जानेवारीमध्ये परीक्षा घेण्याबाबत नियोजन केले होते. या मान्यतेसाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे परिषदेकडून 18 सप्टेंबरलाच प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, प्रस्तावाची दखलच घेण्यात आली नव्हती. आता शासनाच्या कक्ष अधिकार्यांकडून परिषदेकडे परीक्षाचे आयोजन कधी करता येईल याबाबत नुकतीच विचारणा करण्यात आली आहे. त्यावर परिषदेने आता मार्चमध्येच परीक्षा घेता येईल, असे शासनाला कळविले आहे. त्यामुळे शासनाकडून रीतसर मान्यतेचे पत्र लवकर प्राप्त होणार आहे. दरम्यान, परिषदेच्या वतीने 24 फे ब्रुवारीला इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षाही फे ब्रुवारी, मार्चमध्येच होणार आहे. यंत्रणांच्या व्यस्ततेमुळे या परीक्षा आटोपल्यानंतरच टीईटीसाठी यंत्रणा उपलब्ध होणार आहे.



No comments:

Post a Comment