Monday, December 24, 2018

काँग्रेसने तुबची योजनेचे राजकारण करू नये


जत,(प्रतिनिधी)-
 जत पूर्व भागाला वरदान ठरणार्या योजनेवर दहा वर्षांपासून काम करीत आहे, असे सांगून भाजपच्या काही पदाधिकार्यांवर आरोप करणार्या विक्रम सावंत यांची या योजनेची फाईल पुढे सरकली का, असा सवाल करून आमच्या प्रयत्नांना यश येत असेल तर त्यात काँग्रेसने राजकारण करू नये, असा जोरदार टोला भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. रवींद्र आरळी यांनी पत्रकार बैठकीत लगावला.

 भाजपच्या बैठकीत झालेल्या मतभेदानंतर काँग्रेसने पत्रकार बैठक घेत जोरदार हल्ला भाजप वर केला होता. याला डॉ.रवींद्र यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी डॉ. आरळी म्हणाले की,भाजपच्या नियोजन बैठकीत आपले काही मतभेद समोर आले आहेत, ही वस्तुस्थिती खरी आहे. पण या मतभेदात काँग्रेसने नाक खुपसण्याची काहीच गरज नाही. आमच्याच काही समजुतीमुळे हा प्रकार घडला आहे. तो आमच्या पक्षाचा प्रश्न आहे. येणारी लोकसभा आम्ही ताकदीने लढणार आहोत, आमच्यात कसलेच मतभेद नाहीत, काही असतील तर ते पक्षीय पातळीवर मिटवले जातील. एकसंघ भाजपाची ताकद येणार्या लोकसभेत दाखवून देणार आहोत. त्यामुळे विरोधकांनी भाजपात फूट पाडण्याचे आणि राजकारण घुसडण्याचे प्रयत्न करू नयेत. शिवाय तुबची योजनेसाठी आम्ही कर्नाटक मुख्यमंत्री, राज्याचे जलसंपदामंत्री यांना भेटलो सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला. जतला पाणी मिळावे ही आमची आहे. पण काँग्रेस उगीच राजकारण करीत आहे. जत तालुक्यात तुबची योजनेचे पाणी आम्ही आणून दाखवू. त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहोत.
 दहा वर्षे झाली विक्रम सावंतांची फाईल पुढे सरकली नाहीयेणार्या काळात ताकद समजेलडॉ रवींद्र आरळी हे 28 वर्षांपासून भाजपात एकनिष्ठपणे काम करीत आहेत. आज काही लोकांना भाजपच्या तिकिटांची चिंता लागली आहे. ज्या डॉ.आरळी यांनी पक्षासाठी योगदान दिले, त्यांच्यासाठी एखादे पद मिळावे, अशी मागणी कुणीच करत नाही. या पक्षात तिकीट वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो. सांगलीतून पुन्हा कमळ फुलणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पक्षाचा अध्यक्ष म्हणून केलेली कामगिरी पक्षाकडे आहे त्यामुळे माझ्या मागे लोक आहेत का कुणाच्या मागे फिरतो, असे आरोप करणार्यांची दखल घेण्याची गरज नाही. येणार्या काळात आमची ताकद समजेल, असा टोला तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी यांनी लगावला.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रविपाटील म्हणाले,आमच्या घराण्याने आजवर दिलेल्या योगदानाची दखल घेऊन जिल्ह्याच्या सभापतिपदी काम करण्याची संधी दिली आहे माझ्या कार्यकाळात अनेक उठावदार कामे आपण केली. कर्नाटकातून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. विकासकामांसाठी सभापतिपद आहे. हे पद काही मला आयुष्यभरासाठी नाही. त्यासाठी कधीही त्यागायला तयार आहे. परंतु आजोबा, वडिलांपासून ते आतापर्यंत अनेकदा संधी येऊनही आमच्या घराण्याला न्याय दिला नव्हता. आज चौथ्या पिढीला हे पद दिले आहे. पुढच्या काळात आणखीन नेटाने काम करणार आहोत, असेही शिक्षण सभापती तम्मनगोडा रवी पाटील म्हणाले. या पत्रकार बैठकीत शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील, तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment