Sunday, December 23, 2018

स्मार्ट युगात मुलांनी वाचले पाहिजे


प्रत्येक पिढीतील पालकांना असे वाटत असते की, आपली मुलं ही अजून जास्त हुशार हवीत. हुशार म्हणजे पाठ्यपुस्तकीय गुणवत्तेसोबतच त्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश प्राप्त करावे. काही पालक आपल्या मुलांसाठी सतत चिंतातुर असतात. त्यांना काळजी असते की, या मुलांचं भविष्यात कसं होईल? पालक चिंतातुर आहेत, कारण पालक आज पाठ्यपुस्तकीय गुणवत्तेच्या मागे लागले आहेत. मुलांच्या कल्पनाशक्तीच्या विकासावर कोणाचाच भर दिसत नाही.

आजची आपली मुलं ही पाठ्यपुस्तकीय गुणवत्तेत पुढे आहेत, परंतु कल्पनाशक्तीचा विस्तार करण्यामध्ये फार कमी पडत आहेत. त्यामुळेच व्यक्तिमत्त्व विकासामध्ये ही मुलं कमी पडलेली दिसत आहेत. याला कारण आपल्या घरामध्ये मुलांच्या हातात आपण गोष्टींची पुस्तकं मोठ्या प्रमाणावर देत नाही. ज्या घरांमध्ये लहानपणापासून मुलांना बालसाहित्य वाचनासाठी प्रोत्साहन दिले जात नाही त्या घरातील मुलं एकलकोंडी, हेकेखोर किंवा दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाची दिसतात, असं आता सर्वच शिक्षणतज्ज्ञ व मानसतज्ज्ञ म्हणू लागले आहेत. आपल्याला आपली भावी पिढी जर मानसिकदृष्ट्या निरोगी व कल्पक घडवायची असेल, तर बालपणापासून मुलांच्या हातात सकस बालसाहित्य देता आले पाहिजे. कारण मुलांचे भावविश्व हे बालसाहित्य वाचनातून लवकर समृद्ध होते. गेल्या पिढीतील आजी-आजोबा ही लहान मुलांसाठी गाणी-गोष्टींची चालतीबोलती विद्यापीठं होती. ही माणसं पाठ्यपुस्तकीय शिक्षणाच्या दृष्टीने निरक्षर असतील, परंतु मौखिक परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण त्यांच्याजवळ होते.
आजच्या मुलांच्या भरणपोषणाच्या काळात आजी-आजोबा ही संस्कारक्षम परंपराच आपण गमावून बसलो आहोत. जिथे कुटुंबातीलच संवाद संपत चालला आहे, तिथे मौखिक परंपरेने लाभलेले संस्कारधन वृद्धिंगत करण्यात कुटुंब आणि शिक्षणव्यवस्थेला अपयश आले आहे. आपल्या देशात मुलांच्या हातात तंत्रज्ञानयुक्त स्मार्ट फोन आले आणि त्यांचे पुस्तकांशी असलेले नातेच जणू इतिहासजमा झाले. स्मार्टफोनमुळे आजच्या बालपिढीतील उत्सुकताच मरत चालली आहे. मुलांमधील उत्सुकता, कल्पनाशक्ती जतन करण्याचं काम बालसाहित्य करीत असते. आज पाश्चिमात्य देशांमधील बालसाहित्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल झालेले दिसतात. मुलांच्या हाती रंगीत चित्रांची बोलकी पुस्तके, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकाशित केलेली बालगोष्टींची पुस्तके मोठ्या प्रमाणावर दिसतात.
पाश्चिमात्य देशात चाईल्ड लायब्ररींना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य असते. आपल्याकडील बालसाहित्याची पुस्तके अजूनही आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारलेली दिसत नाही. मुळामध्ये बालसाहित्यासाठी आता गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. मराठीतील बालसाहित्य नाही म्हटलं तरी अजूनही इतर प्रगत जगातील बालसाहित्याचा विचार केला असता फार मागे आहे, असे जाणवते. मराठी बालसाहित्याची मोजून आठ-दहा मासिके प्रकाशित होतात. त्यांचा 12 कोटीच्या महाराष्ट्रात एक लाखाच्या घरातसुद्धा खप नाही, ही कुणालाच चिंतेची बाब वाटत नाही. मराठीतील अनेक साहित्यिक आपल्या आयुष्याच्या म्हणजे आपल्या बालपणीच्या आठवणी सांगून मुलांना, हेच बालसाहित्य आहे, असे भासवण्याचे काम करीत आहेत. काही अपवाद वगळता मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारे बालसाहित्य मराठीत सध्या कमी लिहिले जाते, यासाठी कदाचित आजच्या आपल्या लेखकांची विविधांगी अनुभवांची ओंजळच फारशी समृद्ध नाही, असे वाटते.
 मराठी बालसाहित्याला एक मोठी समृद्ध परंपरा आहे. काही पिढ्यांचे भरण-पोषण याच बालसाहित्याने केले आहे. परंतु, आजच्या तंत्रस्नेही बालपिढीच्या भावविश्वाला बालसाहित्य वाचनाकडे कसे वळविता येईल, हा आज महत्त्वाचा प्रश्न आहे. या तंत्रस्नेही मुलांना वाचनाकडे वळविणे ही बालसाहित्यक्षेत्रात लेखन करणार्या साहित्यिकांवर फार मोठी जबाबदारी आली आहे. मुळात आज तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर बालसाहित्य लेखकांनी करून घेतला पाहिजे. बदलते तंत्रज्ञान ही या क्षेत्रासाठी संधी आहे. मुलांसाठी ई-बुक स्वरूपात बालसाहित्य लिहिण्याची मानसिक तयारी लेखकांनी करून घ्यावी.
 शाळांमधून अवांतर वाचनतासिका हा टाईमटेबलचा भाग असावा. विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वयोगटांचा विचार करून वर्गनिहाय पूरक वाचनमाला असावी. प्रत्येक शाळेत वाचनालय व तिथे पूर्णवेळ ग्रंथपाल असावा. अशा काही सुधारणांसह बालसाहित्य लेखकांनीसुद्धा आपापल्या परिसरातील एक एक शाळा वाचनसंस्काराच्या दृष्टीने दत्तक घेतली, तर निश्चितच भविष्यात काही चांगले वाचक तयार होतील. आज वाचक घडविण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. सोव्हिएत रशियाची उभारणी होत असताना त्या देशाने सर्वप्रथम बालसाहित्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं व आपल्या देशासाठी देशप्रेमाने व मानवतावादी विचारांचे बालसाहित्य त्यांनी अतिशय माफक किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर देशभर व जगभर विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिले होते. भारतात नॅशनल बुक ट्रस्टद्वारे असे प्रयत्न सुरवातीला होताना दिसले, परंतु सरकारी नोकरशहांनी ही पुस्तके गावंखेड्यापर्यंत पोहचू दिली नाही.
बालसाहित्याच्या वाढीसाठी महाराष्ट्रात आज स्वतंत्र बाल विद्यापीठाची नितांत गरज आहे. मुंबई येथे सर्व सोयींनी युक्त असे जे बालभवन आहे तसेच बालभवन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाले पाहिजेत. या बालभवनमुळे विद्यार्थ्यांना साहित्य, कला, वाचन, संगीत, नृत्य, चित्र, नाटक, गायन, अभिनय अशा विविध कलांची जोपासना करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासारखे शिक्षण विभागाने व विविध साहित्य संस्थांनी दरवर्षी तालुका-जिल्हास्तरीय विद्यार्थी बालसाहित्य संमेलनांचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करावे, यामुळे विद्यार्थिदशेतच वाचन, लेखन आणि वाणीचा संस्कार मुलांवर होईल. शाळाशाळांमधून शिक्षक आणि पालकांनीच दरवर्षी एकातरी बालमासिकाची वर्गणी आपल्या विद्यार्थी, पाल्यांच्या नावाने भरणे अत्यावश्यक समजावे. चॉकलेटच्या किमतीत मुलांसाठी पुस्तके पाठ्यपुस्तक मंडळ आणि छइढ ला प्रकाशित करता आली पाहिजे. मुळात वास्तव जगातील विदारकता बदलविण्यासाठी मुलांना स्वप्न पाहण्याची ताकद बालसाहित्यातून देता आली पाहिजे. यासाठी आजच्या काही बालिश बालसाहित्याला प्रगल्भतेचे वरदान लाभण्याची नितांत गरज आह

No comments:

Post a Comment