Wednesday, March 6, 2019

शिक्षकांच्या बदल्या तालुका केडरनुसारच व्हाव्यात:राज्यमंत्री शिवतारे


जत,(प्रतिनिधी)-
 शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत असलेल्या शिक्षकांचा प्रशासकीय बदलीत का समावेश केला आहे, हा प्रश्न मला नेहमी सतावतो. गावच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्या शिक्षकांच्या जिल्हा केडर मानून बदल्या केल्या जातात. या बदल्या तालुका केडरनुसारच व्हाव्यात. यासाठी मी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावेन, असे उद्गार राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी सासवड येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षक मेळाव्यात काढले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

 पवार म्हणाले, राज्यातील अनेक ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित राहिलो. या व्यासपीठावर संघटनेच्या मेळाव्याबरोबरच शैक्षणिक चर्चासत्र आयोजित केले जाते, ही आनंदाची बाब आहे. संभाजीरावांना विधान भवनात संधी दिली पाहिजे. पण आमचा या अगोदरचा अनुभव पाहता मला चिंता वाटते. पण एका मोठ्या शिक्षक संघटनेचा नेता विधान भवनात असला पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. निवडणुकांचा कालावधी संपताच संभाजीरावांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करु, असे आश्वासन पवार यांनी दिले. शिक्षकांचे प्रश्न विधान भवनात उपस्थित करुन ते सोडवून घेण्यासाठी संभाजीराव थोरात यांना विधानमंडळात संधी देण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी काढले. शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करु. शिक्षण; तसेच ग्रामीण विकास खात्याच्या प्रमुखांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल. राज्याचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी स्वागत करुन जुनी पेन्शन योजना, शिक्षकांच्या बदल्या, विद्यार्थी गणवेश योजना अशा महत्त्वाच्या मागण्या व्यासपीठावर मांडल्या. संभाजीराव थोरात यांनी प्रास्ताविकात म्हणाले, शिक्षकांच्या बदल्या गैरसोयीच्या झाल्याने शिक्षक तणावात आहेत. बदली धोरण बदलले पाहिजे. शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळायला हवा. आमच्या मागण्या मान्य करा. आमचं काम करणार्या माणसाला आम्ही खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर फिरु. सुप्रिया सुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यक्रमास प्रथमच उपस्थित होत्या. प्रा. गणेश शिंदे, दिगंबर दुर्गाडे यांनी शिक्षण व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून शिक्षण परिषदेची सुरुवात झाली. शरद पवार यांच्या सूचनेनुसार सर्व प्रकारच्या हार-तुरे सत्काराला फाटा देण्यात आला. पुणे जि. . सदस्य रोहित पवार सांगली जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, पुणे विभाग अध्यक्ष तानाजी खोत, राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार, संपर्क प्रमुख राजकुमार पाटील, सरचिटणीस अविनाश गुरव, जिल्हा नेते पोपट सूर्यवंशी, अशोक महिंद, सुधाकर पाटील, शामगोंडा पाटील, अशोक पाटील, महादेव हेगडे, महादेव पवार, दगडू येवले, धनंजय नरुले, उपस्थित होते. स्वाती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अंबादास वाजे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment