Saturday, March 9, 2019

सर्व आमदार,पक्षाचे पदाधिकारी माझ्यासोबत:खासदार पाटील


सांगली,(प्रतिनिधी)-
 विकास कामाचा डोंगर उभा केलेला असताना माझ्या विरोधात भाजपमध्ये संशयास्पद वातावरण केले जात आहे. अशा कुरघोड्या करणार्यांच्या खोलात जावून माहिती घेऊ असे कृष्णा खोरे विकास महा- मंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. मी आयुष्यात कोणाच्या मागे लागलो नाही. कोणी कोटी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची फिकीर केली नाही. मी विकासकामाचे ध्येय ठेवून काम केले, त्यावरच उभा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. संजय पाटील यांच्या विरोधात पक्षात अनेक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध, नाराजी सुरू आहे. याबद्दल विचारता ते म्हणाले, तसे काही नाही. सर्वच आमदार, पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. त्यातून जरी कोणी कार्यकर्ते संशयास्पद वातावरण करीत असेल तर त्याच्या खोलात आता जावेच लागेल, असेही ते म्हणाले.
आमदार, पदाधिकार्यांकडून तुमच्या उमेदवारी- बद्दल निश्चिती दिली जात नसल्याबद्दल विचारता पाटील म्हणाले, भाजपमध्ये उमेदवारीची प्रक्रिया आहे. नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही त्यांची उमेदवारी निश्चित नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे माझ्या उमेदवारीबाबत तरी कोणी खात्रीशीर जाहीर करणार? शिवाय माझ्याबद्दल त्यांना कोणाला अडचण असेल तर त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सांगितले असेल. अर्थात मी सांगलीतून विद्यमान खासदार म्हणून प्रबळ दावेदार आहे. आता पुढे काय होते, पाहू. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या नाराजीबद्दल विचारता ते म्हणाले, तसे काही नाही. ते भाजपमध्येच आहेत. दोन महिन्यांपूर्वी आम्ही एकत्र बसलो होतो. ते काही माझ्याबद्दल कोणतीही नाराजी नाही असे म्हणत गोपीचंद पडळकर यांच्या नाराजीबाबत मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, मी आयुष्यभर लढतच आलो आहे. जिल्ह्याच्या आणि लोकांच्या विकासाचे ध्येय ठेवून काम केले. त्यातून गेल्या पाच वर्षांत हजारो कोटींची विकासकामे झाली आहेत. त्यामुळे मी विकासकामांवर आहे, कोणाच्या मागे लागण्याची मला गरज नाही. तासगावात लक्ष केंद्रीत केल्याबद्दल विचारता ते म्हणाले, मी सांगलीतून राजकारणाची सुरुवात केली तरी गेल्या 1998 पासून 30 वर्षांपेक्षा अधिक काळ तासगावातूनच लढत आलो आहे. मला तेथील लोकांनी मोठे केले, त्यामुळे तेथे लक्ष दिले आहे. पण मी लोकसभाच लढणार आहे. विधानसभेत मला इंटरेस्ट नाही. तासगावमधून विधानसभेला कोण, याबद्दल विचारता ते म्हणाले, पहिल्यांदा लोकसभेचे आणि माझ्या उमेदवारीचे तरी लगीनहोऊ द्या. नंतर पुढचे पुढे पाहू. माझ्याविरोधात उमेदवारी नको म्हणतात..! भाजपबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादीशीही अधिक सलगीबद्दल विचारता ते म्हणाले, निवडणूक झाल्यानंतर खासदार म्हणून मी सर्वांचा आहे. अर्थात यामुळेच विरोधी पक्षातील कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करतात. निवडणुकीत माझ्यासाठी काम करायला तयार होतात, हे चांगलेच आहे. माझ्याविरोधात विरोधी पक्षातूनही कोणी उमेदवारी नको म्हणत आहेत हे माझ्या आणि भाजपच्यादृष्टीने विजयाचा मार्ग सोपाच आहे. मागील वेळी अडीच लाखांचे मताधिक्य होते. यावेळी साडेतीन लाखांवर आणि देशात सर्वाधिक मताधिक्याने विजयाचे टार्गेट असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment