Friday, March 8, 2019

मतांवर डोळा ठेवून 42 गावांसाठीची जुमलेबाज योजना : पृथ्वीराज पाटील


जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयाण आहे. जत तालुक्यातील 42 गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. यापूर्वी त्यांना कर्नाटकातून पाणी देण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागली होती. मात्र पाच वर्षांत त्यामध्ये त्यांना अपयश आले. हे अपयश झाकण्यासाठी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 42 गावांच्या पाणी प्रश्नासाठी म्हैसाळ योजनेचा विस्तार करणारी फसवी योजना खासदार व जतच्या आमदारांनी आणली आहे. निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी ही जुमलेबाजी सुरू आहे.
मात्र जनता भूलथापांना बळी पडणार नाही, त्यांना निवडणुकीत फसवणुकीचे उत्तर देईल, असा हल्लाबोल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले, जिल्ह्याचा 60 टक्के भाग दुष्काळी आहे. जत तालुक्यात दुष्काळ भीषण आहे. वंचित गावांना कर्नाटकातून पाणी देण्याची नेत्यांनी घोषणा केली. कर्नाटकातील पाण्याला पर्याय म्हणूनम्हैसाळचा विस्तार करून 42 गावांच्या समावेशाची नवी योजना भाजप खासदार, आमदारांनी मांडली. म्हैसाळ योजना उपलब्ध पाणी, गावांचा सहभाग निश्चित करून बनवली. नवीन गावांना देण्यासाठी पाणी कोठून उपलब्ध करणार, असा प्रश्न आहे. निवडणुकीच्या तोंडावर जाहीर फसवणुकीचा फंडा आणला आहे. ते म्हणाले, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी गावांसह आठ तालुक्यांचा दौरा केला. दुष्काळ गंभीर आहे. पशुधन धोक्यात आहे. चारा छावण्या देण्याची गरज आहे. मागेल तेथे टँकर दिला पाहिजे. प्रशासन व सत्ताधार्यांंचे दुर्लक्ष आहे. भाजपविषयी जनतेत नाराजी आहे. केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी आणता आला नाही. त्यामुळे नुकसान झाले आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. जतच्या वंचित गावांना पाणी देण्यासाठी काँग्रेसचाच खासदार पाहिजे.’’ लोकसभेसाठी मतदार संघ निश्चितीनंतर उमेदवार निश्चित होतील अशी परिस्थिती आहे. पार्लमेंटरी बोर्डाने माझ्यासह एका उमेदवाराची शिफारस केंद्राकडे केली आहे. पक्ष जो कोणी उमेदवार देईल, त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी प्रतिक्रिया श्री पाटील यांनी लोकसभेच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केली.

No comments:

Post a Comment