Thursday, March 7, 2019

निवडणूक आचारसंहितेची सर्वांनाच प्रतीक्षा


सांगली,(प्रतिनिधी)-
 सर्व शासकीय अधिकार्यांना घाई लोकसभा निवडणूक आचारसंहितेची लागली आहे, तर लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकार्यांना आचारसंहितेच्या आधी किमान कामे मंजूर करून घेण्याची घाई लागली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आज (शुक्रवारी) किंवा रविवार-सोमवारी लागेल, अशी शक्यता आहे. महापालिकेतील कार्यालयात नगरसेवक, पदाधिकार्यांची वर्दळ वाढत आहे, ती विकासकामांच्या फायली मंजूर करुन घेण्यासाठी, अधिकारी तर इतके वैतागले आहेत की कधी एकदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागते, असे झाले आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल येत्या आठवड्यात वाजणार आहे. ही आचारसंहिता आज किंवा रविवारी-सोमवारी लागेल, अशी शक्यता आहे. मंत्रालयातूनही तसे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. शासनाने सांगली पालिकेच्या विकासकामांसाठी शंभर कोटी मंजूर केले. त्याला प्रशासकीय मान्यताही दिली. प्रशासकीय मान्यता मिळताच त्याच्या दुसर्याच दिवशी तातडीने स्थायी समितीची सभा घेऊन या कामाच्या निविदा प्रक्रियेलाही मंजुरी घेतली आणि या निर्णयाप्रमाणे निविदा जाहीर केल्या. या निविदा आपल्या पदरात पडाव्यात, यासाठी भाजप समर्थक ठेकेदार पदाधिकार्यांच्याशी गुप्त चर्चा करीत आहेत. विरोधकांनी आपापली कामे शंभर कोटीत घालून मोकळे झाले आहेत. निविदा निश्चित झाल्या तरी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास किमान दोन-अडीच महिने तरी काम रखडणार हे निश्चित आहे. किमान मंजुरी तरी मिळावी यासाठी नगरसेवक, पदाधिकारी पालिकेत आयुक्त, उपायुक्त यांच्या कार्यालयात खेटे मारत आहेत. आयुक्तांनीही गरज पाहून सदस्यांच्या कामाला मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक सदस्यांना दहा-दहा लाखांची कामे स्थानिक विकास फंडातून सुचवण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे सदस्यांनी, पदाधिकार्यांनी आपापल्या प्रभागातील गरजेची दहा-दहा लाखांपर्यंतची कामे सुचवून आयुक्तांच्या सह्या घेण्याची घाई सुरू झाली आहे. बांधकाम विभागासह सर्व विभागातील अधिकारी सदस्यांच्या त्रासाने वैतागले आहेत. कधी एकदा आचारसंहिता लागते असे झाले आहे. अभियंते यांनी घाई-घाईने प्रस्ताव तयार करून पाठवले सदस्यांच्या करवी पाठवले, आयुक्तांनी मात्र काटेकोर चाळणी करूनच फायलीवर सह्या करायला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक यंत्रणा लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहे. मतदार याद्या, अन्य कामांना गती आणली आहे. पक्षाचे उमेदवारच ठरेनासे झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पक्षाचे नेते मुंबई-दिल्लीत तळ ठोकून आहेत.

No comments:

Post a Comment