Wednesday, March 13, 2019

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच येणार उमेदवारांची छायाचित्रे


जत,(प्रतिनिधी)-
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. लोकसभा मतदारसंघासाठी दुसर्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 19 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच मतपत्रिकेवर उमेदवारांचे पासपोर्ट फोटो छापण्यात येणार असल्याची माहिती राज्यातल्या विविध जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एका उमेदवारास 70 लाख रूपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा आकडा ओलांडता येणार नाही, अशी ताकीद देण्यात आली. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही स्वरूपात लाऊडस्पीकर लावता येणार नाही. धावत्या वाहनांवर स्पीकर लावून प्रचार करता येणार नाही. प्रत्येक जाहिरातीचा खर्च रोजच्या रोज उमेदवाराने दाखल करावयाचा आहे. आदी संदर्भात निवडणूक आयोगाच्या वतीने कडक स्वरूपात नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीत उभे राहणार्या उमेदवारांचे सोशल मीडियातील अकाउंट तपासले जाणार असून तेथील प्रचारावरही नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक उमेदवारास आपल्या स्वतःवर असलेल्या गुन्ह्यांची माहिती जाहिरात समजून तीनवेळा देणे बंधनकारक आहे. यावेळी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनवर कोणाला मतदान केले, हे समजणार आहे. ज्याला मतदान केले, त्याचे चित्र 7 सेकंद व्हीव्हीपॅट मशीनवर दिसणार आहे. या निवडणुकीत प्रशासकीय यंत्रणेद्वारे मतदारांना पोलचिटचे वाटप करण्यात येणार आहे. 100 टक्के मतदान व्हावे, असा आपला प्रयत्न राहणार आहे. जे मतदार अंध, अपंग आहेत, आजारी आहेत अशा मतदारांनी 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तर त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणणे व घरी नेऊन सोडण्यापर्यंतची सोय प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता त्या, त्या मतदान केंद्रांवर सावली, मतदारांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होणार नाही, अशी दक्षता घेण्यात येणार आहे. आचारसंहिता, कायदा - सुव्यवस्था, धार्मिक तेढ वा अन्य कारणांसाठी निवडणूक आयोगाची वेगवेगळी पथके सूक्ष्म निरीक्षण करणार आहेत. आचारसंहिता भंग झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
निवडणूक काळात पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी कोणाचीही रस्त्यावरील वाहनातून जाता येताना झडती घेऊ शकतात, अशावेळी त्या व्यक्तीस स्वतःजवळ जास्तीत जास्त 50 हजार रुपयेच बाळगता येतील. अधिकची रक्कम बाळगल्याचे आढळून आल्यास ती रक्कम जवळ ठेवल्याचे कारण द्यावे लागणार आहे. निवडणूक काळात पेड न्यूजवरही बारकाईने लक्ष देण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2019 ही अर्हता लक्षात घेऊन 26 मार्चपर्यंत नव मतदारांना मतदान यादीत नाव नोंदविता येईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment