Saturday, March 30, 2019

स्वच्छता अभियानाची ऐशी की तैशी


जत,(प्रतिनिधी)-
जत शहरात स्वच्छतागृहांची वानवा असून त्यामुळे बाजारहाट करण्यासाठी येणार्या लोकांची विशेषत: महिलांची कुचंबना होत आहे. बाजारात स्वच्छतागृहांची त्याचबरोबर शहरात जागोजागी स्वच्छतागृहांची आणि शौचालयांची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

राज्यभर स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविला जात आहे. खेड्यांतील, शहरांतील साठणारा कचरा उचलला जात आहे. उघडी गटारे बंदिस्त केली जात आहेत. यामुळे प्रदूषण व रोगराईला आळा बसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी उघड्या जागेत प्रातर्विधी, लघवी करण्यावर बंदी घातली आहे. नगरपालिका व ग्रामपंचायतींनी 500 रुपये दंडाची शिक्षाही जाहीर केली आहे. शहरात मंडई व आठवडे बाजारात नागरिकांना तरकारी खरेदीला जावे लागते. बाजारात नागरिकांची गर्दी वाढते. मात्र  जत नगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी मुतार्या व स्वच्छतागृहांची सुविधा केलेली नाही. शहरात यांची संख्या अत्यल्प आहे.
स्वच्छता अभियान कार्यक्रमाद्वारे मुतार्या व स्वच्छतागृहाची सुविधा केलेली नाही. मुतार्यांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसते. महाराणाप्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, स्टेट बँक परिसरात स्वच्छता गृहांची आवश्यकता आहे. मात्र नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पालिकेने स्वच्छता अभियान कार्यक्रमाद्वारे मुतार्या व स्वच्छतागृहे बांधण्याचा कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. आठवडे बाजार, दैनिक तरकारी बाजारासाठी येणार्या नागरिकांसाठी रस्त्यालगत दर तीनशे मीटर अंतरावर मुतार्यांची सोय या मूलभूत सुविधा करण्याचा स्वच्छता अभियानात समावेश केला जावा, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment