Sunday, January 13, 2019

दुष्काळामुळे संक्रांतीच्या उत्साहावर संक्रांत


जत,(प्रतिनिधी)-
शेतकरी कुटुंबातून मोठ्या प्रमाणात साजर्या होणार्या सणांपैकी एक असणार्या संक्रांत सणावर यंदा दुष्काळाचे दृष्टचक्र घोंघावत आहे. यावर्षी दुष्काळाच्या फेर्यात अडकलेल्या संक्रांतीच्या सणाचा पारंपरिक उत्साह गायब झालेला असून शेत, शिवारांमधून अपेक्षित असलेल्या पिकांच्या रसरशीतपणाऐवजी उदासवाणे दृश्य नजरेस पडत आहे.

हुरड्यात आलेली ज्वारी, डोलणार्या गव्हाच्या कोवळ्या ओंब्या, हिरव्यागार हरभर्याला लागलेले हिरवे घाटे अशाप्रकारे शेतात वातावरण असताना आलेला संक्रांतीचा सण आनंदात व उत्साहाने साजरा करण्यात शेतकरी कुटुंबे अग्रेसर राहात. मात्र अशी उत्साही संक्रांत आता आठवणीच्या कप्प्यात बंदिस्त झाली आहे. आताची संक्रांत दुष्काळ घेऊन येणारी ठरताना शिवारांमधला नैसर्गिक चैतन्यपणा गायब करणारी ठरत आहे. अशा स्थितीत ज्येष्ठांकडून जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
शेतकरी कुटुंबात संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असे तीन दिवस साजरे केले जाताना कुटुंबातील महिला सदस्यांसाठी कपडे, दागिने आदींची मोठ्या आनंदात खरेदी केली जाते. मात्र या परंपरेला दुष्काळाचा फटका बसू लागला आहे. दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबे आर्थिक अडचणीत असून नवीन खरेदीची मानसिकता दिसून येत नाही.
वास्तविक पाहाता संक्रांतीचा सण म्हणजे शेतकरी कुटुंबात आनंदाला उधाण आणणारा सण म्हणून ओळखला जातो. शेती हेच अर्थकारणाचे प्रमुख केंद्र असणार्या शेतकरी कुटुंबात संक्रांतीच्या वेळी वेगळीच धावपळ अपेक्षित असते. कारण या काळात शेतांमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, ऊस ही पिके हिरवाई धारण करुन आगामी काळात संबंधित शेतकर्याच्या घरी धनधान्याची रास उभारण्याचे संकेत देत असतात. दरम्यान येणारा काळ हा सुख-समृद्धीचा असणार या भावनेतून शेतकरी कुटुंबातील महिला शेतातील ज्वारी, गहू, हरभरा, ऊस सुगडात भरुन देवाला अर्पण करतात.
पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी शेत शिवारांची स्थिती उदास भासत आहे. मोकळी राने, करपलेली पिके असेच चित्र असून संक्रांतीच्या सुमारास अपेक्षित असलेली ज्वारी, गहू, हरभरा आदि पिकांची हिरवाई दिसेनासी झाली आहे. परिणामी शेतांमधून लगबग व चैतन्यमयी वातावरण हद्दपार होऊन भकासपणा वाढला आहे. उत्पादनाचा ताळमेळ हुकल्याने अर्थकारण बिघडलेले असेच वास्तव चित्र शेतकरी कुटुंबात आढळून येत आहे. परिणामी संक्रांतीच्या पारंपरिक उत्साहावर दुष्काळामुळे विरजण पडल्याचेच स्पष्टपणे जाणवत आहे.
याशिवाय इतर महिलांसह हळदी-कुंकू करताना एकमेकींना ओवसा म्हणून या वस्तू भेट देऊन सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा व्यक्त करतात. मात्र दुष्काळामुळे सर्व काही विपरीत घडल्याची वस्तुस्थिती असून शेतातील पिके मातीमोल होण्याच्या अवस्थेत, दारातील जनावरे तहान-भुकेने व्याकूळ होऊ लागलेली आणि सततच्या नापिकीसह उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे खर्च
वाढला आहे.

No comments:

Post a Comment