Wednesday, January 23, 2019

खिलार खोंडाने धन्याला मिळवून दिले 3 लाख

आटपाडी,(प्रतिनिधी)-
माण, सांगोला, आटपाडी हे तालुके माणदेश म्हणून ओळखले जाते या माणदेशात खिलार जनावरे शेळ्या मेंढपाळ हाच खरा कायमस्वरूपी पाण्याची सोय नसल्याने व्यावसाय होता या     खिलार जनावरांसाठी प्रसिध्द असलेल्या ‘माणदेशी आटपाडीतल्या’ 22 महिन्याच्या खोंडाने आपल्या धन्याला 3 लाख 41 हजार रुपये किंमत मिळवून देवून कृतकृत्य केले आहे.

     दुष्काळाचा शिक्का मारलेल्या माणदेशात खिलार जनावरांचे संगोपन मोठया प्रमाणावर होत असते. अतिशय चपळ, काटक, कष्टाळू आणि कणखर असलेल्या खिलार जनावरांची मोठी ख्याती आहे. घर प्रपंचाला दुय्यम स्थान देवून जनावरांवर जीवापाड प्रेम करणारे अनेक खिलार पशुपालक या परिसरात आढळतील. उत्तम जनावरांची संगोपन करण्याचा पीढीजात वारसा असलेल्या संताजी आनंदराव जाधव आटपाडी यांच्या ‘पिस्तुल’ नावाच्या खोंडाने 3 लाख 41 हजार रुपयाची किंमत मिळवून मालकास धन्य केलेच पण माणदेशी खिलार जनावरांच्या दर्जेदार किंमतीची परंपरा सत्यात उतरवली आहे.
     पांढरा आणि कोसा या जातीत मोजल्या जाणा-या खिलार खोंडाच्या कोसा जातीतल्या खोंडाचा, ‘उत्तम पशुवैदास आणि शर्यतीसाठी विशेषतः उपयोग केला जातो. अतिशय देखणा, रुबाबदार असलेल्या ‘पिस्तुल’ या कोसा खिलार खोंडाची खरेदी हडपसर येथील प्रसिध्द पशुपालक नितीन आबा शेवाळे यांनी करुन पिस्तुल्याचा एक प्रकारे गौरवच केला आहे.
     आटपाडीचे पशुपालक दिवंगत पै. आनंदराव (आप्पा) जाधव आणि दिवंगत शाहीर जयंत जाधव यांच्या हयातीत अनेक खोंडानी, बैलानी, कालवडी , गाईनी विक्रमी किंमती आणि अनेक बक्षिसे मिळविण्याचा पूर्वी पराक्रम केला आहे. त्यांचेच वारसदार संताजीराव जाधव, संग्राम जाधव, प्रताप जाधव, विराज जाधव इत्यादींनी ही दैदिप्यामान परंपरा जोपासली आहे.
     अतिशय खडतर स्थितीतल्या माणदेशी खिलारांचे योग्य संगोपन व्हावे यासाठी शासनाने खिलार पशुपालकांना प्रतिवर्षी काही प्रोत्साहन अनुदान दयावे अशी मागणी माणदेशातून होत आहे.

No comments:

Post a Comment