Monday, January 21, 2019

पाणी चळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा-प्रा.मानेपाटील

जत,(प्रतिनिधी)-
समस्त प्राणीमात्रांचा भविष्यकाळ उज्ज्वल करून भविष्यात पाण्यासाठी होणारे तिसरे महायुध्द टाळायचे असेल तर पाणी चळवळीत प्रत्येकाने सक्रीय सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा.सी.वाय.मानेपाटील यांनी केले.

    जत येथील राजे रामाराव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा शक्तीचे युद्ध, दुष्काळाविरुद्ध’ या उपक्रमात श्री. मानेपाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.तुकाराम पाटील सर उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा.डॉ.भीमाशंकर डहाळके यांनी पाणी चळवळीबद्दल माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
  पंचमहाभूतातील पाणी हा घटक अतिशय महत्वाचा असून या घटकाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच इतर प्राणी मात्रावंर होतो. प्राचीन काळापासून पाण्याचे स्त्रोत पाहूनच मानवी वस्ती झाल्याचे दिसून येते असे सांगून प्रा. मानेपाटील पुढे म्हणाले कि, आज प्रचंड लोकसंख्येमुळे नैसर्गीक पाण्याचे साठे कमी होत आहेत. पाण्याची भूगर्भ पातळी खोलवर जात आहे. बेसुमार पाणी उपशामुळे जमिनीची चाळणी झाली आहे. त्याप्रमाणात पाणी आडवले जात नाही. पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते ते पाणी अडऊन जमिनीत मुरविले पाहिजे. यासाठी पाणी चळवळ सक्रीय होणे गरजेचे आहे.आज पाण्याची प्रचंढ टंचाई जाणवत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पाणी चळवळीत काम करणे गरजेचे आहे.आज पाणी फौंडेशन जे पाण्याविषयी काम करीत आहे ते कौतुकास्पद आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या गावामध्ये पाणी चळवळीत सक्रीय सहभाग घेऊन पाणी चळवळीत काम करून समाजाचे प्रबोधन करावे असेही ते शेवटी म्हणाले. प्रारंभी पाणी फौंडेशनचे जत तालुका समन्वयक मा.नितेश मोरे यांनी पाणी चळवळीविषयी माहिती देऊन पाणी आडविण्याचे फायदे प्रात्यक्षिकासहीत करून दाखविले.
प्रारंभी प्रमुख मान्यवरांचे स्वागत प्रा.एस.डी.चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आहे. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा.डॉ.राजेंद्र लवटे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.कृष्णा रानगर, प्रा. कारेन्नावर, प्रा.तुकाराम संन्नके, प्रा.रवींद्र पोमने, अनिकेत खेडकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment