जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीमध्ये पाणी टंचाई निवारण कक्षाची स्थापना करण्याची मागणी होत आहे.शासनाने जत तालुका दुष्काळ जाहीर करूनही अद्याप पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले नाहीत,अन्य सवलतींचा पत्ता नाही. लोकांना आपल्या तक्रारी करण्यासाठी सोय व्हावी,यासाठी तातडीने टंचाई निवारण कक्षाची स्थापना करण्याची मागणी होत आहे.
जत तालुक्यात यंदा पावसाने मोठा दगा दिल्याने पिकांसह पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खरिप,रब्बी हंगामातील पिके शेतकर्यांच्या हाताला लागले नाहीत.पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई गावांना भासू लागली आहे. लोकांचा पाणी मिळवण्यासाठी सर्वाधिक वेळ जात आहे. गेल्या दोन महिन्यापासून गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जावा, अशी मागणी केली जात आहे. पण त्याकडे प्रशासनाने अद्यापही गंभीरपणे पाहिले नाही. सध्या 55 गावे आणि दीडशे वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यावर उपाययोजना करण्याची आव्श्यकता आहे. प्रशासन काही तरी कारणे सांगत पाण्याचे टँकर सुरू करण्याबाबत टाळाटाळ करत आहे.
गावातल्या पाण्यासह अन्य टंचाईबाबतच्या तक्रारी घेऊन गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ जत पंचायत समितीला येत आहेत,पण त्यांच्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही. त्यामुळे गावातील ट्ंचाई संदर्भातले प्रश्न तसेच निरुत्तर राहात आहेत. पंचायत समितीने टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी निवारण कक्ष स्थापन करावे, अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment