Monday, November 26, 2018

आसंगीत विकासनिधीत अपहार केल्याची तक्रार


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आसंगी येथील दलितवस्ती सुधार योजनेचा निधी बोगस खर्च दाखवून हडप केला असल्याची तक्रार माजी सरपंच बिरुदेव बाबर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, सन 2016-17 मध्ये दलित व मातंग समाजासाठी दहा लाख रुपये आले होते.यातून या वस्तींवरील  रस्ते,विजेचे खांब आणि गटारीची कामे करणे अपेक्षित होते,मात्र ग्रामपंचायतीने हा निधी दलित वस्तीच्या विकासकामांसाठी न वापरता रोजगार हमीच्या कामासाठी वापरले असल्याचे दाखवले आहे.
प्रत्यक्षात या निधीतून काहीच काम झाले नाही. पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि सरपंच यांनी या कामावर केवळ दीड लाख रुपये खर्च केला आहे. ही कामे योजनेतील आराखड्यानुसार करण्यात आली नाहीत. संबंधित ठेकेदार,ग्रामसेवक, सरपंच यांनी संगनमताने ही रक्कम हडप केली आहे.
वास्तविक ज्या कामांसाठी निधी आला आहे,त्या कामासाठी वापरण्याची गरज आहे. हा दलित लोकांवर अन्याय आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

No comments:

Post a Comment