Thursday, November 29, 2018

सोन्याळमध्ये पाण्यासाठी घागर मोर्चा


जत,(प्रतिनिधी)-
वार्ताहर सततची पाणीटंचाई, सत्ताधार्यांची नियोजनशून्य व ढिसाळ कारभाराला कंटाळलेल्या सोन्याळ (ता. जत) येथील संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून सत्ताधार्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. सुरळीत आणि पुरेसा पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सोन्याळ गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सोन्याळ गावासाठी दोन पाणीयोजना अस्तित्वात आहेत. पैकी गावातील जुन्या विहिरीला पाणी नसल्याने आता ही योजना बंद आहे.

दुसरी योजना उटगी, दोड्डानाला तलावातील विहिरीतून गावासाठी थेट पाईपलाईन आहे. उटगी तलावक्षेत्रात असलेल्या विहिरीत अजून काही दिवस पुरेलइतका पाणीसाठा उपलब्ध आहे. या योजनेद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जातो. परंतु विविध कारणे सांगून गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या सततच्या पाणीटंचाईला कंटाळलेल्या सोन्याळ ग्रामस्थांनी संतप्त होत गुरुवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला़ आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांना याचा जाब विचारत सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी केली. या गावची जवळपास 7 हजार लोकसंख्या आहे़. या वर्षातील दोन्ही हंगाम वाया गेल्याने गावाला गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अधून-मधून तलावात असलेल्या विहिरीतून नळाद्वारे पाणी सोडले जात असे; परंतु तेही पंधरवड्यापासून बंद आहे. नागरिकांनी पाण्याबाबत विचारले असता सत्ताधारी वेगवेगळी कारणे देत आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सकाळी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला आणि मोकळ्या घागरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवून देण्यात आल्या. सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

No comments:

Post a Comment