Wednesday, June 12, 2019

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेची आचारसंहिता?

जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर जिल्हय़ात लगेच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून निवडणुकीची तयारीला लागण्याच्या सूचना राज्य निवडणूक कार्यालयाने जिल्हा निवडणूक विभागाला  एका आदेशादवारे कळविल्या आहेत.

    दरम्यान यामुळे जिल्हय़ातील विकासकामांना अवघे तीन महिने उरले आहेत. त्यामध्ये पावसाळाही आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना विकासकामाबाबत बरीच धावपळ करावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या दोन महिन्यापासून बरीच विकासकामे खोळंबून राहिली होती. ती आता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जोमाने कामाला लागावे लागेल असे सांगण्यात येत आहे.
    लोकसभा निवडणुकीची धामधूम नुकतीच संपली. या निवडणुकीतून प्रशासनातील अधिकाऱयांनी सुस्कारा टाकला असतानाच विधानसभा निवडणुकीच्या हालचाली राज्य निवडणूक कार्यालयाने सुरू केल्या आहेत. जिल्हा निवडणूक विभागाला विधानसभेच्या तयारीबाबतचे लेखी आदेश देण्यात आले. निवडणूक विभागाचे संकेतस्थळ कायम चालू ठेवण्यासह मतदार नोंदणीचा कार्यक्रमा बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर पुन्हा निवडणुकीची तयारी सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले.
     मागील चार महिने लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरु होती. निवडणूक विभागाचे दिवस-रात्र काम सुरु होते. मतदान पूर्वीची तयारी, मतदान, तसेच मतमोजणी या सर्व प्रक्रियेत कालावधी गेला. लोकसभेची मतमोजणी संपल्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाला एक महिनाभर विश्रांती मिळाली. आचारसंहिता शिथील झाल्याने प्रशासकीय कामेही पूर्ववत सुरु झाली आहेत.
 जिल्हा निवडणूक विभागाला तयारीबाबतचे लेखी पत्र मिळाले. विधानसभा निवडणुकीसाठी संकेतस्थळ चालू ठेवण्यात यावे, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्यांनाही निवडणुकीच्या तयारीबाबत सतर्क राहण्यात यावे, असेही जिल्हा निवडणूक विभागाला कळविले आहे.
    दरम्यान, विधानसभेचा कार्यकाल ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. तीन नोव्हेंबर 2019 पूर्वी नवीन सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होवू शकते. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात मतदान होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक विभागाने विधानसभेच्या तयारीबाबतच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे मतदार यादीतील नावनोंदणी, दुरुस्तीसह नावे वगळण्याबाबतचा कार्यक्रम येत्या काही दिवसात सुरु करण्यात येईल.

No comments:

Post a Comment