Thursday, June 13, 2019

जत शहराला आठ किलोमीटरच्या रिंगरोड बायपासची गरज

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरात मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी फोडण्यासाठी शहराला सुमारे आठ किलोमीटर रिंगरोड बायपास रस्त्याची गरज असून लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्नकरावेत,अशी मागणी होत आहे.

शहरातले राष्ट्रीय महामार्ग करताना बायपास रस्त्यांना मंजुरी मिळत आहे. आपल्या शेजारील सांगोला, मंगळवेढा या तालुक्याच्या शहरात बायपास मंजूरी मिळाली आहे. शिवाय तासगाव येथे रिंगरोड बायपासला मंजूरी मिळाली आहे.त्या अनुषंगाने जत शहरात सुद्धा गुहाघर-जत-विजापूर (166ई), जत- सांगोला-इंदापूर (965जी) आणि  कराड- तासगाव- क.महकाळ-जत (266 ) हे राष्ट्रीय महामार्ग जत शहरातून जाणार असल्यामुळे शहरात वाहनांची वर्दळ वाढणार आहे ,त्यामुळे जत शहरात वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात होणार आहे. आताच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. आता त्यात आणखी भर पडणार आहे.
तसेच चारही रस्ते राष्ट्रीय महामार्ग असल्याने त्यांची वेगमर्यादा सुद्धा जास्त असल्यामुळे शहरात गंभीर प्रकारचे  अपघात होण्याची शक्यता दाट आहे .अश्या कारणामुळे जत शहरात रिंग रोड बाय पास  करण्याची  गरज आहे . हा मार्ग प्रस्तावित कराड-विजयपूर महामार्गापासुन सुरू होवून नागज-विजयपूर , जत-सांगोला , जत-मंगळवेढा राज्य मार्ग, जत-येळवी, जत-उमदी, विजयपूर-नागज महामार्ग,जत-अथणी मार्गाला जोडून परत कराड-विजयपूर महामार्गाला जोडावा असा आठ किलोमिटरचा रिंगरोड बायपास काढावा अशी मागणी नागरिकाकडून होत आहे .
दरम्यान,जत शहराला रिंगरोड बायपासचा फायदा होणार आहे. रिंगरोड बायपास मुळे अनेक जत शहराचा विस्तार होवून उद्योगधंदे ही वाढतील.अवजड वाहतूक ह्या बायपास मार्गाने वळवली जाईल . जतकरांची वाहतूक कोडीपासुन पुढील अंदाजे  20 ते 25 वर्षे सुटका होईल.

No comments:

Post a Comment