Saturday, June 22, 2019

आरोग्यवर्धिनी योजनेतून सुधारणार जतचे ‘आरोग्य’


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्ह्याचा समावेश सरकारच्या आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यकमात समावेश करण्यात आला असून याचा सर्वाधिक फायदा जत तालुक्याला होणार असून जतमधील जनतेच्या दारापर्यंत आरोग्य सेवा व शासनाच्या आरोग्य योजना पोहोचवण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी व्यक्त केला. सतत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे समाधान असल्याच्या भावनाही व्यक्त केल्या.

 रवी-पाटिल यांनी या योजनेत जिल्ह्याचा समावेश केल्याबद्दल अभियान संचालक अनुपकुमार यादव, ‘आरोग्यचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालक वित्त रवींद्र शेळके, सहसंचालक प्रशासन प्रशासन दीप्ती पाटील यांच्या विशेष आभार मानले. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्यासह आम्ही विशेष प्रयत्न केल्याचे सांगितले. खास बाब म्हणून सांगलीचा समावेश केला आहे. एकूण 22 जिल्ह्यांत ही योजना राबवली जाणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्राद्वारे रुग्णांना 13 प्रकारच्या सेवा देण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रावर एक कंत्राटी आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 320 आरोग्य उपकेंद्रावर 320 बी..एम.एस.- बी. यू. एम. एस. डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. सर्व गावांमध्ये आरोग्य सेवा थेट पुरवणे शक्य होणार आहे.
यामुळे वाडी-वस्तीवरील लोकांना आरोग्यसेवा मिळणार आहे. जत तालुक्यात आठ आरोग्य केंद्रे असून वैद्यकीय अधिकार्यांची सोळा पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात पाचच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. उपकेंद्रे 45 आहेत. मुळात जत तालुका मोठा आहे. दोन गावांमधील अंतरही खूप आहे. अशावेळी आरोग्य केंद्रात वेळेत पोहोचणे अडचणीचे होते. मात्र आता आयोग्यवर्धिनी योजनेमुळे उपकेंद्रातही डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. जत तालुक्यातील खेडोपाड्यातील- वाडीवस्तीवरील आरोग्यसेवा या निमित्ताने मिळणार आहे.

No comments:

Post a Comment