Friday, June 28, 2019

शनिवार, रविवारी बायको जाणार कामावर; नवरा सांभाळणार घर

येणाऱ्या काळात काय घडेल सांगता येत नाही. उद्या कदाचित बायको ऑफिस सांभाळेल आणि नवरा घर. त्याची सुरुवात आताच दिसत आहे ते एका घटनेवरून.  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक वेगळेच प्रकरण जिल्हा विधी प्राधिकरणासमोर आले आहे. घरातील कामाच्या वाटणीवरून होणार्‍या भांडणावर तोडगा काढण्यासाठी पती-पत्नींनी परस्परांमध्ये करार केला. त्या कराराला कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी ते प्राधिकरणाकडे आले होते. १00 रुपयांच्या स्टँप पेपरवर त्यांनी हा करार केला आहे. त्यात शनिवार, रविवारी पती घरातील सर्व काम करेल आणि मुलांना सांभाळेल. पत्नी या दोन दिवसांत कामावर जाईल आणि बाहेरची इतर कामे करेल, असे करारात नमूद करण्यात आले आहे.
दोघांपैकी कोणी आजारी पडले, तर कुटुंबीयांसाठी बाहेरून जेवण मागवण्यात येईल, असेही करारात म्हटले आहे. प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आशुतोष मिर्शा यांनी या दाम्पत्यांनी दाखवलेल्या सामंजस्याबाबत सन्मान व्यक्त करत प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या काराराला न्यायालयातच कायदेशीर मान्यता मिळेल, असे ते म्हणाले.
जिल्हा विधी प्राधिकरणाकडे अनेक महिला पती आणि सासरच्या व्यक्तींबाबतच्या तक्रारी दाखल करत होत्या. मात्र, या प्रकरणात दाम्पत्यांनीच समस्येवर सामंजस्याने तोडगा काढला आहे. त्यांनी केलेल्या कराराला कायदेशीर मान्यता मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. पती- पत्नी दोघे खासगी कंपनीत एक्झीकेटिव्ह पदावर कार्यरत आहेत. त्यांचे लग्न दहा वर्षापूर्वी झाले आहे. मात्र, घरातील कामांच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद होत होते, असे वाद टाळण्यासाठी त्यांनी सामंजस्याने आणि परस्पर सहमतीने काही नियम ठरवून करार केला. कराराचे उल्लंघन केल्यास त्यांनी स्वत:साठी शिक्षेची तरतूदही केली आहे. आठवड्यातील पाच दिवस पत्नी जेवण बनवेल, घर सांभाळत मुलांचा गृहपाठ आणि अभ्यासाकडे लक्ष देईल. मात्र, शनिवार, रविवारी हेच काम नवरा करेल, तसेच वादविवाद टाळण्यासाठी एकमेकांच्या आई-वडिलांवर टीकाटिप्पणी करण्यात येणार नाही. कार्यालयातून घरी परतण्यास उशीर होणार असेल तर दोन तास आधी दुसर्‍याला कळवावे लागेल, अशी सूचना दिल्यामुळे दोघांपैकी एकजण लवकर घरी जाऊन मुलांकडे लक्ष देऊ शकेल. दोघेही आपल्या आई-वडिलांना इच्छेप्रमाणे आर्थिक मदत करू शकतात. तसेच मुलांच्या खर्चासाठी आणि भविष्यासाठी दोघांनीही बँक खात्यात ठरावीक रक्कम जमा करावी. तसेच शाळेत होणार्‍या पालकांच्या बैठकीला दर महिन्याला दोघांपैकी एकाने उपस्थित राहावे. दोघांपैकी एकाला कामानिमित्त बाहेरगावी जायचे असल्यास त्याची सूचना पाच दिवस आधी द्यावी, दोघांनीही घरखर्च समसमान वाटून घ्यावा, खरेदी केलेले घर दोघांच्याही नावावर असेल किंवा मुलांच्या नावे खरेदी करण्यात येईल. तसेच दोघांपैकी कोणीही आजारी पडले तर कटुंबीयांसाठी बाहेरून जेवण मागवण्यात येईल. दोघांपैकी कोणीही कराराचे उल्लंघन केल्यास त्यांनी त्यासाठी शिक्षाही ठरवून घेतली आहे. आशुतोष मिर्शा यांनी या सामंजस्याने केलेल्या कराराचे स्वागत केले आहे. तसेच जिल्हा न्यायालयात याला कायदेशीर मान्यता मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment