Thursday, May 16, 2019

पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा


जूनमध्ये विस्तार; सांगलीला संधी मिळणार का?
जत,(प्रतिनिधी)-
होणार... होणार... मंत्रिमंडळाचा विस्तार होणार... असे म्हणत साडेचार वर्षे कशी गेली कुणालाच कळले नाही. मात्र मंत्रीपदाची आस लागून राहिलेल्या लोकप्रतिनिधींची निराशा झाली. आता त्यांनी आशा सोडली असतानाच पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होऊ लागली असून जूनमध्ये या विस्ताराला मुहूर्त लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता या विस्तारात तरी सांगली जिल्ह्याला स्थान मिळणार का, असा सवाल अपसूकच आल्याशिवाय राहत नाही.

लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. निकालाआधीच राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागल्याची माहिती आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यानुसार राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी काही नवीन चेहर्यांना संधी मिळणार असल्याचा अनुमान वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर पक्षात आलेल्या काहीआयारामनेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत, असेही बोलले जात आहे. अर्थात ही मंडळी तीन महिन्यात पदावर गेल्यावर काय विकासकामे करणार, असा प्रश्न असला तरी माजी मंत्री ही बिरुदावली लावून घ्यायला अनेक इच्छूक आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील दोन नंबरच्या मंत्रिपदाची म्हणजेच महसूल खात्याची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून महसूल खाते काढून विखेंना मिळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जाते. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त असलेले आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेले कृषी खाते विखेंना मिळण्याची दाट शक्यता आहे.
 दुसरीकडे, मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर आणि मराठवाड्यात संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि पक्ष विस्तारीकरणासाठी मंत्रिपद देणार असल्याची चर्चा आहे. त्याआधी 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक आढावा बैठकीत लोकसभा निवडणुकीत डावललेल्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न होणार असल्याचे बोलले जात आहे. आणि या प्रमुख मंत्रिपदाच्या वाटपानंतर सतत मागणी होत असलेल्या सांगलीसह आणखी काही जिल्ह्याच्या वाट्याला एकादे मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रात पुन्हा मोदी सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी राज्यात मात्र भाजप आणि शिवसेना यांचे युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार की नाही, याबाबत मोठी सांशकता आहे. त्यामुळे मंत्रिपदाचे गाजर दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्याठिकाणी भाजप कमकुवत आहे, त्याठिकाणी मंत्रीपद दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment