Friday, May 17, 2019

23 मेच्या निकालाची आता एकच उत्सुकता


जत,(प्रतिनिधी)-
 लोकसभा निवडणुकीत मोजणीची तारीख अवघ्या आठवड्यावर आली असताना सांगली लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत सार्वजनिक ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे. गावाच्या पारावर, पानटपरीवर, हॉटेल व बीअरबार, सार्वजनिक ठिकाणी; तसेच बस थांब्यावर लोकसभेच्या निकालाबाबत चर्चा ऐकावयास मिळत आहे. आता लोकांना निकलाची उत्सुकता लागून राहिली आहे.

 राज्यात लोकसभा निवडणुका चार टप्प्यात पार पडल्या. राज्यातील 48 जागेसाठी 29 मे रोजी मतदान संपले असले तरी देशातील सातव्या टप्प्यातील निवडणुकीचे मतदान हे 19 मे रोजी असल्याने अंतिम टप्प्यातील मतदानानंतरच 23मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी नंतरचा निकाल अवघ्या आठवड्यावर आला आहे. जत तालुक्यात सांगली लोकसभा व इतर मतदारसंघातील निवडणूक निकालाबाबतची चर्चा शहरात व ग्रामीण भागात सुरू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी व चौकाचौकात जथ्थ्या-जथ्थ्याने कार्यकर्ते तथा मित्रमंडळी हे कोण जिंकणार व कोण दुसर्या क्रमांकावर राहणार, हे दाव्याने सांगताना दिसत आहेत.
तर याबाबत आकडेमोडी नुसार जातीय समीकरणानुसार सांगण्यात येत आहे; तर निवडणुकीवर शर्यती लावल्या जात आहेत. नागरिकांत सुरू असणारी चर्चा तर राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांच्या दाव्याप्रतिडाव्यामुळे मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीचा निकाल जसजसा जवळजवळ येत आहे, तसतसे उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत. पहिल्या पहिल्यांदा भाजपाला सोपी वाटणारी निवडणूक गोपीचंद पडळकर यांच्यामुळे सोपी राहिली नाही. त्याचबरोबर विशाल पाटील यांच्या उमेदवारीने रंगत वाढली. तिरंगी लढतीमुळे कोण निवडून येणार हे सांगणे कठीण झाले आहे. त्यातच सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बरोबर अन्य महत्त्वाच्या जागेच्या निकालाबाबत ही अंदाज बांधले जात असून तशी चर्चाही शहरात व ग्रामीण भागात जागोजागी होत असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment