Sunday, May 12, 2019

जत पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात सावळा गोंधळ


संबंधितांवर कारवाईची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी आहे. गेली वर्षभर जत तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. खरिपाचे दोन्ही हंगाम पूर्णपणे वाया गेल्या आहेत. त्यात 85 गावे व 585 वाड्या-वस्त्यांना 103 टँकरद्वारे पाणी सुरू आहे. या टँकरची संपूर्ण जबाबदारी पंचायत समितीमधील कार्यालय असलेले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आहे. मात्र या कार्यालयातील कर्मचारी वारंवार बेपत्ता असतात. याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी व जिल्हा परिषदेमध्ये तक्रारी केल्या आहेत. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक या कर्मचार्यांना नाही. या विभागात अधिकार्यांपासून शिपायापर्यंत कोणीच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात आहेत. शिपायांसह सर्वच कर्मचारी बेपत्ता होते. याची वरिष्ठांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी तालुक्यातील अनेक पदाधिकार्यांनी केली आहे.

 जत पंचायत समितीमधील कारभार हा संपूर्ण सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या पंचायत समितीमध्ये अनेक कर्मचारी हे जिल्ह्यातून शिक्षा म्हणून आलेले आहेत. अनेक कर्मचार्यांना शिक्षा म्हणून जत पंचायत समितीमध्ये दिले जाते. कोणत्याही कार्यालयात अचानक भेट दिली असता निम्म्याहून अधिक कर्मचारी बेपत्ता असतात. त्यामुळे दूर गावांहून आलेले सरपंचांना मात्र कर्मचारी नसल्याने पुन्हा आपल्या गावी जावे लागते. याबाबत अनेक नागरिकांनी अनेक कर्मचार्यांनी हजार वेळा तक्रारी केल्या, तरी ती दखल या ठिकाणी घेतली जात नाही. जत पंचायत समितीला गेल्या तीन वर्षांपासून गटविकास अधिकारी पूर्णवेळ नव्हते. त्यामुळे येथील अनेक कर्मचारी बेलगाम झाले होते. मात्र गेल्या जत पंचायत समितीला अर्चना वाघमळे या महिला गटविकास अधिकार्याची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक कर्मचार्यांना त्यांचा खाक्या दाखवत सरळ करण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत समितीच्या व्यवस्थापन सरळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांनाही अनेक कर्मचार्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत समितीमध्ये गलेलठ्ठ पगार घेऊन सातव्या वेतन आयोगाची चर्चा करणार्या कर्मचारी मात्र कामे किती करतात, आपण जनतेचे सेवक आहोत, याचा विसर मात्र त्यांना पडला आहे. कर्मचार्यांना गांभीर्य नाही जत तालुक्यात गेल्या वर्षभरापासून प्रचंड दुष्काळ पडला आहे. तालुक्यात मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. गुरुवारी पुणे विभागीय आयुक्तांचा तालुक्यातील अनेक गावांत दुष्काळी दौरा झाला. त्यांनी दुष्काळाबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले असतानाही आज जत पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कमचारी नव्हता बेपत्ता असल्याचे दिसले. त्यामुळे दुष्काळाचे किती गांभीर्य आहे, हे यावरून दिसून येत असून आता वरिष्ठ अधिकार्यांनी या कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment