Thursday, May 16, 2019

खतांच्या दरवाढीमुळे बळीराजा पुन्हा संकटात


जत,(प्रतिनिधी)-
 निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असला तरी दरवर्षी तो मोठ्या आशेने खरीप हंगामाच्या तयारीला लागत असतो. यावर्षी तरी चांगला पाऊस पडून उत्पादनात वाढ होईल, या आशेने शेतकरी यंदादेखील खरीप हंगामाच्या तयारीसाठी जमिनी कसण्यासाठी तयार झाला आहे.

 भर उन्हाात शेतकरी शेतजमिनीची खरीप हंगामासाठी तयारी करीत आहेत. परंतु यंदा खते व बी- बियाणांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गेल्या दोन-तीन वर्षात संकटाचा सामना करून आर्थिक अडचणीत सापडला आहे. आधीच पिकांना भाव नाही आणि आता शासनाने रासायनिक खतांच्या किमतीत दोनशे ते अडीशे रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे शेतकर्यांपुढे नवीन संकट उभे झाले आहे. पेरणीच्या काळात खतांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेतकरी पावसाळ्यापूर्वीच रासायनिक खतांची खरेदी करतात. मात्र या वेळी शेतकर्यांना खत देताना जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नियोजन बिघडणार आहे. केंद्र सरकारने अनुदानात कपात केल्यामुळे खतांच्या किमतीत वाढ झाली असल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे.
मागील वर्षी डीएपी खताच्या दर 1,258 रुपये होता 1,475 रुपये झाला आहे. इतरही खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र त्याचे भाव स्थिर आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे मागील चार-पाच वर्षांपासून तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे उत्पादनात सातत्याने घसरण होत असून शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच खतांच्या वाढत्या किमतीमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई गगनाला हात टेकवीत असताना शेती पक्की, वस्तूंची दरवाढ दरवर्षी पाहावयास मिळते. शेतमाल व्यापार्यांच्या घशात गेल्यावरच शेतमालाच्या भावात वाढ होते. व्यापारीराज शासनाने बंद करावे व शेतीमालास भाव दिला तर शेतकर्यांना शासनाच्या योजनांची आवश्यकता भासणार नाही.

No comments:

Post a Comment