Friday, May 24, 2019

जत शहराला बेशिस्त वाहनचालकांचे ग्रहण

जत,(प्रतिनिधी)-
जत शहराचा विस्तार  झपाट्याने होतो आहे. परंतु अनेक समस्यांनी शहराला ग्रासले आहे. पोलिस प्रशासनची बघ्याची भूमिका संशयास्पद आहे.  शहरातील वाहतुकीचा  प्रश्‍न मार्गी लावून रहदारी सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. जत ग्रामपंचायतीचे नगर पालिकेत रुपांतर झाले असले तरी वाहतुकीचा प्रश्‍न जैसे थे आहे.  पोलिसांच्या उदासिनतेमुळे शहराला बेशिस्त वाहनचालकांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे.

     जत शहरात कसल्याच प्रकारची पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे सध्या शहराला अवैध पार्किंगचा विळखा पडलेला दिसतो आहे. शहर आणि उपनगराची लोकसंख्या  सुमारे पन्नास हजाराच्या आसपास पोहचली आहे. अपवाद वगळता घरोघरी दोन-तीन दुचाकी वाहने आहेत. यामुळे दुचाकी वाहनांची संख्या  लाखांच्या घरात पोहचली आहे.  त्याचबरोबर चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभर जत शहरातील  वाहतूक व्यवस्था विस्कळीत असते. संध्याकाळी गल्लोगल्ल्यातून वाहने कशीही लावलेली असतात.त्यामुळे मुख्य रस्त्याबरोबर गल्ली बोळातूनही वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
      जत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी,यासाठी वाहतूक पोलिसांची व्यवस्था असली तरी  ते कुठे आहेत,याचा शोध नागरिकांना घ्यावा लागतो आहे . वाहतूक कोंडी गावात निर्माण होत असली तरी ते भलतीकडेच कुठे तरी आपली वाहतूक व्यवस्था पार पाडत असतात. शहरातून जाणारा औद्योगिक वसाहत ते  अमृतवाडी  फाटा या विजापूर - गुहागर राज्यमार्गावर सतत गर्दी असते. वाहनचालकांच्या मुजोरपणामुळे या मार्गावरून जाताना लोकांना मोठी कसरत करावी लागत आहे.  मंगळवार पेठ, लोखंडी पूल,सोलनकर चौक, उमराणी रोड, निगडी कॉर्नर , जयहिंद चौक , महाराणा प्रताप चौक, या परिसरात वाहतुकीचा सतत खेळखंडोबा झालेला असतो. मंगळवार पेठेत  कापड ,किराणा, खते इत्यादी  दुकाने व  राष्ट्रीय  बँका आहेत. त्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या नागरीकांची येथे सतत गर्दी असते. स्टेट बँक ऑफ इंडिया परिसरात भाजीपाला बाजार थाटला आहे. हातगाडीवाले व कांहीं विक्रेते रस्त्याच्या मध्यभागी थांबून व्यवसाय करत आहेत. पोलिसाकडे यासंदर्भात तक्रार करुनही हेतुपूर्वक डोळेझाक केली जात आहे. नागरीकांना या भागातून प्रवास करणं कमालीचं जिकरीचं झालं आहे. गर्दीचा गैरफायदा चोरटे घेत असून रोख रक्कम , मोबाईल हातोहात लांबवले जात आहेत.
      मंगळवार पेठ परिसरात वाहने पार्क करण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे  जेथे जागा उपलब्ध असेल तेथे  पार्किंग केली जात आहे. अस्ताव्यस्त स्वरूपात पार्किंग होत असल्यामुळे वाहतुकीचा सतत खोळंबा होत आहे. काही महाभाग रस्त्यावरच दुचाकी व रस्त्याच्या कडेला चारचाकी लावून बाजार करायला किंवा चहा प्यायला निघून जात आहेत याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतूक  पोलिस या भागात फिरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत नाहीत आथवा सुज्ञ नागरीकानी यासंदर्भात तक्रार केली तर त्याची दखलही घेत नाहीत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत एक-दोन वेळा बैठका झाल्या आहेत.  उपाययोजना करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी  बैठकीत दिले होते परंतु अश्वासनपूर्ती अद्याप झाली नाही. शहरातील मुख्य बाजारपेठ सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस चौकी उभारण्याची मागणी नागरीकातून होत आहे .त्याबाबत कार्यवाही करू असे आश्‍वासन मिळते परंतु कांही कालावधी गेल्यानंतर पुन्हा सर्वकाही थंड होत आहे. त्यामुळे नागरिकांना नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.
     जत  शहरात वाहनतळाची आवश्यकता आहे. परंतु याबाबत नगरपालिका प्रशासन आणि पदाधिकारी  फारसे मनावर घ्यायला तयार नाहीत.त्यामुळे सतत वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहेे. कांही वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे त्यात आणखीन भर पडत चालली आहे. त्यामुळे जत शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणार का ? असा प्रश्‍न नागरीकातून उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment