Sunday, May 26, 2019

दुष्काळाने विद्यार्थ्यांचे बालपण होरपळे


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील दुष्काळाने लोकांचं जगणेही मुश्किल झाले आहे. शेतात पिक नाही, काम धंदा नाही, जवळपास रोजगार नाही. अशा भीषण परिस्थितीत लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. यात शालेय मुलांनाही दिवसभर पाण्याच्या मागे लागावे लागत आहे. खांद्यावर, सायकलीवर पाण्याच्या घागरी घेऊन पाण्यासाठी वणवण चालली आहे. खेळण्याच्या-बागडण्याच्या या वयात त्यांना जनावरे आणि घरच्यांसाठी पाणी आणण्याच्या मागे लागावे लागले आहे.

या शालेय मुलांना दिवसभर पाणी आणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जनावरांच्या पाठीमागे फिरण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी शाळा सोडून लहान पोरांनाही जनावरांच्या मागे फिरावं लागतं आहे. रखरखत्या ऊन्हात चटके खात दिवसभर ही पोरं जनावरांच्या पाठीमागे असल्याचे चित्र दिसते. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे वर्षानुवर्षे दुष्काळाशी दोन हात करत तेथील जनता जगत आहे. या दुष्काळाचा फटका या तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे .
दुष्काळाने दुष्काळी भागातील लोकांचे जीवनच बदलून गेले आहे. हाताला काम नाही, जवळपास उद्योग व्यवसाय नाही, रोजगार हमीच्या कामावर भागत नाही, शेतात पिक नाही, प्यायला पाणी नाही, खायला धान्य नाही, जनावरांना चारा नाही अशा गंभीर परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्न या तालुक्यातील जनतेला पडला आहे. जत तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीसाठी काढलेले कर्ज थकले असून वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू आहे. या परिस्थितीत दुष्काळाशी तोंड देत येथील शेतकरी आपला गाव गाडा हाकत शेती करत आहे.
मायबाप सरकार या शेतकर्यांसाठी काही करायला तयार नाही, वेळेवर पाण्याचे टँकर येत नाहीत. चार्यासाठी छावण्या सुरू केल्या नाहीत. मात्र या प्रसंगी हाताच्या फोडाप्रमाणे जनावरांना जगविण्याची धडपड दुष्काळग्रस्तांची सुरू आहे. माळावर कुसळाशिवाय काही नाही, मात्र त्यांच्या शिवाय पर्याय नाही, चारा नसल्याने पोराबाळांसह लोक मारताना आणि जनावर फिरताना दिसतात. शाळेपेक्षा जगणं महत्त्वाचं झाला आहे. त्यामुळे लहान पोरं शाळा सोडून जाणावरा मागे जाताना दिसतात, तालुक्यातील गावोगावची मुलं अठराविश्व दारिद्र्यात जगतात. कपडे पायात चपलाचा पत्ता नाही, अनवाणी पायाने उन्हाचा चटका सहन करत ही जनावराच्या पाठीमागे फिरतात. खेळण्याच्या बागङण्याच्या दिवसात, शाळा शिकण्याच्यावयात ही वेळ आली आहे. पण करायचं काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील गावातील अनेक विद्यार्थ्यांशी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीतरी आपल्याला पळवूनघेऊन जायला आले असावेत असे समजून अनेक मुलं जवळआली नाहीत. असे चित्र दुष्काळी तालुक्यातील आहे.
 पाच-सहा वर्षापासून पंधरा वीस वर्षाची मुले शाळा सोडून जणावरांच्या पाठीमागे लागले आहेत. जगण्यासाठी दुष्काळी जनतेची धडपड सुरू आहे. शासनाने तारल नाही म्हणून आणि निसर्गाने दिले नाही म्हणून मरायचं नाही. यामुळे लोक दुष्काळाशी दोन हात करून, सामना करताना दिसत आहेत. दुष्काळी भागातील शाळा सर्व सोयीसुविधा आहेत, पण चकाचक शाळांमध्ये पोरांचा मात्र दुष्काळ पडत आहे. आणि शाळांमध्ये सध्या पटसंख्या कमी झाली असून गुरुजींना मात्र चांगली चिंता लागली आहे. ही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे गावेच्या गावे ओस पडणार असून अनेक शाळेतील मुले आता हळूहळू बाहेरगावी जाताना दिसत आहेत. याचा फटका मात्र जत तालुक्याच्या विकासावरही होणार आहे. शासनाने वेळीच दखल घेऊन या तालुक्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी योजना आणून या तालुक्यातील गावागावात म्हैसाळ योजनेचे पाणी फिरवावे अशी मागणी या तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी बोलताना केली.

No comments:

Post a Comment