Wednesday, May 29, 2019

शेळ्या-मेंढ्यांना चारा,आसरा मिळणार

शासनाच्या निर्णयाने दिलासा
जत,(प्रतिनिधी)-
शिवारात चारा नाही, पाणी नाही, बागायती भागात  बसण्यास शेते नाहीत. यामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे 5 ते   6 लाख शेळ्या-मेंढ्या व इतर जनावरांचे हाल-हाल सुरू आहेत. आक्रोश करून थकलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला आहे.पण प्रत्यक्षात शेळ्या, मेंढ्या साठी छावण्या सुरू झाल्यावरच त्याचा लाभ मिळणार आहे. दूरवर गेलेल्या  मेंढपाळांना आता जिथे कुठे आहेत,तिथेच आसरा मिळाला तर बरे होईल,अशी अपेक्षा केली जात आहे. 

शेळ्यामेंढयांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यामुळे सांगली  जिल्ह्यातील मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी, तासगाव  या दुष्काळी    भागात  असलेल्या शेळ्यांमेंढ्याना आसरा आणि चारा उपलब्ध होणार आहे.मोठ्या    प्रमाणावर  आहे.  या भागात धनगर समाज मोठा आहे,शिवाय प्रत्येक शेतकऱ्यांकडे चार-दोन शेळ्या आहेत. जिल्ह्यात   लाखोंच्या घरात शेळ्या-मेंढ्यांचे  पशुधन आहे. याबरोबरच  चारा-पाणी व मोकळी शेते असल्याने  या परिसरात मेंढपाळांना चार्‍याची अजिबात कमतरता पडत नाही.  त्यामुळे  कोकण, सोलापूर, सातारा भागातून  शेतात  बसण्यासाठी  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्याचे कळप येतात.
मात्र यंदा दुष्काळामुळे  पहिल्यांदाच फारच बिकट अवस्था झाली आहे. रब्बी आणि खरीप हंगामात शेतकर्‍यांच्या हाताला काहीच  लागले नाही. त्यांच्याच जनावरांच्या  चार्‍याचाही प्रश्न निर्माण   झाला आहे. त्यांची जनावरे छावणीत  दाखल केली आहेत. त्यामुळे मेंढ्या शेतात बसविणे जवळपास बंदच झाले आहे.
तसेच मोकळ्या रानात चारा उपलब्ध  नाही. डोंगरमाथे, पठारांवरील खुरटे गवत सुकून गेले आहे. पाणी नसल्याने झाडे-झुडपे वाळून गेली आहेत. खुरट्या झुडपांवर फक्त वाळलेल्या काटक्याच शिल्लक  आहेत. पाण्याचे मोठे स्त्रोत आटले आहेत. गाव तलावातही पाण्याचा ठिपूस नाही. तलावात पाणी सोडण्यास प्रशासन तयार नाही.  माणसांना  पिण्यास पाणी देण्यासाठी प्रशासनाने विहिरी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे दिवसभर मेंढरे कुठे फिरवायची, त्यांना पाणी कोठून द्यायचे, असा प्रश्न मेंढपाळांना पडला आहे. विकत घेऊन परवडणारे नसल्याने शेळ्या-मेढ्यांच्या चारा, पाण्याचा   प्रश्न   बिकट  होत चालला  आहे.  त्यातच वाढत्या  उन्हामुळे  उष्माघातासह अनेक आजारांनी शेळ्या-मेंढ्यांना ग्रासले आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेक शेळ्या-मेंढ्या मृत्यूमुखी  पडत आहेत. परिणामी मेंढ्या व मेंढपाळांना जगणे असह्य होऊ लागले  आहे.
शेळ्या-मेंढ्या मरण्यापेक्षा  त्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. परंतु शेळ्या-मेंढ्या विकून आणखी किती दिवस जगायचे, असा मोठा प्रश्न मेंढपाळांना पडला आहे. सर्वच शेळ्या-मेंढ्या विकाव्या लागू नयेत म्हणून काहींनी बागायती भाग व कोकणात स्थलांतर सुरू केले आहे. असे तांडेच्या-तांडे सध्या जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात गेले आहेत. अनेक सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, मेंढपाळ यांनी शेळ्या-मेंढ्यांसाठी स्वतंत्र चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी केली होती.आता शासनाने शेळ्यामेंढयांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment