Sunday, April 7, 2019

संजय पाटील यांना निवडणूक सोपी राहिली नाही


जत,(प्रतिनिधी)-
सुरुवातील विद्यमान खासदार संजय पाटील यांना सोपी वाटणारी लोकसभा निवडणूक रंगतदार आणि आव्हानात्मक बनत गेली आहे. त्यामुळे संजय पाटील यांची प्रचारादरम्यान मोठी दमछाक होणार आहे. भाजपातून बाहेर पडलेल्या गोपीचंद पडळकर यांनी यात उडी घेऊन आणखी रंगत आणली आहे. त्यामुळे आता कुणालाच विजयाचा दावा करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. प्रचार यंत्रणा आणि विद्यमान खासदारकी यामुळे श्री. पाटील यांनी इतरांच्या तुलनेत अगोदरच लोकांपर्यत पोहचण्यात यश मिळवले आहे.

 माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आपली उमेदवारी माघारी घेऊन गोपीचंद पडळकर यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर यांचे नाव जाहीर झाल्याने तिरंगी लढत निश्चित झाली. सांगली जिल्ह्यात एकेकाळी बालेकिल्ला असा नावलौकिक मिळवलेल्या काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली. मात्र माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या वारशालाच म्हणजेच त्यांचा नातू विशाल पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने उमेदवारी देऊन काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. यात राष्ट्रवादी किती मनापासून विशाल पाटील यांना सहाय्य केल्यास बराच फरक पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम कसा असणार आहे, यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत. भाजप, वंचित आघाडी आणि स्वाभिमानी पक्ष यांच्यातच प्रामुख्याने लढती होणार आहेत. यासाठी तिन्ही उमेदवारांच्या नेत्यांनी जय्यत तयारी केली असून निवडणुकीत आता अधिकच रंग भरला आहे. सांगली जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला रामानंद भारती, वसंतदादा पाटील आदींनी सांगलीत काँग्रेसचा विचार इतका रुजवला आहे की काँग्रेसचा पराभव काँग्रेस शिवाय कुणी करू शकत नाही असे एकेकाळी म्हटले जात होते. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील असे परंपरागत दोन गट आहेत. कधी त्यांनी शेतकरी गट, सहकार गट अशी वेगळी नावे धारण केली पण मनाने हे दोन गट आणि त्यातील र ाजकीय संघर्ष अडून राहिला नाही, तो सांगली जिल्हा पुरता मर्यादित राहिला नाही या दोन्ही गटांना आव्हान द्यायचे काम डॉ. पतंगराव कदम व अण्णा डांगे यांनी केले होते आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांचा अर्ज दाखल झाल्याने राजकारणाचा नुरच पालटला आहे. माजी आमदार प्रकाश शेंङगे व व जयसिंगराव शेंडगे यांनी या निवडणुकीच्या मैदानातून माघार घेत गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा दिला आहे. सांगली लोकसभेची लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही लढाई युती, व स्वाभीमानीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यांना बहुजन वंचित आघाडीचे तगडे आव्हान समोर उभे राहील्याने आता मत विभागणीमुळे ही तिहेरी लढत रंगतदार बनली आहे.
संजय पाटील यांनी जिल्ह्यात आमदार त्यानंतर खासदार म्हणून काम केले असून त्यांचा शिराळ्यापासून ते उमदीपर्यंत सर्वच कार्यकर्त्यांशी संपर्क आहे भाजपमधील दिग्गजांची साथ त्यांच्या पाठीशी आहे. आमदार सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार अनिल बाबर यांची त्यांना साथ आहे, तर विशाल पाटील हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी स्व. वसंतदादांचे नातू आणि दादा प्रेमी काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे, शिवाय राष्ट्रवादीची साथ आहे त्यामुळे विशाल पाटील यांचे राजकीय वजनही विचार करण्यासारखे असून त्यांचे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात त्यांचा गट आहे, त्याचा फायदा त्यांना होणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत पाहता. सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत होत असून नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांचा यामध्ये मोठा कस लागणार आहे. कार्यकर्त्यांना थेट बांधावर जाऊन प्रचार करावा लागणार असून त्याचे नियोजन त्यांना करावे लागणार आहे. खासदार संजय पाटील यांनी अनेक तालुक्यात प्रचाराचा दौरा सुरू केला आहे तर आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी जत येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रचाराची तयारी केली आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार युवा नेते गोपीचंद पडळकर यांनीही तालुयात सभा घेतल्या आहेत. येत्या 21 तारखेपर्यंत प्रचाराचा धुरळा जोरात उडणार आहे. हळूहळू कल लक्षात येण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment