Wednesday, April 3, 2019

प्रा. चंद्रसेन मानेपाटील यांचे सामाजिक परिवर्तनामध्ये योगदान महत्वाचे

:प्राचार्यबडॉ.सुहास साळुंखे
जत, (प्रतिनिधी)-
प्रा. चंद्रसेन मानेपाटील यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्यांत  प्रेरणा निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांनी अनेक सामाजिक चळवळीमध्ये काम करून जत तालुक्याच्या  सामाजिक चळवळी मध्ये फार मोठे योगदान दिले म्हणून त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवा गौरव समारंभ संपन्न होत आहे असे भावपूर्ण उदगार सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुहास साळुंखे यांनी केले.

          ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. चंद्रसेन मानेपाटील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.त्याप्रसंगी सेवा निवृत्ती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही एस. ढेकळे, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे व मा. विक्रम सावंत, माजी अर्थ सचिव मा.पी.एस.चव्हाण, माजी सहसचिव प्रशासन प्राचार्य अशोक कारंडे, माजी सभापती बाळासाहेब कोडग, नाना शिंदे,  प्रमुख उपस्थित होते.
        खरा शिक्षक हा केवळ वर्गातच शिकवीत नाही तर तो संपूर्ण समाजाला शिक्षण देऊन समाज परिवर्तन करीत असतो. असे सांगून प्राचार्य सुहास साळुंखे पुढे म्हणाले कि, प्रा. चंद्रसेन मानेपाटील यांचा माणसं जोडणं हा गुणधर्म अतिशय महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी सेवा केली त्या-त्या ठिकाणची माणसे त्यांच्या सेवा गौरव समारंभाला उपस्थित आहेत असे सांगून ते शेवटी म्हणाले की, सामाजिक चळवळीमध्ये काम करीत असताना कुटुंब परिवार महत्वाचा आहे. कारण निसंकोचपणे काम करण्याची प्रेरणा कुटुंबाकडूनच मिळते सामाजिक काम करताना आपल्या परिवाराकडून प्रेरणा महत्वाची असते तरच तो व्यक्ती चांगल्या प्रकारे सामाजिक काम करू शकतो.
         यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी प्रा. चंद्रसेन मानेपाटील  यांचा जीवनपटच उलगडून दाखविला. महाविद्यालयाबरोबरच त्यांनी केलेले सामाजिक कार्य समोर मांडून त्यांच्याकडून इतरांनी प्रेरणा घेऊन आपणही विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच समाज घडणीमध्ये योगदान द्यावे असे सांगून ते पुढे म्हणाले की, प्रा. चंद्रसेन मानेपाटील यांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी व सकारात्मक संवेदनक्षमवृत्ती अतिशय महत्वाची आहे. विज्ञाननिष्ठ समाज घडविण्यासाठी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये केलेले कार्य महत्वाचे आहे असेही ते शेवटी म्हणाले .
          यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. सी. वाय. मानेपाटील  म्हणाले की, स्वामी विवेकानंद परिवारात काम करीत असताना अनेक चांगली माणसे भेटत गेली त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले आणि चांगल्या कार्याला संस्थेने नेहमीच प्रोत्साहंन दिले म्हणूनच माझ्या हातून चांगले कार्य घडू शकले. काम करीत असताना विद्यार्थी हा नेहमी केंद्रबिंदू मानला. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक परिवर्तन झाले की समाजामध्ये आपोआपच सामाजिक परिवर्तन घडत असते. म्हणून निकोप समाजरचनेसाठी विद्यार्थी अतिशय महत्वाचा घटक आहे. जरी सेवा निवृत्त झालो तरीही येथून पुढे विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी काम करीत राहणार असेही ते शेवटी म्हणाले.
प्रारंभी प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य सुहास साळुंखे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे व प्राचार्य व्ही. एस. ढेकळे यांच्या हस्ते प्रा. चंद्रसेन मानेपाटील यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. या सेवा गौरव समारंभास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, याबरोबरच जत तालुक्यातील मराठा सेवा संघ,ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन समिती,भ्रष्टाचार निर्मूलन समिती, पेन्शनर असोसिएशन अशा  विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. कुमार इंगळे व प्रा. दिनकर कुटे यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा. समीर शेख यांनी केले.

No comments:

Post a Comment