Tuesday, April 2, 2019

मुचंडीत नुकसानग्रस्त द्राक्षबागेचा पंचनामा


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील मुचंडी (ता. जत) येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता अचानक वादळी वारे, पाऊस व गारपिटीला सुरुवात झाली. या गारपिटीने दोन एकर बागेतील संपूर्ण द्राक्षबागेचे नुकसान झाले असून या शेतकर्याचे 20 लाखांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास खाली पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मुचंङी येथून दोन किलोमीटर अंतरावर गुरूबसू बिळूर यांची बागायत शेती आहे. या शेतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते द्राक्षबागेचे पीक घेतात. दोनच दिवसांपूर्वी काही व्यापार्यांनी द्राक्षाची पन्नास रुपये किलोप्रमाणे मागणी केली होती. मात्र जादा दर येईल या आशेपोटी त्यांनी द्राक्षांची विक्री पुढे ढकलली असता सायंकाळी अचानक वादळी वारे पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर गारपिटीने गुरुबसू बिळूर यांचे दोन एकरावरील द्राक्षबागेचा झोडपून काढले. द्राक्षाचे घड खाली पडले असून पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी सोमवारी दुपारी पंचनामा करून अहवाल शासनाला पाठवून दिला आहे. तसेच मुचंडी येथील संकपाळ यांच्या ढाब्यावरील सर्व पत्रे उडून एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या परिसरातील अनेक पत्रे उडून गेले आहेत. तसेच अनेक द्राक्ष काढण्यासाठी आलेल्या अनेक शेतकरी बेदाणा निर्मिती करत आहेत. त्यांना या पावसाचा गारपिटीचा त्रास झालाय. या शेतकर्यांना शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील सरपंच अशोक पाटील यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment