Friday, September 13, 2019

पाण्याअभावी द्राक्षबागेवर कुर्‍हाड


जत,(प्रतिनिधी)-
पावसाळा संपत आला तरी जत तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी द्राक्षबागेवर कुर्हाड चालवली जात आहे. जत तालुक्यात अलिकडच्या काळात द्राक्षबागायत वाढत आहे. ठिबक सिंचनचा वापर करून शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी द्राक्ष पीक घेऊ लागले आहेत. बोअर, विहीर अशा स्त्रोताच्या माध्यमातून शेतकरी द्राक्ष पिकाकडे वळला आहे.

द्राक्ष बागा लागवडीचा खर्च अधिक असला तरी खडकाळ जमीन, अधिक पाऊस, ढगाळ वातावरण याचा त्रास या भागात द्राक्ष पिकांना होत नसल्याने आणि ठोक उत्पन्न देणारे पीक असल्याने द्राक्ष बागेचे क्षेत्र वाढले आहे. मात्र तीन वर्षात जत तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने गेल्यावर्षी शेतकर्यांनी टँकरच्या पाण्याने बागा जगवल्या. यात त्यांना आर्थिक फटका बसला. यंदाही पावसाळा संपत आला तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने यंदा द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. पुन्हा बाग धरण्याची रिस्क घ्यायला शेतकरी धजावत आहेत. त्यामुळे शेतकरी द्राक्षबागेवर कुर्हाड चालवत आहेत.  
जत तालुक्यात सलग तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा राहिली. द्राक्ष पीक शेतकर्यांपुढे पाण्याचे आव्हान राहिले. 2016, 2017, 2018 या तीन वर्षात पाऊस कमी झाल्याने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली. एकरी एक ते दोन लाख गुंतवणुकीच्या द्राक्षपिकावर अस्मानी संकट कोसळले. पावसाचा अभावामुळे शेतकर्यांच्या विहिरी, बोअरची पाणी घटले. काही कोरड्या पडल्या. पाण्याअभावी यंदाच्या सप्टेंबरला छाटण्या लांबणीवर पडत आहेत. हंगाम प्रारंभीच पानी कमी पडू लागल्याने शेतकरी बागांवर कुर्हाड चालवत आहेत.

No comments:

Post a Comment