Monday, October 28, 2019

देवनाळमध्ये पानी फाउंडेशनच्या कामामुळे झाली जलक्रांती

जत,(प्रतिनिधी)-
तालुक्यातील देवनाळ या गावामध्ये 2018-19 या वर्षात पानी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या व पाणलोटच्या कामामुळे गावातील पाझर तलाव, बंधारे व ओढे पाण्याने दुथडी भरुन वाहत आहेत. जत हा राज्यात दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. मात्र ग्रामस्थांचा एकोपा अन्य बाहेरील संस्था व लोकांची साथ मिळाल्याने देवनाळ हिरवंगार झालं आहे.

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून दोन वर्षांत इथे बरचं काम झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे गावाचा एकोपा असेल तर कोणतीच गोष्ट असाध्य नाही हे देवनाळ गावांनी सिद्ध करून दाखवलं आहे. गावाच्या बाजूला असलेल क्षेत्र आणि त्यावर केलेले पाणी फाऊंडेशनचे उत्कृष्ट काम हे गावच्या एकीमुळेच पुर्ण करता आल्याचा आनंद इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
 देवनाळ हे अवघ्या 1166 लोकसंख्येचे गाव. दुष्काळग्रस्त भाग असल्याने गावाने अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केला आहे, हि भावना मनात ठेवून गावकऱ्यांनी गावाला, समाजाला आपले काही देणे लागते या उदात्त हेतूने दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी श्रमदान करणे गरजेचेच आहे अशी प्रतिज्ञाच केली. माता, भगिनी, तरुण युवा पिढी, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी श्रमदान करून गाव पाणीदार करण्यास प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला आहे. सर्व गावकऱ्यांनी मिळून श्रमदानातुन  7790 तर मशीनच्या साहाय्याने एक लाख छपन्न हजार३६२ घनमीटरअसे एकुण १,६४,१५२ घनमीटर इतके काम करण्यात आले आहे. याचे सरकारी बजेट हे काही कोटी रुपयात आहे. मात्र हे सर्व काम ग्रामस्थांनी श्रमदानातून व यांत्रिकी पद्धतीने केले आहे. या कामासाठी भारतीय जैन संघटना, टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट मुंबई, अनुलोम संस्था, अभिजीतदादा कदम नागरी सहकारी पतसंस्था मर्या (पुणे),तसेच  तिप्पेहळ्ळी व देवनाळच्या ग्रामस्थांनी आर्थिक मदत केली. त्याचबरोबर जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, मिरज पंचायत समितीचे कक्ष अधिकारी संजय शिंदे, जतचे तत्कालीन प्रांताधिकारी तुषार ठोंबरे व तहसिलदार अभिजित पाटील व पानी फाउंडेशनचे सर्व समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी जलसंधारणचे उत्तम काम उभे केले आहे.
 या कामात गावाचे नेतृत्व करणारे प्रा. तुकाराम सन्नके  म्हणाले की,  देवनाळमध्ये स्पर्धेच्या काळात संपुर्ण 45 दिवस गावकर्‍यांनी अहोरात्र काम केले. आज या कामांचे फलित  गावामध्ये दिसून येत आहे. खळखळ वाहून जाणारे लाखो, करोडो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे. त्याचा परिणाम म्हणून अत्यंत खोल कोरड्याखाक विहीरींची व बोअरवेलची पाणीपातळी झपाट्याने वाढली. पाणीपातळी वाढून जरी आर्थिक सुबत्ता येणार असली तरी या स्पर्धेने गावांमध्ये एक प्रकारे जलक्रांती केली आहे.
 या जल जलसंवर्धनातून गावातील पाण्याची साठवण करून भूजल पातळी वाढवता येते याची जाणीव ग्रामस्थांना झाली.  प्रा. सन्नके म्हणाले, प्रत्येक जातीधर्मांचा गावकरी जात पात विसरून या कामात सहभागी झाला. 95 वर्षे वयाची लोकं या कामात उतरल्याने तरुणांना आपण काहीतरी करू शकतो हा विश्वास निर्माण झाला. आपली सर्व ताकद राजकारणी लोकांच्या मागे फिरून, त्यांनी प्रत्येक वेळी चालढकल केल्यामुळे आपण अंधारात आहोत याची भावना तरुणांना झाली. चार शिकलेली लोकं एकत्र आली आहेत. आपणही त्यांच्यासोबत काम करू आणि आपला आत्मविश्वास वाढवू ही भावना तरुणांमध्ये निर्माण झाली. प्रत्येक व्यक्तीमधील कौशल्य समजण्यास मदत झाली आहे.  राजकीय पुढारी जे आतापर्यंत करू शकला नाही ते आपण करू शकतो या विचारांची बिजे ग्रामस्थांमध्ये रोवली गेली.  यातून पाणी बचतीची संकल्पना वाढीस लागली. जनता आणि अधिकारी यांच्यातील जवळीक वाढली. अनेक सरकारी योजनांचा फायदा घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येऊ शकतात हे समजू लागले.  यासह अनेक बदल गावात आता होत आहेत. शिकलेल्या लोकांची मानसिकता बदलत आहे. आता ग्रीन देवनाळ नावाची संकल्पना पुढे आली आहे. त्यामुळे येत्या काळात देवनाळचे महाबळेश्वर झाल्याशिवाय राहणार नाही. आता यापुढे सोशिक, सहनशील देवनाळ मोठ्या हिमतीने, दिमाखात आपले नेतृत्व गाजवत राहील यात शंका नाही. असा निर्धार येथील ग्रामस्थ व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment