Sunday, December 22, 2019

भारताला प्रत्येक चौथा दारुडा करतो मारामारी

जत,(प्रतिनिधी)-
देशातील प्रत्येक चौथा तळीराम दारू प्यायल्यानंतर मारामारी करतो ही धक्कादायक बाब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल १५ टक्के नागरिक टल्ली होत असून ते सर्वाधिक देशी दारूला पसंती देतात.

वाढदिवस असो की लग्न असो, चारचौघेजण एकत्र आले की ओली पार्टी ठरलेलीच असते. त्यामुळेच देशातील तळीरामांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज एकूण लोकसंख्येपैकी तब्बल १६ कोटी लोक दारू पित असून १० ते ७५ या वयोगटातील असले तरी ५० च्या आत वय असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्यायल्यानंतर वाद होऊन मारामारीच्या घटना जास्त घडत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट
झाले आहे.
तळीरामांमध्ये पाणी न टाकता देशी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तर चार टक्के लोक वाईनला पसंती देत असून २१ टक्के लोक बीअर पसंत करतात. दारू पिणान्या १६ कोटीमध्ये ९५ टक्के संख्या पुरुषांची आहे. तसेच पुरुषांच्या तुलनेत महिलांचे दारू पिण्यावर नियंत्रण आहे. त्रिपुरामध्ये एकूण लोकसंख्येच्या ६३ टक्के तर छत्तीसगडमध्ये ५७ टक्के, पंजाबमध्ये ५२ टक्के लोक दारू पितात. अरुणाचल प्रदेश, गोवा यांच्यासह अन्य सात राज्यातील एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लोक दारू पितात, गुजरात आणि बिहारमध्ये दारूबंदी आहे, तर राजस्थानमध्ये सर्वात कमी २.१ टक्के तर मेघालयात ३.४ टक्के लोक दारूचे सेवन करतात.

No comments:

Post a Comment