Wednesday, January 22, 2020

भारतातील 231 शहरे सर्वात प्रदूषित

भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे. झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.

दिल्ली वर्षांपूर्वी आठव्या स्थानावर होते. झारखंडमधील धनबाद हे ठिकाण कोळसा खाणी व उद्योगांसाठी प्रसिद्ध असून ते देशातील दुसरे प्रदूषित ठिकाण आहे. यात पीएम १0 कणांचे प्रमाण देशातील २८७ शहरांत मोजण्यात आले.
मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित असून त्या खालोखाल मेघालयच्या डोवकी या ठिकाणांचा कमी प्रदूषणात दुसरा क्रमांक आहे. देशातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी दहा उत्तर प्रदेशात असून त्यात नॉइडा, गाझियाबाद, बरेली, अलाहाबाद, मोरादाबाद, फिरोजाबाद यांचा समावेश आहे. दक्षिणेकडे सर्वाधिक प्रदूषित शहरात एकूण २८ ठिकाणांचा समावेश असला, तरी त्यात केरळमधील एकही ठिकाण नाही.
ग्रीनपीसच्या भारतीय शाखेने एअरोपोकॅलप्स अहवाल जारी केला असून त्यात देशातील शहरांच्या हवा प्रदूषणाचा ताळेबंद मांडला आहे. २0१८ मध्ये देशातील एकूण २८७ शहरांच्या हवेचे ५२ दिवस निरीक्षण करून असे सांगण्यात आले, की २३१ शहरांत पीएम १0 कणांचे प्रमाण हे धोकादायक पातळीपेक्षा अधिक आहे. भारतात पीएम दहा कणांचे २४ तासांना १00 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर तर वर्षांला सरासरी ६0 मायक्रोग्रॅम घनमीटर इतके प्रमाण सुरक्षित मानले गेले आहे. झारखंडमधील झारिया येथे पीएम १0 कणांचे प्रमाण प्रतिघनमीटरला ३२२ मायक्रोग्रॅम होते. धनबाद व नॉइडात ते प्रतिघनमीटरला २६४ मायक्रोग्रॅम होते. गाझियाबादेत २४५ मायक्रोग्रॅम होते.
कर्नाटकातील बंगळूरु, रायचूर, बेळगावी, तुमकुरु, कोलार, बिजापूर, हुबळी, धारवाड, बागलकोट ही शहरे जास्त प्रदूषित आहेत. तामिळनाडूत त्रिची, थुतूकोडी, मदुराई, चेन्नई तर तेलंगणात कोठूर, हैदराबाद, रामगुंडम, करीमनगर, वारंगळ, खम्मम, संगारेड्डी, पटेनतुरू, अदिलाबाद ही शहरे प्रदूषित आहेत. आंध्र प्रदेशातील विजयवाडा, विशाखापट्टणम, काकीनाडा, राजमुंद्री, श्रीकाकुलम, अनंतपूर ही ठिकाणे प्रदूषित आहेत. केरळमध्ये एकाही शहरातील हवेत पीएम १0 कणांचे प्रमाण धोकादायक दिसले नाही. तेथे कमाल प्रमाण दर घनमीटरला ५७ मायक्रोग्रॅम होते.
सरकारला शिफारस
भारत सरकारने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एनसीएपी) तयार केला असून त्यात जास्त शहरांचा समावेश करावा, असे ग्रीनपीसचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment