Wednesday, February 3, 2016

गावागावांत स्वयंघोषित लाईनमन
कर्मचार्‍यांना मुख्यालयाची अँलर्जी
अपघाताची भीती : लहान-सहान दुरुस्तीकडे वीज वितरणचे दुर्लक्ष
जत,(बातमीदार):तालुक्यातील गावागावात सध्या स्वयंघोषित लाईनमन झाले असून वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या समोरच खांबावर चढून दुरुस्तीची कामे केली जात आहे. त्यामुळे अपघाताची भीती वाढली असून वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातील  वीज वितरण कंपनीचा कारभार पूरता ढेपाळला आहे. या कार्यालयांतर्गत अभियंता आणि लाईनमनची नियुक्ती करण्यात आली आहे. एका लाईनमनकडे फिडर निहाय गावे देण्यात आली आहे. परंतु लाईनमन कधी या गावात जाताना दिसतच नाही. तांत्रिक बिघाड झाल्यानंतर गावकरी वीज वितरण कंपनीकडे तक्रार करतात. परंतु आठ-आठ दिवस कुणी येऊनही पाहत नाही. शेवटी गावातील खासगी लाईनमनकडून दुरुस्ती करून घ्यावी लागतो. आता तर लहान-सहान बिघाड झाल्यास गावकरी तक्रार द्यायलाही जात नाही. सरळ खासगी लाईनमन शोधून त्याच्याकडून दुरुस्ती करून घेतली जाते. फ्यूज टाकण्यापासून ते खांबावर चढून तार जोडण्यापर्यंतची कामे खासगी लाईनमन करताना दिसून येतात. अशा लाईनमनची गावात चालती असून अल्प मोबदल्यात वाट्टेल ते काम धोकापत्करून करीत आहे. अनेकदा लाईनमन दुरुस्तीसाठी आला तरी त्यांना खांबावर चढणे जमत नाही. त्यामुळे गावातील खासगी व्यक्तीच खांबावर चढून दुरुस्तीचे काम करतो.
विजेचे कोणतेही ज्ञान नसलेले व्यक्ती स्वयंघोषित लाईनमन झाल्याने अपघाताची शक्यता असते. परंतु ही मंडळी थोड्याशा पैशासाठी जीवावर उधार होऊन दुरुस्तीचे काम करतात. हा सर्व प्रकार कर्मचार्‍यांपासून अभियंत्यांपर्यंत सर्वांनाच माहीत आहे. परंतु कारवाई करणार तरी कशी कारण एकही कर्मचारी गावात पोहोचत नाही. परस्परच दुरुस्ती होत आहे यावरच समाधान मानले जाते.

वाहन चालविताना होतोय मोबाईलचा सर्रास वापर
वाहनधारकांवर कारवाईची गरज
जत,(बातमीदार):चालत्या वाहनांमध्ये बस व खासगी वाहनचालक भ्रमणध्वनीवर बोलत असल्याने प्रवाशांची व पादचार्‍यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे अपघाताचीही शक्यता वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस चालक व वाहकांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे. इतरही वाहनधारकांना वाहन चालविताना मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र या बंदीचा सर्वत्र फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. आधुनिक युगामुळे जवळपास आता प्रत्येकांकडेच मोबाईल आला आहे. त्यात बस चालक आणि वाहकही समाविष्ट आहेत. मोबाईल ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांजवळ मोबाईल दिसतो. मात्र वाहनचालक अथवा इतर वाहनधारकांना हा मोबाईल काळ ठरू शकतो. सोबतच वाहनांतील प्रवाशांच्या जिवालाही धोका पोहोचू शकतो. त्याचबरोबर शिकवणी वर्ग शाळेत जाणारे विद्यार्थीसुद्धा मुलींसमोर 'फ्लॅश' मारण्यासाठी कानाला मोबाईल लावून दुचाकी चालवत असतात. यातून एखाद्या पादचार्‍याला दुचाकीची धडक लागून अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याकडे आता वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बहुतांश वाहनधारक वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण साधताना दिसून येतात. दुचाकीधारक तर सर्रास मोबाईलचा वापर करीत वाहन पुढे दामटतात. मान तिरपी करून ते इतरांशी संभाषण साधतात. इतर वाहनधारकही वाहन चालविताना मोबाईलचा सर्रास वापर करतात. त्यामुळे त्यांच्यासह त्या रस्त्याने प्रवास करणार्‍या इतरांचाही जीव धोक्यात सापडला आहे. वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण साधणार्‍या चालकांविरूद्ध आता कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. किमान गजबजलेली शहरे, वस्ती, चौक आदी ठिकाणी तरी याला पायबंद घालण्याची गरज आहे. अन्यथा अपघात होऊन निरपराधांचा बळी जाण्याची शक्यता आहे.

यंदा फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा
वातावरणात बदल : दिवसाच्या तापमानात ५ अंशाने वाढ
जत,(बातमीदार):मागील दोन दिवसांपासून वातावरणातील थंडी जाऊन उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील तापमानात अचानक झालेल्या या बदलाचा सर्वच घटकांवर परिणाम जाणवत आहे. तापाच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. 
बुधवारी शहराचे तापमान ३२ अंशाच्या वर होते. पुढील सहा दिवसांत पारा ३४ अंशांच्या पुढे राहणार आहे. सध्या हिमालयीन भागासह जम्मू आणि काश्मीरमध्ये पश्‍चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे हिमवर्षाव होत आहे. त्याचा प्रभाव उत्तर भारतापर्यंतच्या काही राज्यापर्यंत जाणवत असून भारतातील काही राज्यांचे तापमान वाढले आहे. बंगालच्या उपसागराचा दक्षिणपूर्व भाग आणि हिंदी महासागराच्या विषवृत्तीय भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. 
परिणामी उत्तर भारताकडून येणार्‍या थंड वार्‍यांवर या वार्‍यांचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन कमाल तापमानात हळूहळू वाढ होत असल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी प्रसार माध्यमांना दिली. 

मुख्याध्यापक पद आले धोक्यात
मागणी : १५0पेक्षा अधिक विद्यार्थीसंख्येला पद मंजूर करा
जत,(बातमीदार): जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण विभागाकडून संचमान्यतेचे काम सुरूझाले आहे.त्यासाठी पहिली ते पाचवी तसेच सहावी ते आठवी असे दोन भाग करण्यात आले आहेत.संबंधित वर्गाची विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊनच मुख्याध्यापकाची पदे मंजूर केली जात आहेत.त्यामुळे अनेक शाळांमधील मुख्याध्यापक पदच रद्द होत आहे.त्यामुळे पूर्वीप्रमाणेच १५0पेक्षा अधिक विद्यार्थीअसलेल्या शाळांना मुख्याध्यापक पद मंजूर करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये पूर्वीच्या संचमान्यतेनुसार विद्यार्थीसंख्येच्या आधारे मुख्याध्यापक पद मंजूर केले जात होते.प्राथमिक शाळेची विद्यार्थीसंख्या २00पेक्षा अधिक असल्यास अथवा पहिली ते सातवीचे वर्ग असल्यास मुख्याध्यापक पद मंजूर केले जात होते परंतु राज्य शासनाने यात बदल केला आहे.नव्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते पाचवीची विद्यार्थी संख्या १५0पेक्षा अधिक असल्यास मुख्याध्यापक पद मंजूर केले जात आहे.तसेच सहावी ते आठवीच्या वर्गात १00पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यामुळे हे पद मंजूर होते.त्यामुळे पहिली ते सातवीची शाळा असणार्‍यांना त्याचा फटका बसत आहे.कारण नवीन संरचनेत पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी असे दोन भाग केल्याने अनेकशाळांमधील मुख्याध्यापकाचे पदच रदञद होत आहे तर मुख्याध्यापक पदावर काम करणार्‍यांची पदावनती होत आहे.त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी मुख्याध्यापक व शिक्षकांकडून होत आहे.






No comments:

Post a Comment